(म्हणे) ‘ख्रिस्ती मिशनर्‍यांच्या धर्मप्रसारामध्ये काहीही अवैध नाही !’ – तमिळनाडूतील द्रमुक सरकार

  • तमिळनाडूतील द्रमुक सरकारचे सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र !

  • ख्रिस्ती मिशनरी अवैधरित्या काही करत नसल्याचाही केला दावा !

(द्रमुक म्हणजे द्रविड मुन्नेत्र कळघम् – द्रविड प्रगती संघ)

चेन्नई (तमिळनाडू) – गेल्या अनेक वर्षांपासून तमिळनाडू राज्यात बलपूर्वक  धर्मांतर केल्याची कुठलीही घटना घडलेली नाही. ख्रिस्ती मिशनर्‍यांच्या धर्मप्रसारामध्ये काहीही अवैध नाही. ते असे करण्यासाठी अवैध मार्गांचा अवलंब करत नाहीत तोपर्यंत ते चुकीचे म्हणता येणार नाही. तसेच लोक ज्या धर्मांचे पालन करू इच्छितात, तो निवडण्याचा त्यांना अधिकार आहे, असे प्रतिज्ञापत्र तमिळनाडूच्या द्रमुक सरकारने सर्वोच्च न्यायालयात सादर केले आहे. भाजपचे नेते आणि अधिवक्ता अश्‍विनी उपाध्याय यांनी या संदर्भात याचिका प्रविष्ट केली आहे. त्यावर सरकारने वरील भूमिका मांडली.

१. अधिवक्ता उपाध्याय यांनी बलपूर्वक धर्मांतराच्या प्रकरणी सीबीआय चौकशीची केलेली मागणी आणि विधी आयोगाला धर्मांतरविरोधी कायद्याचे प्रारूप बनवण्याच्या केलेल्या मागणीला तमिळनाडू सरकारने विरोध केला आहे.

२. सरकारने यात पुढे म्हटले आहे की, धर्मांतरविरोधी कायद्याचा अल्पसंख्यांकांच्या विरोधात चुकीचा वापर होण्याची भीती आहे. गेल्या काही वर्षांपासून तमिळनाडूमध्ये बलपूर्वक धर्मांतर करण्याची कुठलीही घटना घडलेली नाही. अधिवक्ता उपाध्याय यांनी प्रविष्ट केलेली याचिका ही ख्रिस्ती धर्म आणि  विचारधारा यांच्या विरोधात आहे, असा दावा सरकारने केला आहे.

३. सरकारने प्रतिज्ञापत्रात सांगितले की, भारताच्या घटनेतील कलम २५ हे प्रत्येक नागरिकाला स्वतःच्या धर्माचा प्रचाराच्या अधिकाराची हमी देते. त्यामुळे ख्रिस्ती धर्माचा प्रसार करणार्‍या मिशनर्‍यांच्या कामांना कायद्याच्या विरोधात पहाता येत नाही.

संपादकीय भूमिका

  • नास्तिकतावादी द्रमुक सरकारचे हे ख्रिस्ती मिशनरी प्रेमच म्हणावे लागेल ! देशात आमीष आणि बळाचा वापर करून हिंदूंचे धर्मांतर करण्यास ख्रिस्ती मिशनरी सर्वांत पुढे आहेत. हे सूत्र गेल्या ५० वर्षांत ईशान्य भारत ख्रिस्तीबहुल झाल्यावरून लक्षात येत असतांना ‘एखाद्या राज्यात बलपूर्वक धर्मांतर होत नाही’, असे शपथेवर सांगणे, हे कुणालाही पटण्याची शक्यता नाहीच !
  • उद्या तमिळनाडूमध्ये हिंदूंच्या संघटनांनी जागृती करून धर्मांतरितांना पुन्हा हिंदु धर्मात आणण्याची चळवळ चालू केली आणि त्याला कुणी न्यायालयात आव्हान दिले, तर हेच द्रमुक सरकार हिंदु संघटनांचा विरोध करील, यात कुणाला शंका वाटणार नाही !