खलिस्तानसाठी स्वतंत्र आर्थिक चलन आणि सैन्य उभारण्याचे अमृतपाल सिंंह याने रचले होते षडयंत्र !

‘वारीस पंजाब दे’ या संघटनेचा प्रमुख आणि खलिस्तानवादी अमृतपाल सिंंह

चंडीगड – ‘वारीस पंजाब दे’ (पंजाबचे वारसदार) या संघटनेचा प्रमुख आणि खलिस्तानवादी अमृतपाल सिंंह याला अटक करण्यासाठी पंजाब पोलीस काही दिवसांपासून मोहीम राबवत आहेत. आतापर्यंत २०७ खलिस्तान समर्थकांना कह्यात घेण्यात आले आहे. यासोबतच अमृतपाल सिंंह याच्या विरोधात राष्ट्रीय सुरक्षा कायदा लागू करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अमृतपाल सिंंह ‘आनंदपूर खालसा फौज’च्या साहाय्याने ‘अमृतपाल टायगर फोर्स’ची सिद्धता करत होता. यामध्ये शीख तरुणांना भरती करण्याची योजना सिद्ध करण्यात आली होती. याशिवाय खलिस्तानसाठी स्वतंत्र आर्थिक चलनाची रचना आणि खलिस्तानचा स्वतंत्र नकाशाही त्याने बनवला होता.

 (सौजन्य : Oneindia Hindi | वनइंडिया हिंदी) 

पाकिस्तानच्या ‘आय.एस्.आय.’चे घेतले साहाय्य

पंजाब पोलिसांच्या कह्यात असलेल्या अमृतपाल सिंंह याचा रक्षक तेजिंदर सिंह उर्फ गोरखाबाबाच्या भ्रमणभाषवरून पोलिसांना बरीच माहिती मिळाली असून त्यात अमृतपाल सिंंह खलिस्तान निर्माण करण्यासाठी अनेक देशांच्या संपर्कात असल्याचे उघड झाले आहे.

यामध्ये पाकिस्तानची गुप्तचर संस्था ‘आय.एस्.आय.’ त्यांना सर्वतोपरी साहाय्य करत होती. यापूर्वी गुप्तचर यंत्रणेने खळबळजनक खुलासा केला होता. अमृतपाल सिंह तरुणांना आत्मघातकी आक्रमणासाठी सिद्ध करत आहे. अमृतपाल सिंह ‘आय.एस्.आय.’च्या साहाय्याने ‘आनंदपूर खालसा दल’ सिद्ध करत होता, असे गुप्तचर यंत्रणेने म्हटले होते.

संपादकीय भूमिका

‘एवढे सर्व होईपर्यंत भारताची सुरक्षायंत्रणा काय करत होती ?’ असा प्रश्‍न सर्वसामान्यांना पडणे साहाजिक आहे !