छत्तीसगडच्या बालोद जिल्ह्यातील अनेक गावांत ख्रिस्त्यांकडून हिंदूंच्या धर्मांतरचे वाढते प्रकार !

धानोरा, सिवनी, गंजपारा, बालोदगहन आदी अनेक गावांत हिंदूंचे झाले धर्मांतर !

बालोद (छत्तीसगड) – जिल्ह्यातील धानोरा गावात प्रत्येक शनिवारी आणि रविवारी हिंदूंच्या धर्मांतराचे प्रकार मोठ्या प्रमाणात घडत असल्याचे समोर आले आहे. या दिवशी प्रार्थनासभांच्या नावाखाली हिंदूंचे धर्मांतर केले जात आहे. यासाठी धमतरी जिल्ह्यातून अनेक लोक येत असतात, असा आरोप गावकर्‍यांनी केला आहे. लोकांचे आजार बरे करून त्यांच्या जीवनात सर्वकाही चांगले करण्याचा दावा या सभांमधून केला जातो. या माध्यमातून अनेक हिंदूंचे धर्मांतर केले गेले आहे.

१. प्रार्थना सभेच्या स्थळापासून दुसरे घर हे काँग्रेसचे समर्थन असलेल्या पंचायत सदस्या ललिता पीमन साहू यांचे आहे. सभा आयोजित करणार्‍यांचे नाव नरेंद्र साहू असून ते मूळ हिंदू आहेत. या सर्व प्रकारामुळे गावकरी संतप्त झाले आहेत.

२. अशाच प्रकारे बालोद जिल्ह्यातील अटल आवास, गंजपारा, शिव कॉलनी, तसेच जिल्ह्यातील अनेक ग्रामीण भागात धर्मांतराचे प्रयत्न मोठ्या प्रमाणात होत आहेत.

३. काही मासांपूर्वी बालोदगहन, तसेच सिवनी या गावांत झालेल्या ‘चंगाई सभे’तही अनेक हिंदूंचे धर्मांतर करण्यात आले होते. सिवनी गावाच्या ग्रामस्थांनी या वेळी जिल्हाधिकारी कार्यालयाभोवती गराडा घालून धर्मांतराच्या विरोधात कारवाई करण्यासाठी निवेदन सादर केले होते.

४. या संदर्भात काँग्रेसचे नेते कुंवर सिंह निषाद म्हणाले की, राज्यात १५ वर्षे भाजप सत्तेत असतांनाच धर्मांतराचे प्रकार समोर आले होते. आमचे सरकार धर्मांतराचे सूत्र अत्यंत गंभीरपणे घेते. (असे आहे, तर काँग्रेस राज्यात धर्मांतरबंदी कायदा का करीत नाही ? – संपादक)

५. दुसरीकडे भाजपचे प्रवक्ते देवलाल ठाकुर यांनी काँग्रेसवर आरोप केला की, सरकार संस्कृती आणि संस्कार यांचे रक्षण करण्याचे केवळ नाटक करते. दुसरीकडे हिंदूंचे धर्मांतर घडवून आणणार्‍यांना आश्रय देते. काँग्रेसच्या सत्ताकाळात धर्मांतराचे प्रकार वाढले असून विविध प्रकारचे मिशनरी राज्यात भोळ्याभाबड्या हिंदूंचे धर्मांतर करत फिरत आहेत.

संपादकीय भूमिका

  • काँग्रेसशासित छत्तीसगडमध्ये धर्मांतरासाठी ख्रिस्त्यांना मोकळे रानच मिळाले आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये ! हिंदूंचे धर्मांतर रोखण्यासाठी आता राष्ट्रव्यापी धर्मांतरबंदी कायदा करणेच आवश्यक !
  • हिंदूंचे धर्मांतर रोखण्यासाठी त्यांच्यामधील धर्माभिमान वाढणे आवश्यक आहे. यासाठी धर्मशिक्षण हाच एकमेव पर्याय आहे, हे जाणा !