पाकिस्तानचे ‘तेहरीक-ए-तालिबान’शी संबंध !

‘पश्तून संरक्षण चळवळी’चे कार्यकर्ते फजल-उर-रहमान

जिनेव्हा (स्विट्झर्लंड) – येथे चालू असलेल्या संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेच्या ५२व्या अधिवेशनात पाकिस्तान पुन्हा एकदा अपकीर्त  झाला आहे. ‘पश्तून संरक्षण चळवळी’चे कार्यकर्ते फजल-उर-रहमान यांनी पाकिस्तानचे ‘तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान’(टीटीपी) या आतंकवादी संघटनेशी जवळचे संबंध असल्याचे उघड केले. फजल-उर-रहमान म्हणाले, ‘‘खैबर पख्तूनख्वा पाकिस्तान’ (केपीके) मधील सुरक्षाव्यवस्था पूर्णपणे बिघडली आहे. त्यामुळे  पश्तून वांशिक अल्पसंख्याकांचे मूलभूत अधिकार आणि जीवन यांवर गंभीर परिणाम झाला आहे. पाकिस्तान आणि ‘तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान’ यांच्यातील अघोषित कराराविषयी आम्ही चिंता व्यक्त करतो. या करारानुसार अनुमाने ‘टीटीपी’चे ४४ सहस्र आतंकवादी आणि त्यांची कुटुंबे यांचे ‘खैबर पख्तूनख्वा’मध्ये पुनर्वसन केले जाणार आह.’’ ‘पश्तून संरक्षण चळवळी’ने या कराराच्या विरोधात पाकिस्तानभर निदर्शने  करून आमच्या भूमीची मागणी केली, असे फजल-उर-रहमान यांनी परिषदेत सांगितले.

नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका अहवालात ‘टीटीपी’ने  ३६७ आक्रमणे केल्याचा दावा केला आहे. ज्यांमध्ये खैबर पख्तूनख्वामध्ये ३४८, बलुचिस्तानमध्ये १२, पंजाबमध्ये ५ आणि सिंध प्रांतात २ आक्रमणे यांचा समावेश आहे. या आक्रमणामध्ये ४४६ लोक ठार, तर १०१५ जण घायाळ झाले होते. ‘या प्रकरणी संयुक्त राष्ट्रांनी अन्वेषण करून खैबर पख्तूनख्वामधील लोकांना न्याय मिळवून द्यावा’, अशी मागणी फजल-उर-रहमान यांनी केली.