कणेरी मठातील गायींच्या आकस्मिक मृत्यूमागे षड्यंत्र आहे का ? याची चौकशी व्हावी ! – हिंदु जनजागृती समिती

गोहत्याबंदी कायद्याला विरोध करणार्‍या साम्यवाद्यांना अचानक गोप्रेमाचा उमाळा आल्याविषयी शंका व्यक्त !

कोल्हापूर – येथील कणेरी मठामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘पंचमहाभूत लोकोत्सव’ २० फेब्रुवारीपासून चालू आहे. हा महोत्सव चालू असतांना काही गायींचा संशयास्पदरित्या मृत्यू झाला. मुळात ही घटना दुर्दैवी आहे. भारतीय प्राचीन संस्कृती जोपासणार्‍या कणेरी मठाच्या वतीने गेली अनेक वर्षे सहस्रो गायींचा सांभाळ केला जात आहे. भाकड आणि भटक्या गायींनाही सांभाळणारी आदर्श गोशाळा येथे आहे.

हिंदु जनजागृती समितीचे प्रसिद्धीपत्रक –

असे असतांना कम्युनिस्ट पक्षाच्या संघटना अचानक पुढे येऊन या गायींच्या मृत्यूच्या संदर्भात कणेरी मठावर आरोप करू लागल्या आहेत. खरेतर तेथे गायींचा झालेला आकस्मिक मृत्यू, हे एक षड्यंत्र असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड समन्वयक श्री. सुनील घनवट यांनी म्हटले आहे.

श्री. घनवट यांनी पुढे म्हटले आहे की,

खरेतर कणेरी मठ आणि प.पू. काडसिद्धेश्वर स्वामी यांचे पर्यावरणप्रेम निर्विवाद आहे अन् ते सिद्ध करण्याची आवश्यकता नाही. जे साम्यवादी आणि समाजवादी गोवंशहत्या बंदी कायद्याला विरोध करतात आणि शेतकर्‍यांच्या भाकड गायी पशूवधगृहात जाव्यात, अशी उघड भूमिका घेतात, तेच साम्यवादी काँग्रेसच्या सत्ताकाळात पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी देवस्थान समितीने अनेक गायी विकल्या, तसेच अनेक गायींच्या पोटात चोळीचे खण आणि प्लास्टिक पिशव्या सापडल्या, त्या वेळी कुठल्या बिळात लपून बसले होते ? आज मात्र या साम्यवादी आणि समाजवादी यांना अचानक गोप्रेमाचा उमाळा का आला ? यामुळेच त्यांनी घेतलेली भूमिका ही दुटप्पीपणाची आहे, हेच यातून दिसून येते. खरेतर मठामध्ये चालू असलेल्या पंचमहाभूत लोकोत्सवाचे यश समाजविघातकांच्या डोळ्यात खुपले आहे. त्यामुळेच या दुर्घटनेच्या निमित्ताने प.पू. काडसिद्धेश्वर स्वामी आणि कणेरी मठ यांची अपकीर्ती केली जात आहे. त्यामुळे कणेरी मठातील गायींच्या मृत्यूची सखोल चौकशी करून त्यामागील षड्यंत्र उघड करायला हवे. समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि संपूर्ण हिंदु समाज कणेरी मठाच्या पाठीमागे उभा आहे.