शरद पवार सत्तेत असतांना मराठ्यांना आरक्षण का नाही ? – मुनगंटीवार

मुंबई – धनगर समाजाच्या उपोषणाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार कधी का गेले नाहीत ? शरद पवार सरकारमध्ये असतांना मराठा समाजाला आरक्षण का मिळाले नाही ? असा प्रश्न वन आणि सांस्कृतिक कार्यमंत्री तथा भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी ३० सप्टेंबर या दिवशी उपस्थित केला आहे. या प्रश्नाचे उत्तर शरद पवार यांनी कधीच दिलेले नाही. वास्तविक शरद पवार हे वर्ष १९६० पासून मराठा आरक्षणाविषयी आश्वासने देत आहेत. ते मराठा समाजाला आरक्षण देण्यात अपयशी ठरले आहेत. त्यामुळेच ते हे दायित्व आमच्यावर टाकत आहेत, अशी घणाघाती टीकाही त्यांनी केली.

सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, सरकार आणि ओबीसी प्रतिनिधी यांच्या बैठकीत संवाद साधण्यात येत आहे. त्यांचा प्रश्नही लवकरच मार्गी निघेल. सरकार मराठा आणि ओबीसी आंदोलनाविषयी गंभीर आहे. दोघांनाही स्पष्टता आणि समाधान देण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. जरंडेश्वर साखर कारखान्याच्या अध्यक्षा श्रीमती शालिनीताई पाटील यांना एका मागणीसाठी पक्षातून का काढले ? याचे उत्तर पवार यांनी कधीच दिले नाही.

सध्या महाराष्ट्रात काही राजकीय पक्षांचे नेते अस्थिरता निर्माण व्हावी, यासाठी पूर्ण शक्तीने प्रयत्न करत असतात. त्यांना वाटते की, अस्थिरतेच्या पायर्‍यांवरच त्यांची सत्ता निर्माण होऊ शकते. सध्याची राजकीय स्थिती पाहिली, तरी सध्या कोण अस्थिरता निर्माण करत आहे ? हे लक्षात येते.