शिवणकाम करणार्‍याचा विश्‍वासघाताने शिरच्छेद होणे, हे राजस्थानमधील सर्वांत मोठे पाप !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कन्हैयालाल यांच्या हत्येवरून काँग्रेस सरकारला सुनावले !

चित्तोडगड (राजस्थान) – काँग्रेस सरकार लोकांचे प्राण आणि संपत्ती यांचे रक्षण करू शकत नाही. त्यामुळे अशा सरकारला हटवणे आवश्यक आहे. उदयपूरमध्ये काही मासांपूर्वी जे झाले, त्याची कल्पनाही कुणी केली नव्हती. ज्या राजस्थानमध्ये शत्रूवरही विश्‍वासघाताने आक्रमण करण्याची परंपरा नाही, त्या राजस्थानच्या भूमीवर एका शिवणकाम करणार्‍या व्यक्तीला (कन्हैयालाल यांना) कपडे शिवण्याच्या उद्देशाने येऊन कोणत्याही धाकाविना त्याचा शिरच्छेद करण्यात आला. राजस्थानमध्ये हे सर्वांत मोठे पाप झाले आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानमधील काँग्रेस सरकारवर टीका केली. ते येथे ७ सहस्र कोटी रुपयांच्या एका प्रकल्पाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात बोलत होते.

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, मी अत्यंत दुःखी मनाने सांगत आहे की, जेव्हा गुन्हेगारीची चर्चा होते, तेव्हा राजस्थान वरच्या क्रमांकावर येतो. आज जेव्हा अराजकता, दंगली, दगडफेक आदी गोष्टींची चर्चा होते, तेव्हा राजस्थानचे नाव अपकीर्त होते. महिला, दलित आणि मागासवर्गीय यांच्यावरील अत्याचारांच्या घटनांमध्ये राजस्थान सर्वाधिक अपकीर्त होत आहे.