सनातन धर्माच्या रक्षणासाठी हिंदु राष्ट्र अत्यावश्यक ! – संजय जोशी, हिंदु जनजागृती समिती

हिंदु जनजागृती समितीचे श्री. संजय जोशी

पाचल, १ नोव्हेंबर (वार्ता.) – अलीकडेच सनातन धर्म नष्ट करण्याची भाषा उदयनिधी स्टॅलिन, प्रियांक खर्गे, ए. राजा, जितेंद्र आव्हाड, निखिल वागळे आदींनी केली. सनातन धर्माच्या रक्षणासाठी हिंदु राष्ट्र अत्यावश्यक आहे. त्यासाठी हिंदूंनी जात-पात, प्रांत, भाषा, संप्रदाय, पक्ष आदी भेद विसरून संघटित होणे, ही काळाची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. संजय जोशी यांनी केले.

येथील नेहरू युवा चैतन्य युवक मंडळाने नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या व्याख्यानात श्री. जोशी बोलत होते. या वेळी व्यासपिठावर सर्वश्री किशोर नारकर आणि जनार्दन खानविलकर उपस्थित होते. श्री. जोशी यांचा परिचय समितीचे श्री. श्रीकृष्ण नारकर यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. सुनील गवरे यांनी केले.

श्री. संजय जोशी पुढे म्हणाले

१. महाराष्ट्रात लव्ह जिहाद, धर्मांतर यांविरोधात काढण्यात आलेल्या जनसंघर्ष मोर्चाला संबोधित करणार्‍या वक्त्यांच्या विरोधात ‘हेट स्पीच’च्या अंतर्गत ३० गुन्हे नोंदविले गेले; मात्र हिंदु धर्म, देवता यांच्या विरोधात बोलणार्‍यांवर, हिंदूंना संपवण्याची भाषा करणार्‍यांच्या विरोधात गुन्हे नोंदविले जात नाहीत, हे दुर्दैव आहे.

२. ध्वनीप्रदूषणाच्या नावाखाली महाराष्ट्रात सार्वजनिक गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव मंडळांच्या विरोधात २२० गुन्हे नोंदवण्यात आले; मात्र ३६५ दिवस दिवसातून ५ वेळा ओरडणार्‍यांच्या विरोधात केवळ १२ गुन्हे नोंदवले गेले, हा भेदभाव धर्मनिरपेक्ष भारतात कशासाठी ?

विशेष : कार्यक्रमानंतर ‘राष्ट्र-धर्मावरील आघात आणि त्यांवरील उपाय’ या विषयावरील विस्तृत मार्गदर्शनासाठी व्याख्यानाचे आयोजन करण्याचे सुतोवाच मंडळाचे कार्याध्यक्ष श्री. मंगेश  कुडतरकर यांनी केले.