स्वातंत्र्यदिनी देशात आतंकवादी कारवाया घडवण्याचा हिजबुल मुजाहिदीनचा कट उत्तरप्रदेश पोलिसांनी उधळला !

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – भारताच्या स्वातंत्र्यदिनी म्हणजे १५ ऑगस्टला देशात आतंकवादी कारवाया घडवून आणण्याचा कट हिजबुलच्या आतंकवाद्यांनी रचला होता. उत्तरप्रदेशचे आतंकवादविरोधी पथक हिजबुल मुजाहिदीनचा अटकेत असलेला आतंकवादी अहमद रझा याची चौकशी करत आहे. या चौकशीत अहमद रझा याने अनेक गुपिते उघड केली. या चौकशीत सामाजिक माध्यमांतील संभाषण, आतंकवादी प्रशिक्षण, पाकिस्तानपासून तालिबानी संबंध याविषयी खुलासे झाले आहेत. चौकशीच्या वेळी रझा आणि त्याचे साथीदार यांनी भारतात आतंकवादी कारवाया घडवून आणण्याचा कट रचल्याचे समोर आले आहे. या माहितीवरून पोलिसांनी कारवाई केल्यामुळे हा कट उधळला.

१. अहमद रजा याच्याकडून मिळेल्या माहितीच्या आधारावर आतंकवादविरोधी पथकाने त्याच्या घराजवळून काही शस्त्रे जप्त केली आहेत. पाकिस्तानी आतंकवाद्याशी संपर्क साधल्याचे उघड झाल्यानंतर अहमद रजाला अटक करण्यात आली होती.

२. आतंकवादी अहमद रझा हा जैश-ए-महंमदचा पाकिस्तानी आतंकवादी वालीद याच्या संपर्कात होता. त्याच्या सल्ल्यानुसार त्याने स्वयंचलित पिस्तूल खरेदी केले होते.

स्वातंत्र्यदिनानिमित्त देहलीत कडक सुरक्षाव्यवस्था

नवी देहली – स्वातंत्र्यदिनानिमित्त देहलीत सुरक्षाव्यवस्था कडक करण्यात आली आहे. लाल किल्ला आणि राजघाट यांसह राजधानीच्या कानाकोपर्‍यांत कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. (स्वातंत्र्य मिळून भारताला ७६ वर्षे झाली आहेत. तरीही स्वातंत्र्यदिनी राजधानीत कडेकोट बंदाबस्त का ठेवावा लागतो ? – संपादक) भारत १५ ऑगस्ट या दिवशी ७७ वा स्वातंत्र्यदिन साजरा करणार आहे. या सोहळ्याची देशभरात जय्यत सिद्धता चालू आहे. देशाची राजधानी देहलीत मुख्य कार्यक्रम होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावर राष्ट्रध्वज फडकावतील आणि देशाला संबोधित करतील.

संपादकीय भूमिका

स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही आतंकवादाच्या सावटाखाली स्वातंत्र्यदिन साजरा करावा लागणे, हे लज्जास्पद !