ठाणे येथे ‘बिंदूदाबन उपचार शिबिर’ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले !

डॉ. दीपक जोशी यांच्या मार्गदर्शनानुसार बिंदूदाबन उपचार शिकून घेतांना साधक

ठाणे – आपत्काळात वैद्यकीय साहाय्य समयमर्यादेत मिळणे कठीण असते. अशा वेळी बिंदूदाबन पद्धतीने रुग्णांवर उपचार करता येऊ शकतात. साधकांना बिंदूदाबन शिकवून त्यांना आपत्काळासाठी सिद्ध करण्यासाठी सनातन संस्थेच्या वतीने ठाणे येथे नुकतेच ३ दिवसांचे बिंदूदाबन उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सनातन संस्थेचे साधक आणि निसर्गोपचारतज्ञ डॉ. दीपक जोशी यांनी शिबिरार्थींना मार्गदर्शन केले. या शिबिरामध्ये बिंदूदाबनासह व्यायामाचे महत्त्व, व्यायामाचे प्रकार, आहार-विहार यांच्या योग्य पद्धती आणि बिंदूदाबन याचा एकत्रितपणे लाभ कसा होतो, याविषयीचे मार्गदर्शन करण्यात आले.

मुंबई, ठाणे आणि रायगड येथील सनातन संस्थेचे अनेक साधक या शिबिराला उपस्थित होते, तसेच या वेळी ४० रुग्णांवर प्रत्यक्ष उपचार करण्यात आले. शिबिरस्थळी सनातन संस्थेच्या सद्गुरु अनुराधा वाडेकर आणि पू. (सौ.) संगीता जाधव यांचीही वंदनीय उपस्थिती लाभली. शिबिराचे सूत्रसंचालन कु. सृष्टी सूर्यवंशी यांनी केले. शिबिरात आलेल्या रुग्णांवर गुडघेदुखी, मणक्याचे त्रास, फ्रोजन शोल्डर या त्रासांवर उपचार करण्यात आले. उपचारानंतर त्यांचा त्रास उणावल्याचे रुग्णांच्या लक्षात आले. त्यानंतर शिबिरार्थींनी विचारलेल्या शंकाचे निरसन करण्यात आले.

बिंदूदाबन सहज शिकता येणे, ही परात्पर गुरुदेवांची करुणामय प्रीती आहे ! – सद्गुरु अनुराधा वाडेकर 

आज समाजात अनेक ठिकाणी बिंदूदाबनाचे प्रशिक्षण मिळत असते; पण बिंदूदाबन हे आध्यात्मिक स्तरावर देवाचे साहाय्य घेऊन, प्रार्थना करून आणि भाव ठेवून साधना म्हणून कसे करावे, यादृष्टीने आपल्याला शिकता यावे म्हणून शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरासाठी आपली निवड होणे म्हणजे परात्पर गुरुदेवांचा आपल्यावर असणारा विश्‍वास आणि शिबिरातील विषय सहज शिकता येणे ही त्यांची करुणामय प्रीती आहे.

बिंदूदाबन करून उपचार शिकता येणे ही केवळ सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची आपल्यावरील कृपाच ! – डॉ. दीपक जोशी, निसर्गोपचार तज्ञ

‘बिंदूदाबन उपचारपद्धत साधकांना यायला हवी. साधकांना ही पद्धत शिकवून प्रत्येक साधक हे शिकून स्वयंपूर्ण व्हायला हवा’, असे गुरुमाऊलींचे (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) उद्गार आहेत. त्यामुळे ही उपचारपद्धत शिकणे, ही केवळ त्यांचीच कृपा आहे. त्या माध्यमातून साधकांचे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक त्रास दूर होण्यासाठी गुरुमाऊलींनी संकल्प केला असून आपण सर्वांनी त्याचा लाभ घेऊया.

क्षणचित्र – शिबिराच्या तिसर्‍या दिवशी दुसरे सत्र चालू होण्यापूर्वी विशिष्ट दुर्गंध येऊ लागला, तेव्हा नामजपादी उपाय केल्यावर दुर्गंध दूर झाला. त्यानंतर साधकांना हलकेपणा आणि उत्साह वाटू लागला.