१५५ देशांतील नद्यांच्या पाण्याद्वारे होणार अयोध्येतील श्रीराममंदिरात जलाभिषेक !

अयोध्या (उत्तरप्रदेश) – श्रीरामजन्मभूमीवर बांधले जात असलेले भव्य श्रीरामंदिर पूर्ण झाल्यानंतर होणार्‍या मंदिराच्या उद्घाटनाच्या वेळी जगभरातील १५५ नद्यांच्या पाण्याद्वारे महाजलाभिषेक करण्यात येणार आहे.

सौजन्य इंडिया न्यूज 

१. ‘श्रीरामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट’चे सरचिटणीस चंपत राय यांनी सांगितले की, देहलीतील भाजपचे माजी आमदार विजय जौली यांच्या नेतृत्वाखाली एक पथक १५५ देशांतील नद्यांचे पाणी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे सुपुर्द करेल. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ २३ एप्रिल या दिवशी मणिराम दास छावणी सभागृहात ‘जल कलश’ पूजन करतील.

२. विजय जौली म्हणाले की, आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दिवंगत अशोक सिंघल यांच्यापासून प्रेरणा घेऊन प्रतिज्ञा केली होती की, जगभरातील नद्या आणि समुद्र यांचे पाणी जमा करून त्या पाण्याने श्रीराममंदिरात प्रभु श्रीरामांवर जलाभिषेक करू. पाकिस्तानच्या राबी नदीसह जगभरातून वाहणार्‍या नद्यांमधील पाणी मोठ्या कष्टाने गोळा करण्यात आले आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध चालू असूनही तेथील नद्यांचे पाणी जमा झाले आहे. पाकिस्तानातून पाणी आणणे कठीण होते; मात्र तेथील हिंदू बांधवांनी दुबईमार्गे पाणी पाठवण्याची व्यवस्था केली.