शत्रूपेक्षा अधिक धोकादायक जन्महिंदू !

हिंदु, हिंदुत्व आणि अपघाताने झालेले हिंदू ! – भाग १६

१. जन्महिंदू असल्याने धर्मांतरित झालेल्या ख्रिस्ती-मुसलमान यांना भारत आणि येथील धर्म त्यांचे वाटत नाहीत !

‘भारताला मुसलमान आणि ख्रिस्ती यांच्याकडून जेवढा धोका आहे, त्यापेक्षा कितीतरी पटींनी अधिक धोका हिंदु धर्माचा यत्किंचितही अभ्यास नसणार्‍या अन् क्षुद्र स्वार्थासाठी हिंदु धर्मावर टीका करणार्‍या जन्महिंदूंकडून आहे. कोणत्याही मुसलमानाकडून ख्रिस्त्यांचे आणि कोणत्याही ख्रिस्त्याकडून मुसलमानांचे धर्मांतर करण्याचे प्रयत्न होतांना कधी कुठेही दिसत नाहीत. याचे कारण हे दोन्हीही समाज त्यांच्या धर्माविषयी कट्टर आहेत; पण मुसलमान आणि ख्रिस्ती यांच्याकडून हिंदु धर्मियांचे मात्र मोठ्या प्रमाणात धर्मांतर केले जाते; कारण हिंदू आपल्या धर्माविषयी अनभिज्ञ तर आहेतच; पण कट्टरतेचा त्यांच्यात फार मोठ्या प्रमाणात अभाव आहे. त्यांची दिशाभूल करणे आणि त्यांच्यात फूट पाडणे पुष्कळ सोपे काम आहे. याखेरीज असे अनेक हिंदू आहेत की, ते चटकन प्रलोभनामध्ये फसतात आणि धर्मांतर करतात. भारतातील ९५ टक्के मुसलमान हे धर्मांतरित झालेले हिंदूच आहेत. पूर्वीच्या या हिंदूंना साम, दाम, दंड अथवा भेद या मार्गाने धर्मांतरित करण्यात आले आहे. हिंदूंचे नेते कधीपासूनच या वास्तवाचा वारंवार उच्चार करत होते; पण त्यावर कुणी विश्वास ठेवत नव्हते. आता काँग्रेस पक्षाचे एक भूतपूर्व आणि वरिष्ठ नेते गुलाम नबी आझाद म्हणतात, ‘‘१४०० वर्र्षांपूर्वी या देशात एकही मुसलमान नव्हता. आताचे सर्व मुसलमान हे आपला पूर्वीचा हिंदु धर्म पालटून धर्मांतरित झालेले मुसलमान आहेत.’’ त्यांनी असे विधान केल्यानंतरही अशा धर्मांतरित ख्रिस्ती-मुसलमान यांना हा देश आणि इथले धर्म त्यांचे वाटत नाहीत. त्यांना आजही हिंदूंचे धर्मांतर करण्यास सर्व रान मोकळे आहे.

२. घुसखोर धर्मांधांना आश्रय देणार्‍या देशांनी भयंकर परिणाम भोगणे

इसिसच्या आतंकवादामुळे सीरिया आणि इराक येथून १० लाख मुसलमान विस्थापित झाले आहेत. बौद्ध धर्मगुरु असिन विरयू यांनी घेतलेल्या रोहिंग्यांविरुद्धच्या आक्रमक धोरणामुळे ब्रह्मदेशातून लाखो रोहिंग्या मुसलमान विस्थापित झाले. या विस्थापित मुसलमानांना जगातील एकाही मुसलमान राष्ट्राने त्यांच्या देशात आश्रय दिला नाही; पण सिरीया आणि इराक येथून विस्थापित झालेल्या या मुसलमानांना भ्रामक अन् आत्मघातकी मानवतावादी भूमिकेने भारावलेल्या काही युरोपीय आणि पाश्चात्त्य देशांनी मात्र त्यांच्या देशांत उदारपणे आश्रय दिला. आता त्याचे भयानक दुष्परिणाम फ्रान्स, जर्मनी आणि इंग्लंड आदी देशांना भोगावे लागत आहेत ! भारतातही काही राज्यांनी ब्रह्मदेशातून आलेल्या रोहिंग्यांसाठी पायघड्या घातल्या आहेत. या रोहिंग्यांच्या समर्थनार्थ ११ ऑगस्ट २०१२ या दिवशी मुंबईच्या आझाद मैदानावर भारतातील लाखो धर्मांध मुसलमान एकत्र झाले होते. त्यांनी घडवलेल्या दंगलीच्या जखमा अद्यापही ताज्या आहेत.

श्री. शंकर गो. पांडे

३. भारतात घुसखोरांसाठी पायघड्या आणि इस्लामी देशांतून जीव वाचवून आलेल्या हिंदूंना नागरिकत्व देण्यास विरोध करणारे जन्महिंदू !

सध्या मणीपूर धगधगत आहे. जीवित आणि वित्त यांची अपरिमित हानी झाली आहे. यामागे ब्रह्मदेशातून भारतात लाखोंच्या संख्येने घुसलेले रोहिंगे आणि कुकी जमातीचे घुसखोर उत्तरदायी आहेत. भारतातही काही स्वार्थी आणि देशविघातक जन्महिंदूंकडून या घुसखोरांसाठी पायघड्या घातल्या जात आहेत. या जन्महिंदूंचा पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेश येथून त्यांचा जीव कसाबसा वाचवून भारतात आलेल्या हिंदु, बौद्ध, जैन अन् शीख यांना भारतीय नागरिकत्व देण्यास मात्र विरोध आहे. यावरून हे जन्महिंदू देशासाठी किती घातक आहेत, हे लक्षात येते.

४. लव्ह जिहाद, गोहत्या, धर्मांतर आदींविषयीच्या कायद्यांना विरोध करणारे जन्महिंदू !

या देशात आजपर्यंत लाखो हिंदु मुली धर्मांध मुसलमानांच्या ‘लव्ह जिहाद’ला बळी पडल्या आहेत; पण एखाद्या मुसलमान मुलीने हिंदु मुलाशी विवाह केला, तर मात्र त्यांच्या जीविताचे काही खरे नसते. ते दोघेही ‘अल्लाला केव्हा प्यारे’ होतील, काही सांगता येत नाही. हिंदु समाजासाठी गोमाता पूज्य आहे; पण प्रतिदिन या देशात धर्मांध मुसलमानांकडून लाखो गायींची कत्तल होते. या देशात होणारी घुसखोरी, हिंदूंचे होणारे धर्मांतर, लव्ह जिहादची प्रकरणे, गोहत्या यांवर बंदी घालण्यासाठी कडक कायदे करण्याची मागणी जेव्हा हिंदूंकडून केली जाते, तेव्हा अशा कायद्यांना मुसलमान आणि ख्रिस्ती यांपेक्षा अपघाताने जन्मलेल्या हिंदूंकडूनच प्रखर अन् कडवा विरोध असतो. हे जन्महिंदू म्हणजे ‘कुर्‍हाडीचा दांडा गोतास काळ’ असतात !

५. पशूहत्येविषयी वारंवार गळा काढणारे; परंतु प्रचंड प्रमाणात होणार्‍या गोहत्येविषयी मूग गिळून गप्प बसणारे जन्महिंदू !

मुसलमान आणि ख्रिस्ती यांच्या सणांत उत्साहाने सहभागी होणारे जन्महिंदू मुसलमानांना रमजानच्या मासात इफ्तारच्या मेजवान्या देतात, मुसलमान टोपी घालून छाती काढून मिरवतात. भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करायचे म्हटले, शेतकर्‍यांनी त्यांची शेती उद्ध्वस्त करणार्‍या जंगली जनावरांचा, हरिणांचा बंदोबस्त करायचे म्हटले, अनेक माणसांचे जीव घेणार्‍या नरभक्षक वाघाला मारायचे म्हटले, तर हे जन्महिंदू आणि तथाकथित पशूप्रेमी पशूहत्येच्या नावाने गळे काढतात. दुसरीकडे बकरी ईदच्या दिवशी लाखो बकर्‍या, कोंबड्या, गायी यांची कत्तल होते, तेव्हा मात्र हेच पशूप्रेमी तोंडात मूग गिळून स्वस्थ बसतात.

६. हिंदूंचे सण आणि प्रथा यांवर टीका करणारे; मात्र हलाला, खतना, बुरखा, अमर्याद संतती, तलाक यांविषयी अवाक्षरही न काढणारे जन्महिंदू !

हिंदूंच्या सणांना नावे ठेवणारे, हिंदु सणांच्या नावाने नाके मुरडणारे जन्महिंदू ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री मात्र मद्यधुंद होऊन नाचत ख्रिस्त्यांचा नववर्षदिन साजरा करतात. हिंदु देवतांची टिंगल-टवाळी करणार्‍या खानांचे चित्रपट मिटक्या मारत पहातात, खानांवर प्रसिद्धी, पैसा, प्रतिष्ठा यांचा वर्षाव करतात. हिंदु समाजातून कधीच्याच बंद झालेल्या बालविवाह, सतीप्रथा, स्त्रिया विधवा झाल्यानंतर त्यांचे होणारे केशवपन या प्रथांवर जन्महिंदूंकडून वारंवार टीका केली जाते; पण मुसलमान समाजातील तलाक, बहुविवाह, हलाला, खतना, बुरखा, ‘अल्लाकी देन’ म्हणून पैदा करण्यात येणारी अमर्याद संतती या कुप्रथांविषयी मात्र अवाक्षरही काढला नाही.

७. दीड सहस्र वर्षे हिंदूंना मारणारे आक्रमक आणि अब्दुल रशीद यांना आतंकवादी न मानणारे अपघाताने जन्मलेले हिंदु कमल हासन !

कमल हासन हा दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील एक नावाजलेला अभिनेता. त्यांनी आता कोणता धर्म स्वीकारला, हे ठाऊक नाही; पण त्यांचे मूळ नाव पार्थसारथी (भगवान श्रीकृष्णाचे एक नाव) आणि धर्म हिंदु; पण आता आपल्या हिंदुद्वेषापायी आणि हिंदुविरोधी विधानासाठी ते (कु)प्रसिद्ध झाले आहेत. ‘त्यांच्या या कामगिरीमुळेच काँग्रेसच्या राजवटीत त्यांना पद्मश्री आणि वर्ष २०१४ मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले गेले असेल !’, हेच खरे ! अभिनयाच्या क्षेत्रासमवेत ते आता राजकारणाच्या मैदानात उतरले आहेत. त्यांनी ‘मक्कल नीधी मैथाम’ नावाच्या पक्षाची स्थापना केली आहे. ते एकदा बरळले होते की, ‘गांधी यांची हत्या नथुराम गोडसे याने केली होती. त्यामुळे स्वतंत्र भारताचा पहिला अतिरेकी हिंदूच आहे.     तेव्हापासूनच या देशात आतंकवादाला आरंभ झाला.’ जर सध्या हिंदूंना आतंकवादी ठरवणार्‍यांचे राज्य असते, तर त्यांनी कमल हासन यांना त्यांच्या या अपूर्व संशोधनाविषयी ‘भारतरत्न’ पदवीने निश्चितच सन्मानित केले असते ! ‘गांधी यांची हत्या झाल्यानंतरच या देशात आतंकवादाला आरंभ झाला’, असे कमल हासन यांचे मत असेल, तर तत्पूर्वी वर्ष ७१३ मध्ये महंमद बिन कासिमने या देशावर पहिले आक्रमण केल्यानंतर पुढे जवळपास एक सहस्र वर्षे या देशावर मुसलमानांच्या ज्या टोळधाडी येत राहिल्या आणि त्यांनी लाखो हिंदु स्त्री-पुरुषांच्या निर्घृणपणे ज्या कत्तली केल्या, त्यांना काय म्हणायचे ? याला आक्रमकांचा आतंकवाद म्हणायचे नाही, तर काय शांतीदूतांचे शांतीकार्य म्हणायचे ?

खरेतर, या देशात जेव्हा आक्रमक घुसले, तेव्हापासूनच या नंदनवनात खर्‍या अर्थाने आतंकवादाला आरंभ झाला. भारताची फाळणी मान्य झाल्यानंतर धर्मांध मुसलमानांनी १० लाख हिंदूंच्या कत्तली केल्या. कत्तली करतांना त्यांनी स्त्री-पुरुष, वृद्ध, लहान मुले असा कोणताच भेदभाव केला नव्हता; पण या धर्मांधांना कमल हासन पहिले आतंकवादी मानत नाहीत. परधर्मात गेलेल्या हिंदूंना स्वधर्मात आणून त्यांच्या शुद्धीकरणाचे कार्य करणार्‍या स्वामी श्रद्धानंद यांची २३ डिसेंबर १९२६ या दिवशी अब्दुल रशीद नावाच्या एका धर्मांध माथेफिरूने हत्या केली; पण कमल हासनसारख्या ‘अपघाता’ने हिंदु म्हणून जन्मलेल्यांना अब्दुल रशीद आतंकवादी वाटत नाही. धर्मांध मुसलमान आणि ख्रिस्ती यांपेक्षा आपल्या स्वधर्माचा द्वेष करणारे असे जन्महिंदूच अधिक घातक असतात, हे वारंवार सिद्ध झाले आहे !

(क्रमशः पुढच्या रविवारी)

– श्री. शंकर गो. पांडे, पुसद, जि. यवतमाळ.