व्यक्तीला साधनेमुळे होणारा आध्यात्मिक स्तरावरील लाभ तिच्या स्त्री किंवा पुरुष असण्यावर अवलंबून नसणे

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी

‘साधना करणार्‍या व्यक्ती स्त्री किंवा पुरुष असल्यामुळे, म्हणजे त्यांच्या केवळ लिंगभेदामुळे त्यांना साधनेमुळे होणार्‍या आध्यात्मिक स्तरावरील लाभामध्ये भेद असतो का ?’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी २७ एप्रिल २०२२ या दिवशी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने चाचणी करण्यात आली. या चाचणीसाठी आध्यात्मिक त्रास नसलेल्या २ स्त्रिया (साधिका) आणि २ पुरुष (साधक), अशा एकूण ४ जणांना निवडले होते. त्यांची ‘आध्यात्मिक पातळी (टीप १) ६० टक्क्यांपेक्षा अल्प किंवा अधिक असणे’, या घटकांचा विचार करून दोन समान गट केले. प्रत्येक गटात ‘एक स्त्री आणि एक पुरुष’, असे दोघे जण होते. त्यांना ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय’ हा नामजप ३० मिनिटे एकाग्रतेने करण्यास सांगण्यात आले. नामजपाच्या पूर्वी आणि त्याच्या नंतर ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ उपकरणाद्वारे त्यांच्या चाचण्या करण्यात आल्या. या चाचण्यांतील निरीक्षणांचे विवेचन आणि लक्षात आलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

यु.ए.एस्. उपकरणाद्वारे चाचणी करतांना श्री. आशिष सावंत

टीप १ – आध्यात्मिक पातळी : ईश्वराची आध्यात्मिक पातळी जर १०० टक्के मानली आणि निर्जीव वस्तूंची १ टक्का मानली, तर सर्वसाधारण मनुष्याची आध्यात्मिक पातळी २० टक्के असते. साधनेमुळे आध्यात्मिक पातळी जेव्हा ६० टक्के होते, तेव्हा ती व्यक्ती मायेपासून अलिप्त होऊ लागते. तिच्या मनोलयाला आरंभ होतो आणि विश्वमनातील विचार ग्रहण होऊ लागतात. मृत्यूनंतर ती जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून सुटून तिला महर्लाेकात स्थान प्राप्त होते. आध्यात्मिक पातळी ७० टक्क्यांहून अधिक असणार्‍यांना ‘संत’ म्हणतात.

१. चाचणीतील निरीक्षणे 

२. चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन

सारणीतील निरीक्षणांतून पुढील सूत्रे लक्षात येतात.

श्री. रूपेश रेडकर

२ अ. आध्यात्मिक पातळी ६० टक्क्यांपेक्षा अल्प असलेल्यांची नकारात्मक ऊर्जा नामजपाच्या नंतर अल्प होणे : ‘गट १’ मधील आध्यात्मिक पातळी ६० टक्क्यांपेक्षा अल्प असलेल्यांची निरीक्षणे पाहिल्यास नामजपाच्या पूर्वी स्त्रीची नकारात्मक ऊर्जा पुरुषापेक्षा थोडी अधिक होती, तर दोघांच्या सकारात्मक ऊर्जा साधारणपणे एकसारख्याच होत्या.

नामजपाच्या नंतर स्त्री आणि पुरुष दोघांच्याही नकारात्मक ऊर्जांमध्ये घट झाली आणि सकारात्मक ऊर्जांमध्ये पुष्कळ वाढ झाली. स्त्रीच्या नकारात्मक ऊर्जेत झालेली घट आणि सकारात्मक ऊर्जेत झालेली वाढ, ही पुरुषाच्या तुलनेत थोडी अधिक होती.

२ आ. आध्यात्मिक पातळी ६० टक्क्यांपेक्षा अधिक असलेल्यांची नकारात्मक ऊर्जा नामजपानंतर पूर्णपणे नष्ट होणे : ‘गट २’ मधील आध्यात्मिक पातळी ६० टक्क्यांपेक्षा अधिक असलेल्यांची निरीक्षणे पाहिल्यास नामजपापूर्वी स्त्रीची नकारात्मक ऊर्जा पुरुषापेक्षा थोडी अल्प, तर सकारात्मक ऊर्जा थोडी अधिक होती.

नामजपानंतर स्त्री आणि पुरुष या दोघांच्याही नकारात्मक ऊर्जा शून्य झाल्या आणि सकारात्मक ऊर्जांमध्ये पुष्कळ वाढ झाली. स्त्रीच्या सकारात्मक ऊर्जेत झालेली वाढ ही पुरुषाच्या तुलनेत थोडी अधिक होती.

२ इ. साधनेचा आध्यात्मिक स्तरावरील मिळणारा लाभ लिंगभेदावर अवलंबून नसणे : चाचणीतील चारही घटकांची निरीक्षणे पाहिल्यास केवळ लिंगभेदामुळे स्त्री आणि पुरुष यांच्यातील नकारात्मक किंवा सकारात्मक ऊर्जांच्या प्रमाणांत भिन्नता आहे, असे दिसून येत नाही.

३. व्यक्तींच्या केवळ लिंगभेदामुळे त्यांना साधनेमुळे आध्यात्मिक स्तरावर मिळणार्‍या लाभामध्ये भेद नसणे

साधना करणार्‍या व्यक्ती स्त्री किंवा पुरुष असल्यामुळे, म्हणजे त्यांच्या केवळ लिंगभेदामुळे त्यांना साधनेमुळे आध्यात्मिक स्तरावर होणार्‍या लाभामध्ये भेद नसतो. स्वभावदोष (उदा. चंचलपणा) अल्प असलेल्या आणि साधनेसाठी पूरक गुण (उदा. एकाग्रता) अधिक असलेल्या, म्हणजेच आध्यात्मिक पातळी अधिक असलेल्या व्यक्तींना साधनेचा आध्यात्मिक स्तरावर अधिक लाभ होतो. या चाचणीत हेच दिसून आले.’

– श्री. रूपेश लक्ष्मण रेडकर, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (१४.४.२०२३)

ई-मेल : [email protected]

‘आध्यात्मिक उन्नतीशी निगडित लिंगाच्या आधारे भेदभावाला आव्हान’ हा शोधनिबंध श्रीलंका येथील आंतरराष्ट्रीय परिषदेत सादर !

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’चे ६७ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. शॉन क्लार्क यांनी ‘आध्यात्मिक उन्नतीशी निगडित लिंगाच्या आधारे भेदभावाला आव्हान’, हा शोधनिबंध १४ मे २०२२ या दिवशी श्रीलंका येथे आयोजित ‘द एट्थ वर्ल्ड कॉन्फरन्स ऑन वुमेन्स स्टडीज’ (The 8th World Conference on Women’s Studies (WCWS 2022)) या आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक परिषदेत ‘ऑनलाईन’ सादर केला. या परिषदेचे आयोजन ‘द इंटरनॅशनल इंस्टिट्यूट ऑफ नॉलेज मॅनेजमेंट’ (The International Institute of Knowledge Management) यांनी केले होते. महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हे या शोधनिबंधाचे लेखक असून श्री. शॉन क्लार्क हे सहलेखक आहेत. या शोधनिबंधाला परिषदेत ‘उत्कृष्ट सादरीकरण पुरस्कारा’ने गौरवण्यात आले.