‘महाराष्ट्रात गोहत्या, लव्ह जिहाद आणि धर्मांतरण यांविषयीचे कायदे त्वरित करा ! – सकल हिंदु समाज

रत्नागिरीत विराट हिंदू गर्जना मोर्च्यामुळे वातावरण भगवेमय

धनंजय देसाई

रत्नागिरी, १५ एप्रिल (वार्ता.) – शहरात १५ एप्रिलच्या सायंकाळी ‘लव्ह जिहाद’, ‘लँड जिहाद’, गोहत्या, धर्मांतरण या विरोधात सकल हिंदु समाजाच्या वतीने विराट ‘हिंदू गर्जना मोर्चा’ काढण्यात आला. सहस्रो हिंदु बंधू-भगिनी मोर्च्यात सहभागी झाले, तर मोर्च्याच्या शेवटी लक्ष्मीचौक येथे झालेल्या सभेला विराट गर्दी झाली. ‘महाराष्ट्रात गोहत्या, लव्ह जिहाद आणि धर्मांतरण याविषयीचे कायदे त्वरित व्हावेत’, अशी मागणी या वेळी करण्यात आली. या मागणीसाठी महाराष्ट्रात ४० मोर्चे काढण्यात आले.

भगवे ध्वज, पांढरा झब्बा, पायजमा अशी पारंपरिक वेशभूषा करून मोर्चेकरी या मोर्च्यात सहभागी झाले. मोर्च्याच्या प्रारंभी मारुति मंदिर येथे हनुमंताची आरती करण्यात आली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार करत त्यांच्या पूर्णाकृती मूर्तीचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या मोर्च्यामध्ये जातीपाती, भेद आणि पक्षभेद विसरून हिंदु धर्मीय एकत्र आले. या मोर्चादरम्यान पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

श्री शिवतीर्थ मारुति मंदिर, माळनाका, जयस्तंभ, राम आळी, गोखले नाका या मार्गावरून शेवटी मोर्चा स्वातंत्र्यवीर लक्ष्मी चौक, गाडीतळ येथे पोचला. ‘कोणती हिंदु मुलगी अथवा महिला ‘लव्ह जिहाद’ला कोणत्या क्षणी बळी पडेल, याची शाश्वती उरलेली नाही, असे सांगत हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी हिंदु महिलांनी एकी दाखवली. त्यामुळे या मोर्च्यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती.

घोषणांनी आसमंत दुमदुमले

हिंदू गर्जना मोर्चामध्ये ‘जय भवानी जय शिवाजी’ अशा घोषणांनी आसमंत दुमदुमले, तसेच ‘गोहत्या बंदी, हीच हिंदु राष्ट्राची नांदी’, ‘हिंदूनो आपल्या भागातील तरुणी ‘लव्ह जिहाद’ला बळी पडू नये यासाठी कटीबद्ध व्हा, ‘धर्मरक्षण करा’, ‘लव्ह जिहाद’ प्रतिबंधक कायदा झालाच पाहिजे, धर्मांतरण प्रतिबंधक कायदा झालाच पाहिजे, गाय हमारी माता है, असे फलक मोर्चेकर्‍यांनी झळकावले होते.

रत्नागिरीमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर भवन बांधा ! – धनंजय देसाई

रत्नागिरीत मुसलमानांची संख्या वाढत आहे, त्यांचे लांगूलचालन करणारे उर्दू भवन बांधण्याचे पाप केले जात आहे. रत्नागिरीमध्ये उर्दू भवन होता कामा नये. रत्नागिरीमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर भवन बांधा, भागोजी शेठ कीर भवन, टिळक भवन बांधा; मात्र येथे उर्दू भवन नको. केरळमध्ये जाळपोळ करणार्‍या आतंकवाद्याला रत्नागिरी पोलिसांनी पकडले, हे पोलीस कौतुकास पात्र आहेत. काँग्रेस राजवटीमध्ये पोलिसांच्या हातात एके -४७ असूनही त्यांचे कसे हाल झाले ? हे सांगून तुम्ही आम्हाला घाबरवू नका. शिवाजी महाराजांनी अफझलखानाचे थडगे बांधायला जागा दिली; कारण हे थडगे पुढच्या वंशजांना प्रेरणा देत रहावे की, ही माती देशद्रोही, धर्मद्रोही आणि जिहादी अतिरेक्यांना गाडणारी आहे, पूजणारी नव्हे. ‘तुम्ही जर हिंदु धर्माच्या बाजूने असाल, तरच देशातील लाखो हिंदू तुमच्या पाठीशी उभे रहातील.’

‘लव्ह जिहाद’ हा हिंदु धर्म, संस्कृती आणि कुटुंबावरील घाला ! -योगिताताई साळवी, उपसंपादक, तरुण भारत, मुंबई


रत्नागिरीला लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर या महान विभूतींच्या कार्याचा वारसा असतांना येथील महिला मात्र ‘लव्ह जिहाद’ला बळी पडत आहेत. आम्हाला ‘लव्ह’ ठाऊक आहे, ‘जिहाद’ ठाऊक नाही. लाखो मुली ज्या ‘लव्ह जिहाद’ला बळी पडत आहेत, त्यातील अनेकांना हा ‘लव्ह जिहाद’ माहिती नाही. ‘लव्ह जिहाद’ हा हिंदु धर्म, संस्कृती आणि कुटुंबावरील घाला आहे. त्यामुळे यापुढे येथील एकही मुलगी ‘लव्ह जिहाद’ला बळी पडता कामा नये. ‘लव्ह जिहाद काय असतो ?’, असे जेव्हा मुली मला विचारतात, तेव्हा मला त्याचे आश्चर्य वाटत नाही; कारण खासदार सुप्रिया सुळे, अबू आजमी, जितेंद्र आव्हाड यांनाही ‘लव्ह जिहाद’ माहिती नाही. ज्यांच्या मुली किड्या-मुंग्यांप्रमाणे मारल्या गेल्यात, त्यांनाच ‘लव्ह जिहाद’चे दुःख कळते आणि तेच त्याच्या विरोधात आवाज उठवू शकतात. त्यामुळे ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा झालाच पाहिजे. सत्तेसाठी लांगूलचालन करणारेच याला विरोध करतील !, असे विचार योगिताताई साळवी यांनी मांडले.

हिंदु धर्मावरील आघातांना सामोरे जाण्यासाठी धर्माचरण हवे ! – विनय पानवळकर, हिंदु जनजागृती समिती

विनय पानवळकर

श्री. विनय पानवळकर म्हणाले की, सध्या असलेले १८ प्रकारचे जिहाद, हे धर्मांतराचे माध्यम आहेत. आधी धर्मांतर करून नंतर संपूर्ण राष्ट्राचे धर्मांतर करायचे, ही संकल्पना सत्यात आणण्यासाठी मागील शतक ख्रिस्ती आणि मुसलमान कार्य करत आहेत. एखाद्या व्यक्तीचे धर्मांतर होते, तेव्हा ती व्यक्ती तिच्या समाजापासून सामाजिक, आर्थिक, धार्मिक सगळ्याच गोष्टींपासून दूर होते; म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणाले होते की, धर्मांतर हे राष्ट्रांतर आहे. धर्मांतर होण्याचे मुख्य कारण म्हणजे हिंदूंमध्ये असलेला धर्माविषयीच्या स्वाभिमानाचा अभाव, धर्मशिक्षणाचा अभाव. धर्माच्या शिक्षणापासून आम्हाला स्वातंत्र्यापूर्वीपासूनच वंचित ठेवले गेले. हे धर्मयुद्ध जिंकण्यासाठी आपल्यामध्ये धर्माची शक्ती निर्माण होणे आवश्यक आहे. आपल्यापैकी प्रत्येकाने हिंदु धर्माचे शिक्षण घेणे, समाजात जाऊन त्याचा प्रचार करायला हवा. धर्माची कास धरून धर्माचरण करायला हवे.

७० वर्षांतील संभ्रमित हिंदु भानावर येतोय ! – धनंजय देसाई, हिंदु राष्ट्र सेना

धनंजय देसाई

श्री. धनंजय देसाई म्हणाले की, महाराष्ट्रात आतापर्यंत ४० मोर्चे निघाले. सर्व मोर्च्यांमध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती. ७० वर्षांतील संभ्रमित हिंदु आता भानावर येतोय. ‘सनातन संस्थे’सारख्या आध्यात्मिक संस्थांनी केलेली आध्यात्मिक क्रांती आपल्या हिंदु धर्माच्या सद्याच्या चित्राचे आणि चरित्राचे शुद्धीकरण करून आता लोक साधना करत आहेत. समर्थ रामदासस्वामींनी शिवाजी महाराजांना केलेल्या मार्गदर्शनानुसार भगवंताच्या अधिष्ठानाचा सत्तर वर्षांतील अभावाचे आता प्रभावामध्ये परिवर्तित होत आहे.

हिंदूंचा लढा हा भारतातील भारतियत्व टिकवण्यासाठी हिंदूंचे अस्तित्व आवश्यक आहे. हिंदूंच्या हिंदुस्थानात हिंदुत्वाचा जयजयकार होणारच आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारताशी विश्वासघात होईल, असे अपवित्र कार्य केले नाही. त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारून जिहाद आणि ख्रिस्ती धर्म मात्र नाकारला.