देशद्रोहाचा आरोप असलेल्या नवाब मलिक यांना महायुतीमध्ये घेणे योग्य नाही ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

श्री. देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री

मुंबई, ७ डिसेंबर (वार्ता.) –  देशद्रोह्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली अटक झाली तरी नवाब मलिक यांना मंत्रीपदावर कायम ठेवणार्‍या तत्कालीन मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडी सरकार यांच्या विचारांशी आम्ही सहमती दाखवू शकणार नाही. त्यांच्यावर ज्या पद्धतीचे आरोप आहेत, ते पहाता, त्यांना महायुतीमध्ये घेणे योग्य ठरणार नाही, असे पत्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पाठवले आहे.

(चित्रावर क्लिक करा)

७ डिसेंबरपासून चालू झालेल्या विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी वैद्यकीय जामीनावर कारागृहाच्या बाहेर असलेले नवाब मलिक उपस्थित राहिले होते. शिवसेना-भाजप सरकार यांना पाठिंबा देणार्‍या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार यांच्या आमदारांमध्ये नवाब मलिक बसले होते. यावरून देवेंद्र फडणवीस यांनी हे पत्र अजित पवार यांना लिहिले आहे. या पत्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे, ‘‘माजी मंत्री आणि विधानसभा सदस्य नवाब मलिक विधीमंडळ परिसरात येऊन कामकाजात सहभागी झाले होते. विधानसभा सदस्य म्हणून त्यांचा तो अधिकारही आहे. त्यांच्याविषयी आमची वैयक्तिक शत्रूता अथवा आकस मूळीच नाही. सत्ता येते आणि जाते; पण सत्तेपेक्षा देश महत्त्वाचा आहे. सद्यस्थितीत नवाब मलिक केवळ वैद्यकीय आधारावर जामीन मिळाल्याने बाहेर आहेत. त्यांच्यावरील आरोप सिद्ध न झाल्यास आपण त्यांचे अवश्य स्वागत करावे; मात्र अशा प्रकारचे आरोप असतांना त्यांना महायुतीचा भाग करणे, हे योग्य होणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कुणाला घ्यायचे ? हा सर्वस्वी आपला अधिकार आहे; परंतु त्यामुळे महायुतीला बाधा पोचणार नाही, याचा विचारही प्रत्येक घटकपक्षाला करावाच लागतो. त्यामुळे नवाब मलिक यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेण्याला आमचा विरोध आहे.’’