जिल्ह्यांची नाव पालटण्याची प्रक्रिया चालू – उपमुख्यमंत्री

मुंबई – केंद्र सरकारची संमतीची प्रक्रिया पूर्ण झाली की, आधी सामान्य प्रशासन विभाग अधिसूचना काढते. महसूल आणि वन विभाग, तसेच नगर विकास विभाग अधिसूचना जारी करेल, तेव्हा संपूर्ण जिल्ह्याचे, तालुक्याचे, महापालिका आणि नगरपालिकेचेही नाव पालटेल. अंबादास दानवे यांनी आधी ही पूर्ण प्रक्रिया समजून घ्यावी. दोन्ही जिल्ह्यांसंदर्भात याचीही प्रक्रिया चालू झाली आहे. आम्ही जेव्हा काही करतो तेव्हा ते पूर्णच करतो. अर्धवट काहीच ठेवत नाही, असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी, ‘‘नामांतर फक्त संभाजीनगर शहराचे आहे कि संपूर्ण जिल्ह्याचे ? औरंगजेबाचे नाव मिटवायचे असेल, तर जिल्हा पण ‘संभाजीनगर’ असावा. तालुका ‘छत्रपती संभाजीनगर, जिल्हा औरंगाबाद’, असे यापुढे लिहावे लागेल का ?’’ असा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर फडणवीस यांनी वरील उत्तर दिले.