शाळेत हिंदु धर्म आणि संस्कृती यांचा अवमान करणार्‍यांवर कारवाई करावी ! – सकल हिंदु समाजाची नवी मुंबई महापालिका आयुक्तांकडे मागणी

अंधश्रद्धा निर्मूलन समितीने हिंदु धर्माप्रती विद्यार्थ्यांच्या मनात द्वेष निर्माण केल्याचे प्रकरण

नवी मुंबई, २९ ऑक्टोबर (वार्ता.) – नवी मुंबई महापालिकेच्या तुर्भे गावातील शाळेत अंधश्रद्धा निर्मूलन समितीद्वारे हिंदु धर्म आणि संस्कृती यांचा अवमान करण्यात आला आहे. या प्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सकल हिंदु समाजाच्या वतीने  महापालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या प्रकरणी अतिरिक्त आयुक्त विजयकुमार म्हसाळ यांनी ‘या तक्रारीची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल’, असे सांगितले.

निवेदनामध्ये म्हटले आहे की,…

१. तुर्भेगाव सेक्टर – २२ येथील शाळा क्र. १०७ मध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीद्वारे एक कार्यक्रम घेण्यात आला होता. यामध्ये ‘नवरात्रीतील उपवास ही अंधश्रद्धा आहे. यामुळे हिंदु समाज महिलांवर अत्याचार करतो’, हे विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवण्यात आले आहे’, असे सांगण्यात आले होते.

२. हिंदु धर्माला अपकीर्त करण्याचे काम अंधश्रद्धा निर्मूलन समिती महापालिकेच्या शाळेच्या माध्यमातून करत आहे. या घटनेचा सकल हिंदु समाज निषेध करत आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने यापूर्वी मुंबईमध्येही अशाच स्वरूपाचा प्रकार केला होता. जागृत पालकांनी तक्रार केल्यावर ३ सप्टेंबर २००४ या दिवशी महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने कार्यवाही करून समितीचे शाळेमधील प्रकल्प तातडीने थांबवण्याचे परिपत्रक काढण्यात आले.

३. ‘ही समिती विद्यार्थ्यांच्या मनात हिंदु धर्माविषयीची श्रद्धा आणि विश्वास नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे या घटनेची चौकशी करून संबंधित व्यक्तींवर कारवाई करावी. तसेच या कार्यक्रमासाठी शाळा उपलब्ध करून देणार्‍यांची चौकशी करून संबंधित अधिकार्‍यांवरही कारवाई करावी’, अशी मागणी सकल हिंदु समाजाने केली आहे.

पोलिसांकडून गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ !

या प्रकरणी सौ. कमल गिरमकर या जागरूक महिलेने ए.पी.एम्.सी. पोलीस ठाण्यात ‘धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात यावा’, अशी लेखी तक्रार केली होती. या संदर्भात ‘गुन्हा नोंदवण्यासाठी दोन दिवसांनी तुम्हाला बोलवतो’, असे पोलिसांनी सांगितले होते; मात्र दोन दिवस होऊनही पोलिसांकडून कोणताही निरोप न आल्याने सौ. गिरमकर स्वतःच पुन्हा पोलीस ठाण्यात गेल्या होत्या. त्या वेळी पोलिसांनी उडवाउडवीची उत्तरे देत गुन्हा नोंदवून घेण्यास टाळाटाळ केली. (हिंदूंचा विश्वासघात करणारे पोलीस ! – संपादक)

‘अंधश्रद्धा निर्मूलन समिती’ केवळ हिंदूंच्या विरोधातच काम का करत आहे ? ‘इतर धर्मांमध्ये सगळे काही आलबेल आहे’, असे समितीला वाटते का ? आमचे सण, व्रत-वैकल्ये कशी साजरी करावीत ? हे सांगण्याचा अधिकार समितीला नाही. यासंदर्भात सरकारी शाळेमध्ये जाऊन मुलांच्या मनामध्ये हिंदु धर्माविषयी अपसमज निर्माण करणार्‍यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी ! – मनीषाताई भोईर, विश्व हिंदु परिषद, नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष

संपादकीय भूमिका :

  • धर्मरक्षणासाठी सतर्क आणि तत्पर असणार्‍या सकल हिंदु समाजाचे अभिनंदन !
  • जोपर्यंत कारवाई होत नाही, तोपर्यंत महापालिका आयुक्तांचा पाठपुरावा घ्यायला हवा !