भारताच्या १२ सहस्र सरकारी संकेतस्थळांवर इंडोनेशियाच्या ‘हॅकर्स’कडून सायबर आक्रमणाचा धोका !

(‘सायबर आक्रमण’ म्हणजे एका संगणकाद्वारे दुसर्‍या संगणकातील माहिती चोरणे आणि ‘हॅकर्स’ म्हणजे अशी माहिती चोरणार्‍या व्यक्ती किंवा टोळी)

नवी देहली – इंडोनेशियातील काही ‘हॅकर्स’ गट भारतातील जवळपास १२ सहस्र सरकारी संकेतस्थळांवर सायबर आक्रमण करण्याच्या सिद्धतेत आहेत. त्यामुळे सर्व राज्य आणि केंद्र सरकार यांच्या संकेतस्थळांवर तांत्रिक लक्ष ठेवण्याची सूचना देण्यात आली आहे. अनोळखी क्रमांक किंवा ई-मेल यांद्वारे आलेली कोणतीही मार्गिका (लिंक) न उघडण्याचा आदेश देण्यात आला आहे. ती उघडल्यास सायबर आक्रमण होण्याचा धोका अधिक आहे. गेल्या वर्षभरात एकूण १९ वेळा भारताच्या सरकारी संकेतस्थळांवर सायबर आक्रमणे करण्यात आली आहेत.

गेल्या वर्षी भाजपच्या तत्कालीन प्रवक्त्या नूपुर शर्मा यांनी महंमद पैगंबर यांच्याविषयी कथित आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. यावरून आखाती देशांनी भारताविरोधात संताप व्यक्त केला होता. त्यातूनच मलेशियातील हॅकर्सने भारताच्या सरकारी संकेतस्थळावर सायबर आक्रमणे केली होती.