राज्यात लव्ह जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायदे आणण्यासाठी सरकार विचाराधीन  ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

राज्यात लव्ह जिहाद आणि धर्मांतर होत असल्याची गृहमंत्र्यांची विधीमंडळात स्वीकृती !

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, २३ मार्च (वार्ता.) – मागील काही दिवसांत लव्ह जिहाद आणि धर्मांतर यांविरोधात बहुसंख्य समाजाचे लाखोंच्या संख्येने मोर्चे निघत असतील, तर त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. लव्ह जिहाद आणि धर्मांतर यांमागे एक पूर्वनियोजन (‘डिझाईन’) दिसत आहे. मागील काही काळात महाराष्ट्रात आमिष दाखवून धर्मांतर झाल्याचे, तसेच ‘लव्ह जिहाद’च्या घटना घडल्याचे बाहेर आले आहे. वस्तूस्थितीचा अभ्यास करून याविषयीची कायदे आणण्यासाठी सरकार विचाराधीन आहे, अशी माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली.

महाराष्ट्रातील ‘लव्ह जिहाद’ आणि ‘धर्मांतर’ यांच्या घटना रोखण्यासाठी महाराष्ट्रात कायदा करावा, अशी मागणी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी २३ मार्च या दिवशी विधान परिषदेत लक्षवेधी सूचनेद्वारे केली. यावरील चर्चेत सर्वपक्षीय आमदारांनी सहभाग घेतला. देवेंद्र फडणवीस यांनी या वेळी शासनाची भूमिका सभागृहात स्पष्ट केली. ‘लव्ह जिहाद’ हा शब्द महाराष्ट्राने आणलेला नाही. सर्वोच्च न्यायालयातही याविषयी चर्चा झाली आहे. ‘लव्ह जिहाद’ आणि ‘धर्मांतर विरोधी’ कायद्यांसाठी राज्यात ४० मोर्चे काढण्यात आले. यातून शासनाला याचे गांभीर्य समजले आहे. समाजाची भावना शासनाने लक्षात घेतली आहे. याविषयी विविध राज्यांत असलेल्या कायद्यांचा अभ्यास करून आपल्याकडे कशा प्रकारे कायदा केला पाहिजे, याचा अभ्यास करून निर्णय घेण्यात येईल, असे फडणवीस म्हणाले.

धर्मांतरासाठी फसवणुकीचा गुन्हा नोंदवला जात आहे !

आमिष दाखवून धर्मांतर झाल्यास त्यासाठी भारतीय दंड विधानातील ४२० (फसवणूक) नुसार गुन्हा नोंदवला जातो; परंतु ४२० कलम धर्मांतरासाठी करण्यात आलेले नाही. अशा वेळी विशेष कायदा करावा लागतो. धर्मांतराच्या घटना घडत आहेत. त्यामुळे राज्यघटनेच्या चौकटीत राहून हा प्रश्‍न सोडवण्यासाठी कायदा सिद्ध करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे, असे या वेळी फडणवीस म्हणाले.

अंधश्रद्धा निमूर्लनाप्रमाणे कायदा व्हावा ! – आमदार गोपीचंद पडळकर, भाजप

आमदार गोपीचंद पडळकर

राज्यात अंधश्रद्धा निर्मूलनासाठी जसा कायदा करण्यात आला, त्याप्रमाणे ‘धर्मांतर’ आणि ‘लव्ह जिहाद’ यांसाठीही कायदा करण्यता यावा. ख्रिस्ती फादर थेट येशूशी बोलल्याचे दाखवून ‘कॅन्सर’ बरा करत असल्याचे सांगतात. यातून धर्मांतर केले जाते. ‘जिहाद’ हा अरबी शब्द आहे. धर्मांध मुसलमान प्रेमाच्या नावाने हिंदु मुलींचे धर्मांतर करतात याला ‘लव्ह जिहाद’ म्हणतात. धर्मांधांचे हे षड्यंत्र गावागावांत पोचले आहे.

धारावी, मानखुर्द, गोवंडी येथे लव्ह जिहादच्या घटना ! – प्रसाद लाड, आमदार, भाजप

प्रसाद लाड

‘इस्लाम रिसर्च फाऊंडेशन’द्वारे झाकीर नाईक हा असे प्रकार करण्यासाठी प्रोत्साहन देत असल्याचे उघड झाले आहे. केरळमध्येही ख्रिस्ती धर्मियांनीही लव्ह जिहादच्या विरोधात तक्रारी केल्या आहेत. केरळमध्ये हा विषय गांभीर्याने घेण्यात आला आहे. मुंबईतील धारावी, मानखुर्द, गोवंडी येथे १४ ते १८ वर्षे वयोगटातील मुलींना लव्ह जिहादमध्ये फसवले जाते. ही कोणती प्रवृत्ती आहे ? यासाठी कोण ‘रॅकेट’ चालवते ? याचा शोध घ्यायला हवा.

लव्ह जिहादमध्ये युवतींचे वशीकरण करण्यात येत आहे ! – आमदार प्रवीण दरेकर, भाजप

आमदार प्रवीण दरेकर

बोरीवली अशोकवन येथील लव्ह जिहादमध्ये बेपत्ता झालेल्या मुलीचे वशीकरण करण्यात आले होते. त्याचा परिणाम भयानक आहे. पालघरमध्ये गरिबी, असाहाय्यता यांचा अपलाभ घेऊन ख्रिस्ती मिशनरी हिंदूंचे धर्मांतर करत आहेत. याविषयी उपाययोजना काढायला हवी.

या वेळी भाजपच्या आमदार उमा खापरे म्हणाल्या, ‘‘लव्ह जिहादमध्ये मुलींवर व्यय करण्यासाठी परदेशातून पैसा येतो. यासाठी कोणत्या संघटनेकडून पैसा पुरवला जातो ? ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून धर्मांतराचे शिक्षण दिले जाते. याविषयी अन्वेषण करायला हवे.’’ त्यावर गृहमंत्र्यांनी चौकशी करण्याचे आश्‍वासन दिले.

या वेळी आमदार अनिल परब यांनी ‘लव्ह जिहादला बळी पडलेल्या मुलींची पालकांची भेट घडवून देण्याविषयी प्रयत्न करायला हवा’, असे म्हटले. यावर फडणवीस यांनी पोलीस महासंचालकांना सांगून याविषयी कार्यपद्धती निश्‍चित करण्यात येईल, असे सांगितले.

उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांनी पुणे जिल्ह्यात धर्मांतराच्या प्रचंड घटना होत आहेत. या धर्मांतराच्या घटना का होतात ? याची माहिती नोंदवण्याची पद्धत असायला हवी, असे म्हटले. ‘याविषयी माहिती घेण्यात येईल’, असे फडणवीस यांनी म्हणले.