अवैध प्रवासी वाहतुकीवर कारवाई करण्‍यास प्रादेशिक परिवहन मंडळाची टाळाटाळ !

अशी टाळाटाळ करून कर्तव्‍यचुकारपणा करणार्‍या संबंधितांना वेळीच खडसवा !

कोल्‍हापूर – खासगी ट्रॅव्‍हल्‍सकडून होणारी प्रवाशांची आर्थिक लूट रोखण्‍यासाठी परिवहन आयुक्‍तांनी दिलेल्‍या आदेशाची तत्‍परतेने कार्यवाही करण्‍यात यावी, या मागणीसाठी कोल्‍हापूर प्रादेशिक परिवहन अधिकारी यांना सुराज्‍य अभियानाच्‍या वतीने ५ एप्रिलला निवेदन देण्‍यात आले होते. साहाय्‍यक प्रादेशिक परिवहन अधिकारी
यांनी ‘यावर तात्‍काळ कारवाई करावी’, असा आदेश काढला होता. प्रत्‍यक्षात मात्र या आदेशानंतर प्रादेशिक परिवहन मंडळाकडून (अधिकारी आणि कर्मचारी यांच्‍याकडून) यावर कोणतीही कारवाई न होता अवैध प्रवासी वाहतुकीवर कारवाई करण्‍यास टाळाटाळच दिसून आली.

१. ‘या संदर्भात किती अवैध प्रवासी वाहतुकीवर अधिक दर आकारण्‍याविषयी कारवाई करण्‍यात आली ?’, असे विभागात विचारले असता अशी कोणतीच आकडेवारी उपलब्‍ध नव्‍हती. यातील संबंधित अधिकार्‍याने ‘एक मासानंतर आकडेवारी मिळेल’, असे सांगितले.

२. ‘आतापर्यंत किती तक्रारींवर कारवाई करण्‍यात आली ?’, अशी विचारणा एका अधिकार्‍यांकडे केल्‍यावर ‘विशेष कुणी प्रवासी आमच्‍याकडे तक्रार करत नाही. जो तक्रार करतो, त्‍यात अपुरी माहिती असते. त्‍यामुळे अधिक दराने आकारणी करणार्‍या ट्रॅव्‍हल्‍सवर कारवाई करण्‍यात येत नाही’, असे संबंधित अधिकार्‍यांनी सांगितले.

३. ‘अनेक ठिकाणी दरपत्रक नाहीत, तसेच प्रादेशिक परिवहन मंडळ स्‍वत:हून कारवाई का करत नाही ?’, अशी विचारणा केल्‍यावर संबंधित अधिकार्‍यांनी ‘आमच्‍याकडे तक्रार आली, तरच आम्‍ही कारवाई करतो. प्रवाशांची वाढलेली संख्‍या विचारता घेता एस्.टी. पुरेशी आहे का ? विमानाचे दर जसे वाढत जातात, तसेच खासगी गाड्यांचे वाढतात, असे खासगी ट्रॅव्‍हल्‍सवाले सांगतात. जेवढ्या तक्रारी येतात, त्‍यांच्‍यावर आम्‍ही कारवाई केलेली आहे’, असे उत्तर दिले.

संपादकीय भूमिका

कारवाईची आकडेवारी सांगण्‍यातही चालढकलपणा ! अवैध प्रवासी वाहतुकीवर कारवाई करण्‍यास टाळाटाळ करणार्‍या अधिकार्‍यांचे त्‍यांच्‍याशी संगनमत आहे का ?