पठाणकोट येथील सैन्यातळावरील आक्रमणाच्या सूत्रधाराची पाकिस्तानात हत्या

शाहिद लतिफची हत्या केली

सियालकोट (पाकिस्तान) – भारतातील पठाणकोट येथील सैन्याच्या तळावर वर्ष २०१६ मध्ये झालेल्या जिहादी आतंकवादी आक्रमणाचा मुख्य सूत्रधार शाहिद लतिफ याची येथे अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केली. येथील मशिदीबाहेर ही हत्या करण्यात आली. तो राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या पसार आतंकवाद्यांच्या सूचीमध्ये होता. पठाणकोटच्या आक्रमणात भारताच्या ७ सैनिकांना वीरमरण आले होते. जैश-ए-महंमद या आतंकवादी संघटनेने हे आक्रमण केले होते. येथे ३६ घंटे चकमक चालू होती. वर्ष १९९९ च्या इंडियन एअरलाईन्सच्या विमानाचे अपहरण करणार्‍या आतंकवाद्यांमध्ये लतिफचा समावेश असल्याचाही आरोप आहे.

तत्कालीन काँग्रेस सरकारने लतिफ याला ‘सद्भावना’ म्हणून पाककडे सोपवले होते !

शाहिद सियालकोट भागातील जैश-ए-महंमदचा मोठा कमांडर होता. त्याला भारताने अटक केल्यानंतर शिक्षा सुनावली होती. वर्ष २०१० मध्ये शिक्षा पूर्ण झाल्यावर भारताने त्याचे पाकिस्तानकडे सद्भावनेच्या अंतर्गत प्रत्यार्पण केले होते. पाकमध्ये गेल्यानंतर त्याने पुन्हा भारतात आतंकवादी कारवाया चालू केल्या होत्या.