दूरचित्रवाणी – मुले आणि पालक यांच्यावर होणारा परिणाम !

दूरचित्रवाणीमुळे काही प्रमाणात जरी लाभ होत असला, तरी त्याचा कुटुंबावर नेमका काय परिणाम होतो ? याविषयी करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणाचा संपादित लेख येथे देत आहोत. दूरचित्रवाणीमुळे कुटुंबातील आपापसांतील संवाद न्यून झाला आहे का ? दूरचित्रवाणीचा व्यक्तीच्या भावना आणि वर्तन यांवर प्रभाव पडतो का ? मुलांमधील आक्रमकता आणि चंचलता वाढली आहे का ? अशा अनेक गोष्टींचा आढावा घेण्यासाठी मनःशक्ती केंद्राने जवळपास १ सहस्र ५०० पालकांकडून प्रश्नावली भरून घेतली. या प्रश्नावलीमध्ये पालकांनी दूरचित्रवाणीच्या अनुषंगाने स्वतःच्या आणि मुलांच्या विषयीच्या प्रश्नांची उत्तरे द्यायची होती. हे पालक म्हणजे ८ ते १४ वर्षे वयोगटांतील मुलांचे पालक. एकूण १ सहस्र ५०० पालकांपैकी ७०० पालकांच्या प्रश्नावलीचे विश्लेषण करण्यात आले; पण या प्राथमिक विश्लेषणातूनही पुष्कळ माहिती पुढे आली.

प्रातिनिधिक छायाचित्र

प्राथमिक निष्कर्ष आणि टिप्पणी

१. ७१ टक्के मुलांचा २ घंटे किंवा त्यापेक्षा अधिक वेळ दूरदर्शन (दूरचित्रवाहिन्या) पहाण्यात जातो. त्यापैकी २१ टक्के मुले ३ ते ४ घंटे दूरदर्शन पहातात, ही चिंतेची गोष्ट आहे.

२. ८४ टक्के मुले जेवतांना दूरदर्शन पहातात. मुलांचे जेवणाकडे लक्ष नाही. त्यामुळे अधिक खाल्ले जाते. मुलांची जाडी वाढण्याचे प्रमाण वाढले आहे, याचे कारण हे असू शकते. यावरून आरोग्यावर परिणाम झाल्याचे लक्षात येते.

३. अनुमाने ५७ टक्के पालक असे म्हणतात की, त्यांचा मुलांसमवेतचा वेळ न्यून झाला आहे. तसेच ५२ टक्के पालक असे म्हणतात की, दूरदर्शनमुळे त्यांचा मुलांसमवेतचा संवाद न्यून झाला आहे. याचा अर्थ मुले आणि पालक यांमधील संबंध न्यून होण्यास, विसंवाद निर्माण होण्यात, तसेच पालकांचा अमूल्य वेळ (क्वालिटी टाईम) मुलांना मिळण्यात दूरदर्शनचा मोठा अडथळा निर्माण होत आहे.

४. मुले अभ्यास करतांना अनुमाने २२ टक्के पालक दूरचित्रवाणी पहातात. या पालकांनी मुले अभ्यास करतांना दूरचित्रवाणी पहाणे सोडल्यास मुलांच्या अभ्यासासाठी त्यांच्या घरात पोषक वातावरण निर्माण होईल.

५. दूरचित्रवाणीमुळे मुलांची चंचलता वाढली आहे, असे मत ७५ टक्के पालक नोंदवतात. २० टक्के मुले अभ्यास करतांना दूरचित्रवाणी पहातात, तसेच ८५ टक्के मुले दूरचित्रवाणीवर कार्टून बघतात. अशा मुलांचे ना अभ्यासात लक्ष असते, ना कोणत्याही कामात आणि लक्षपूर्वक कृतीचा अभाव अन् अतीसक्रीयता विकार या समस्या वाढत चालल्या आहेत. परिणामी मुले चंचल आणि आक्रमक बनत चालली आहेत. याचे एक कारण ‘दूरचित्रवाणी’ आहे, असा प्राथमिक निष्कर्ष या टक्केवारीवरून निघतो.

६. ६६ टक्के पालक असे म्हणत आहेत की, दूरचित्रवाणीमुळे घरामध्ये मतभेद आणि भांडणे होतात. ८५ टक्के पालकांना असे वाटते की, दूरचित्रवाणीमुळे मुलांमध्ये निराशा आणि चिडखोरपणा वाढला आहे. तसेच दूरचित्रवाणीमुळे मुलांमध्ये हट्टीपणा, आक्रमकता आणि अनुकरणप्रियता वाढली आहे, अशी पालक प्रश्नावलीत नोंद करतात. यावरून असे वाटते की, कौटुंबिक स्वास्थ्य बिघडण्यात, तसेच मुलांमध्ये भावनात्मक आणि वर्तनात्मक पालट होण्यात दूरचित्रवाणीचा मोठा सहभाग आहे.

७. ‘विज्ञापनांचा परिणाम मुलांवर होतो आणि त्यामुळे मुले हट्टी बनली आहेत’, असे ४४ टक्के पालक सांगतात.

८. अनुमाने ५० टक्के पालक २ घंटे किंवा त्यापेक्षा अधिक वेळ दूरचित्रवाणी पहातात, तसेच ५७ टक्के पालक दूरचित्रवाणीवरील मालिका पहातात. ५८ टक्के पालक स्वतःविषयी सांगतांना असे म्हणतात की, दूरिचत्रवाणीमुळे आमच्यामध्ये भावनात्मक आणि वर्तनात्मक पालट होतो. यावरूनच असे दिसते की, स्वतःचे मन, भावना आणि वर्तन यांवर दूरचित्रवाणीचे अधिराज्य चालू आहे.

– श्री. मयूर चंदने (संदर्भ – sanatanprabhat.org)