भटिंडा (पंजाब) येथील सैनिकी छावणीतील गोळीबारात ४  सैनिकांचा मृत्यू

आतंकवादी आक्रमण नसून अंतर्गत वादातून घटना घडल्याचा दावा

भटिंडा (पंजाब) – येथील सैन्याच्या छावणीत १२ एप्रिलच्या पहाटे झालेल्या गोळीबारात ४ सैनिकांचा मृत्यू झाला. ‘ही घटना नेमकी कशामुळे आणि कुणी घडवली ?’, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. हे आतंकवादी आक्रमण नसून हा गोळीबार अंतर्गत वादातून झाल्याचे म्हटले जात आहे. गोळीबार करणारे साध्या वेशात होते. पंजाब पोलिसांच्या सूत्रांनी सांगितले की, २ दिवसांपूर्वी एक रायफल आणि २८ गोळ्या बेपत्ता झाल्या होत्या. या घटनेमागे सैन्यातील कुणीतरी असू शकते, अशी शंका उपस्थित केली जात आहे.

१. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी या घटनेविषयी सैन्याकडून अहवाल मागवला आहे. पंजाब सरकारने भटिंडा पोलिसांकडूनही अहवाल मागवला आहे. या सैन्य छावणीमध्ये सैनिकांची कुटुंबे रहातात. या घटनेनंतर सैन्याने सर्वांना आपापल्या घरात रहाण्यास सांगितले आहे. येथील शाळाही बंद करण्यात आल्या आहेत.

२. भटिंडा छावणी ही आशिया खंडातील सर्वांत मोठी सैनिकी छावणी आहे. या छावणीची सीमा सुमारे ४५ किलोमीटर आहे. येथील दारूगोळा डेपो हा देशातील सर्वांत मोठ्या डेपोपैकी एक असल्याचे सांगितले जाते.