रत्नागिरी जिल्ह्यात गणेशोत्सवाच्या कालावधीत महत्त्वाच्या दिवशी मद्य आणि माडी विक्री बंद रहाणार !

रत्नागिरी – जिल्ह्यात गणेशोत्वसाच्या कालावधीत श्री गणेशचतुर्थी (१९ सप्टेंबर), ज्येष्ठा गौरीविसर्जन ( २३ सप्टेंबर) आणि अनंत चतुर्दशी (२८ सप्टेंबर) या तीन महत्त्वाच्या दिवशी जिल्ह्यातील सर्व देशी, तसेच विदेशी मद्य आणि माडी विक्री अनुज्ञप्ती संपूर्ण दिवस बंद रहातील, असे आदेश जिल्हाधिकारी एम्. देवेंदर सिंह यांनी दिले आहेत.

वर्ष २०२३ मध्ये १९ ते २८ सप्टेंबर २०२३ या कालावधीत गणेशोत्सव साजरा होणार आहे. गणेशोत्सवाच्या कालावधीत रत्नागिरी जिल्ह्यात शांतता आणि सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने, मुंबई मद्य निषेध अधिनियम १९४९ चे कलम १४२ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून, जिल्हाधिकारी सिंह यांनी वरील आदेश दिले आहेत.


या आदेशाची कार्यवाही काटेकोरपणे करावयाची असून यामध्ये कसूर केल्यास संबंधित अनुज्ञप्तीधारकांविरुद्ध मुंबई मद्य निषेध अधिनियम, १९४९ मधील तरतुदींनुसार कारवाई करण्यात येईल, याची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी सिंह यांनी केले आहे