पाकिस्तान आणि चीन यांनी कारवाया केल्यास भारत प्रत्युत्तर देण्याची शक्यता ! – अमेरिकी गुप्तचर विभागाचा अहवाल

शी जिनपिंग, नरेंद्र मोदी आणि शहबाज शरीफ

वॉशिंग्टन (अमेरिका) – आशियामध्ये भारत, पाकिस्तान आणि चीन या देशांमधील संबंध तणावपूर्ण असून त्यांच्यात संघर्ष होण्याची शक्यता आहे. पाकिस्तान आणि चीन यांच्याकडून भारताच्या विरोधात कारवाया करण्यात आल्यास भारताकडून आक्रमक भूमिका घेतली जाण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताकडून चीन आणि पाकिस्तान यांच्या विरोधात सैनिकी कारवाईद्वारे प्रत्युत्तर देण्याची शक्यता आहे, असे अमेरिकेच्या गुप्तचर विभागाच्या अहवालात म्हटले आहे.

अमेरिकेला सर्वाधिक धोका चीनकडून !

अमेरिकेच्या संसदेत राष्ट्रीय गुप्तचर विभागाचे संचालक एव्हरिल हॅन्स यांनी माहिती देतांना सांगितले की, सध्याच्या स्थितीत राष्ट्रीय सुरक्षा आणि नेतृत्व याला सर्वाधिक धोका चीनचा आहे. चीनची कम्युनिस्ट पार्टी जागतिक स्तरावर अमेरिकेला सर्वांत मोठा धोका म्हणून समोर उभी ठाकली आहे. गेल्या वर्षभरात रशियाला करत असलेल्या सहकार्यामुळे चीन आमच्यासाठी अधिक धोकादायक ठरी आहे. आता चीन हे आपले प्राधान्य बनले आहे. चीनला पूर्व आशियामध्ये प्रमुख शक्ती बनायचे आहे. त्याला संपूर्ण जगाला स्वतःच्या मुठीत ठेवायचे आहे.