दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : दुचाकींच्या चोरीत वाढ !; परीक्षेतील अपयशामुळे आलेल्या नैराश्यातून तरुणाची आत्महत्या !…

दुचाकींच्या चोरीत वाढ !

नाशिक – येथे एका रिक्शासह तीन दुचाकी चोरांनी पळवल्या आहेत. या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. प्रतिदिन २ दुचाकींची चोरी केली जात आहे.

अशा चोरांचा शोध घेऊन त्यांना कठोर शिक्षा करावी !


परीक्षेतील अपयशामुळे आलेल्या नैराश्यातून तरुणाची आत्महत्या !

नागपूर – ‘आय.ए.एस्.’ किंवा ‘आय.पी.एस्.’ अधिकारी पदाच्या परीक्षेत आलेल्या अपयशामुळे खचून गेलेल्या शुभम कांबळे (वय २५ वर्षे) या निरीक्षकाने नैराश्यात आत्महत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. आत्महत्येचे कारण त्याने पत्रात नमूद केले आहे. त्याला पोलीस किंवा प्रशासकीय सेवेत भरती व्हायचे होते. पुष्कळ प्रयत्न करूनही तो त्यात अपयशी ठरला.

नैराश्याचा सामना करण्यासाठी आत्मबळ वाढवा !


रूळ ओलांडणार्‍या १ सहस्र १०७ प्रवाशांवर दंडात्मक कारवाई !

ठाणे – ठाणे रेल्वेस्थानक आणि लगतच्या परिसरात प्रवाशांकडून रेल्वे रूळ ओलांडले जातात. ठाणे रेल्वे पोलिसांनी गेल्या ११ मासांत रेल्वे रूळ ओलांडणार्‍या १ सहस्र १०७ प्रवाशांवर दंडात्मक कारवाई केली आहे, तसेच अपंगांच्या डब्यातून अवैधरित्या प्रवास करणार्‍या २ सहस्र ६५६ प्रवाशांवर कारवाई करण्यात आली आहे.

आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी जनतेला शिस्त न लावल्याचा परिणाम !