ऑक्टोबरच्या शेवटी गगनयान मोहिमेची चाचणी

बेंगळुरू (कर्नाटक) – गगनयान मोहिमेच्या अंतर्गत भारताकडून अंतराळवीरांना अंतराळ पाठवण्यात येणार आहे. या संदर्भातील भारतीय अंतराळ संशोधन संस्थेकडून (‘इस्रो’कडून) ऑक्टोबर मासाच्या शेवटी ‘क्रू एस्केप सिस्टम’ची चाचणी करण्यात येणार आहे. ‘क्रू एस्केप सिस्टीम’ म्हणजे गगनयान मोहिमेच्या वेळी कोणतीही समस्या उद्भवल्यास रॉकेटमधील अंतराळवीर पृथ्वीवर सुरक्षितपणे पोचू शकतील.

या चाचणीविषयी इस्रोचे शास्त्रज्ञ आणि ‘इस्रो इनर्शिअल सिस्टम्स युनिट’चे संचालक पद्मा कुमार म्हणाले की, क्रू एस्केप सिस्टम अंतराळवीरांना रॉकेटपासून दूर नेईल. या प्रणालीच्या चाचणीसाठी चाचणी वाहन सिद्ध करण्यात आले आहे. गगनयान मोहिमेच्या पहिली मानवरहित मोहीम पुढील वर्षाच्या प्रारंभी राबवण्यात येणार आहे. मानवरहित योजना म्हणजे अंतराळात मानव पाठवला जाणार नाही. मानवरहित मोहिमेच्या यशानंतर एक मानवयुक्त प्रकल्प असेल, ज्यामध्ये मानव अंतराळात जाईल.

३ अंतराळवीर ४०० किमी अंतरापर्यंत जातील आणि ३ दिवसांनी परततील !

‘गगनयान’मध्ये ३ सदस्यांचे पथक ३ दिवसांच्या मोहिमेसाठी पृथ्वीच्या ४०० किमी वरच्या कक्षेत पाठवले जाईल. यानंतर त्यांचे यान समुद्रात सुरक्षितपणे उतरवले जाईल. जर भारत या योजनेमध्ये यशस्वी झाला, तर असे करणारा भारत चौथा देश ठरेल. याआधी अमेरिका, चीन आणि रशिया यांनी हे साध्य केले आहे. गगनयान मोहिमेसाठी अंदाजे ९ सहस्र कोटी रुपयांची रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.