कन्हैयालाल यांच्या हत्येला एक वर्ष उलटल्यानंतरही कुटुंबियांवरील तणाव कायम !

  • एक वर्षानंतरही अस्थींचे केले नाही विसर्जन !

  • आरोपींना फाशीची शिक्षा होईपर्यंत चपला न घालण्याचा मुलाचा पण !

  • कुटुंबियांना आजही आहे पोलीस संरक्षण !

  • जलद गती न्यायालयात खटला चालवून आरोपींना शिक्षा करण्याचे आश्‍वासन सरकारने पाळले नसल्याचाही आरोप

उदयपूर (राजस्थान) – येथे गेल्या वर्षी कन्हैयालाल यांची धर्मांध मुसलमानांनी त्यांच्या दुकानात शिरच्छेद करून हत्या केली होती. या हत्येचे चित्रीकरण करून त्याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित केला होता. भाजपच्या तत्कालीन प्रवक्त्या नूपुर शर्मा यांचे समर्थन केल्यावरून त्यांची हत्या करण्यात आली होती. नूपुर शर्मा यांनी महंमद पैगंबर यांचा कथित अवमान केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. आता एक वर्षानंतरही ज्या बाजारात कन्हैयालाल यांचे दुकाने होते त्या बाजारात तणावयुक्त शांतता आहे. येथे जवळपास ३०० दुकाने आहेत. पूर्वी येथे मोठी गर्दी होत असे; मात्र आता तेथे कुणी फिरकत नाही. येथील दुकानदारांमध्ये अद्यापही भीती आहे. ज्या गल्लीमध्ये कन्हैयालाल यांचे दुकान होते, तेथील अन्य दुकाने आता रिकामीच आहेत. कन्हैयालाल यांचे कुटुंबीय अद्यापही तणावात आहेत. त्यांना पोलीस संरक्षण देण्यात आले आहे.

१. येथील दुकानदारांचे म्हणणे आहे की, आम्ही आणि आमचे कुटुंबीय अद्यापही भीतीच्या सावटाखाली वावरत अहोत. येथील बहुतेक व्यापारी त्यांची दुकाने सोडून गेले आहेत. काही जणांच्या दुकानांना टाळे लावण्यात आले आहे. पूर्वी येथील दुकाने रात्री १० पर्यंत उघडी रहात होती. आता सायंकाळी ६ वाजताच ती बंद करून दुकानदार निघून जातात. जे दुकानदार येथे आहेत, तेही दुसरीकडे दुकान उघडण्याचा विचार करत आहेत.

२. काही दुकानदारांचे म्हणणे आहे की, येथील व्यापार आता अल्प झाला आहे. काही दुकानांमध्ये एकही ग्राहक येत नाही. येथे गुंडगिरी नसली, तरी पूर्वीप्रमाणे व्यापार होत नाही.

३. दुसरीकडे कन्हैयालाल यांच्या घराबाहेर अद्यापही पोलिसांचे संरक्षण आहे. कुटुंबियांना कुठेही जायचे असेल, तर पोलीस संरक्षणामध्ये जावे लागते. कन्हैयालाल यांच्या अस्थींचे अद्याप विसर्जन करण्यात आलेले नाही. त्यांच्या मुलांनी वाढदिवस साजरा करणे बंद केले आहे. मोठ्या मुलाने चपला घालणे आणि केस कापणे बंद केले आहे. त्याने पण केला आहे की, जोपर्यंत आरोपींना फाशी होत नाही, तोपर्यंत तो चपला घालणार नाही आणि केस कापणार नाही.

४. कन्हैयालाल यांच्या पत्नीचे म्हणणे आहे की, आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर त्यांना आता मारून टाकले पाहिजे. सरकारने जलद गती न्यायालयात खटला चालवण्याचे आणि ६ मासांमध्ये आरोपींना शिक्षा मिळवून देण्याचे आश्‍वासन दिले होते. ते पूर्ण झालेले नाही.

५. या परिस्थितीमुळे नातेवाईक आणि शेजारी यांनी कन्हैयालाल यांच्या घरी येणे-जाणे बंद केले आहे.

संपादकीय भूमिका

भारतात धर्मांधांकडून ठार मारण्यात आलेल्या हिंदूंच्या कुटुंबियांना न्याय मिळत नाही, हे लज्जास्पद ! अशी स्थिती हिंदु राष्ट्राची स्थापना अपरिहार्य करते !