हिंदु समाजाचा संघटित हुंकार : हिंदु जनआक्रोश मोर्चा !

हिंदु समाजमनामध्‍ये असलेली अस्‍वस्‍थता, राग आणि चीड मोर्च्‍याच्‍या रूपाने संघटित स्‍वरूपात दिसणे ही हिंदु राष्‍ट्राची नांदी !

गेली अनेक वर्षे हिंदु समाजावर होणार्‍या अन्‍यायाच्‍या विरोधात लोकशाहीच्‍या मार्गाने उठवलेला कायदेशीर आणि शिस्‍तबद्ध आवाज म्‍हणजे हिंदु जनआक्रोश मोर्चा होय. सर्वस्‍पर्शी आणि सर्वव्‍यापी संपर्क झाल्‍यामुळे सर्वसामान्‍य हिंदु समाज म्‍हणून या मोर्च्‍यात रस्‍त्‍यावर उतरत आहे. महाराष्‍ट्रातील जवळपास सर्व शहरांमध्‍ये आणि जिल्‍ह्यांमध्‍ये उत्‍स्‍फूर्तपणे अशा स्‍वरूपाचे मोर्चे निघण्‍यास आरंभ झाला आहे. कराडमध्‍ये ७ वर्षांपूर्वी जैन समाजातील मुलगी ‘लव्‍ह जिहाद’मध्‍ये अडकण्‍याची घटना उघडकीस आल्‍यानंतर कराड शहरात या घटनेला विरोध करण्‍यासाठी श्री. विक्रम पावसकर यांच्‍या नेतृत्‍वाखाली उत्‍स्‍फूर्तपणे ‘लव्‍ह जिहाद’विरोधी मोर्चा निघाला होता. हा हिंदूंवर होणार्‍या अन्‍यायाच्‍या विरोधात आवाज उठवण्‍याला झालेला आरंभ होय.

हिंदु जनआक्रोश मोर्च्याचे प्रातिनिधिक छायाचित्र
हिंदु जनआक्रोश मोर्च्याचे प्रातिनिधिक छायाचित्र

१. भयंकर घटनांमुळे संतप्‍त झालेल्‍या हिंदूंनी मोर्चे काढण्‍यास केलेला आरंभ !

२ वर्षांपूर्वी पालघरमध्‍ये दोन साधूंना पोलिसांच्‍या उपस्‍थितीमध्‍ये दगडाने ठेचून मारण्‍यात आले. पोलिसांनी मूक प्रेक्षकाची भूमिका घेऊन आणि समोर जमलेल्‍या जमावाला घाबरून त्‍या साधूंना चक्‍क जमावाच्‍या हवाली केले. अतिशय संताप आणणारी ही घटना महाराष्‍ट्रामध्‍ये घडली आणि हिंदु समाजाला खच्‍ची करण्‍याच्‍या एका मागून एक घटना त्‍यानंतर घडण्‍यास प्रारंभ झाला. राजकीय व्‍यासपिठावरून हिंदूंच्‍या मानबिंदूंचा अपमान, सरस्‍वतीमातेविषयी अतिशय अवमानास्‍पद अशी टिपणी, महाराष्‍ट्रात अनेक ठिकाणी पी.एफ्.आय.चे (पॉप्‍युलर फ्रंट ऑफ इंडिया या जिहादी संघटनेचे) विणले गेलेले जाळे आदी घटनांनंतर १५ नोव्‍हेंबर २०२२ ला एक भयंकर घटना उघडकीस आली. वसईतील श्रद्धा वालकर नावाच्‍या मुलीने तिच्‍यासह ‘लिव्‍ह इन रिलेशनशीप’मध्‍ये रहात असणार्‍या आफताब पूनावाला नावाच्‍या मुलाकडे लग्‍नाचा तगादा लावला; म्‍हणून तिला देहलीमध्‍ये अतिशय निर्दयीपणे आणि थंड डोक्‍याने मारले. तिच्‍या देहाचे ३५ तुकडे करून ते जंगलात टाकले. या घटनेने संपूर्ण हिंदु जनमानस अस्‍वस्‍थ झाले. या घटनेचा निषेध करण्‍यासाठी सर्वप्रथम परभणीमध्‍ये मूक मोर्चाचे आयोजन करण्‍यात आले आणि त्‍यानंतर महाराष्‍ट्रातील जवळपास सर्व शहरांमध्‍ये अन् जिल्‍ह्यांमध्‍ये उत्‍स्‍फूर्तपणे अशा स्‍वरूपाचे मोर्चे निघण्‍यास आरंभ झाला.

२. श्रद्धा वालकरसारख्‍या घडलेल्‍या इतर घटना !

कोल्‍हापूरमधील आजरा येथे हिंदु मुलीची काढलेली छेड, कोल्‍हापूर शहरातील गवळी समाजाच्‍या मुलीचे जिहाद्यांनी केलेले अपहरण, पाटण आणि सांगली जिल्‍ह्यातील विटा येथे घडलेल्‍या अशाच प्रकारच्‍या घटना या तेथील मोर्चांच्‍या पाठीमागच्‍या तात्‍कालिक घटना ठरल्‍या असल्‍या, तरी श्रद्धा वालकरचे क्रूर हत्‍याकांड हेच सर्व ठिकाणच्‍या मोर्चांसाठीचे महत्त्वाचे सूत्र ठरले.

३. समाजातील सुप्‍त संतापाचे रूपांतर झाले विराट जनआक्रोशामध्‍ये !

अशा श्रद्धा वालकर आपल्‍या अवतीभोवती प्रतिदिन बळी पडत आहेत, हे सर्वांना दिसत होते; मात्र त्‍याकडे गांभीर्याने कुणीही बघत नव्‍हते. डोळ्‍यांना अशा अनेक घटना दिसत होत्‍या; पण त्‍यांच्‍या संवेदना मेंदू आणि मन यांच्‍यापर्यंत पोचत नव्‍हत्‍या. श्रद्धा वालकरच्‍या प्रकरणानंतर मात्र मेलेल्‍या आणि बोथट, बोजड झालेल्‍या या संवेदना प्रचंड वेगाने प्रवाहित झाल्‍या. आपल्‍या आजूबाजूला घडलेल्‍या अशा अनेक घटना स्‍मृतीपटलावर दिसू लागल्‍या आणि मनाच्‍या सुप्‍तावस्‍थेत असलेला या वेदना संतापाद्वारे बाहेर येऊ लागल्‍या. समाजातील या सुप्‍त संतापाचे रूपांतर विराट अशा जनआक्रोशामध्‍ये झाले.

४. हिंदु जनआक्रोश मोर्च्‍यातील प्रमुख मागण्‍या

दिवसेंदिवस वाढत जाणार्‍या ‘लव्‍ह जिहाद’च्‍या घटनांसह ठिकठिकाणी ‘लँड (भूमी) जिहाद’चे अतिक्रमणही विळखा घालत आहे. विविध मोकळे सरकारी भूखंड, फूटपाथ, रस्‍ते, मुख्‍य चौक येथे, तसेच गडकोटांवर झालेली अनधिकृत थडग्‍यांच्‍या आणि दर्ग्‍यांच्‍या स्‍वरूपातील अतिक्रमणे, तसेच ख्रिस्‍ती मिशनर्‍यांकडून ग्रामीण भाग आणि शहरातील वस्‍त्‍या येथे लालूच दाखवून अन् अंधश्रद्धेच्‍या जोरावर केली जाणारी धर्मांतरे, कसायांकडून होणारी गोतस्‍करी, गोहत्‍या आणि गोमांस विक्री या सर्व विषयांना अनुसरून पुढील प्रमुख ३ मागण्‍या करण्‍यात येत आहेत.

अ. लव्‍ह जिहाद आणि लँड जिहाद यांविरुद्ध कडक कायदा करा.

आ. धर्मांतराविरुद्ध कठोर कायदा करा.

इ. गोहत्‍येविरुद्ध कायदा केला असला, तरी त्‍याची कार्यवाही नीट होत नसल्‍यामुळे सक्‍तीने कार्यवाही करावी.

काही ठिकाणच्‍या मोर्च्‍यांमध्‍ये ‘टिपू सुलतानच्‍या जयंतीविरुद्ध आवाज उठवणे, २६ डिसेंबरला गुरुगोविंद सिंह यांच्‍या पुत्रांच्‍या बलीदानाचे स्‍मरण करण्‍यासाठी घोषित केलेल्‍या ‘वीर बाल’ दिवसाच्‍या धर्तीवर ‘छत्रपती संभाजी महाराजांचा बलीदान दिन’ म्‍हणजेच फाल्‍गुन अमावस्‍या हा दिवस ‘धर्मवीरदिन’ म्‍हणून घोषित करणे’ आदी मागण्‍याही करण्‍यात येत आहेत.

५. सत्तेत हिंदुत्‍वनिष्‍ठ सरकार असतांना मोर्च्‍यांची आवश्‍यकता का ?

केंद्र सरकारने ‘सीएए’ (नागरिकत्‍व सुधारणा कायदा) लागू केल्‍यानंतर त्‍याच्‍या विरोधात मुसलमान समाजाचे प्रचंड मोठे मोर्चे निघाले. देहलीतील शाहीनबाग येथे आंदोलन झाले; मात्र राष्‍ट्रभक्‍त आणि देशभक्‍त नागरिक ‘सीएए’च्‍या समर्थनार्थ केंद्र सरकारला पाठिंबा देण्‍यासाठी रस्‍त्‍यावर उतरले नाहीत. ते केवळ मूक प्रेक्षक बनले. उद्या महाराष्‍ट्रात लव्‍ह जिहाद, लँड जिहाद आणि धर्मांतर यांच्‍या विरोधातील कायदे पारित होतील; पण राष्‍ट्रभक्‍त आणि जागरूक हिंदु समाजाच्‍या समर्थनाचा प्रचंड रेटा अन् दबाव जर दिसला नाही, तर कदाचित् याची कार्यवाही होऊ शकणार नाही. त्‍यामुळे अशा मोर्च्‍याची नितांत आवश्‍यकता आहे. तसेच सरकार घेत असलेल्‍या चांगल्‍या निर्णयांना प्रचंड जनसमर्थन लाभल्‍यामुळे सरकारचाही आत्‍मविश्‍वास द्विगुणित होतो.

आपण बारकाईने निरीक्षण केले, तर सर्व हिंदु जनआक्रोश मोर्चे हे कुठल्‍याही ठरवून केलेल्‍या नियोजनाचा भाग नक्‍कीच नाहीत. परभणीच्‍या मूक मोर्चानंतर वेगवेगळ्‍या शहरांमधून आणि जिल्‍ह्यांमधून उत्‍स्‍फूर्तपणे मोर्चे निघत आहेत. या उत्‍स्‍फूर्ततेतही स्‍वयंशिस्‍त आणि सुसूत्रता तोही ‘सकल हिंदु समाज’ म्‍हणूनच बघायला मिळत आहे. वरील सर्व समस्‍यांच्‍या आणि घटनांच्‍या विरोधात हिंदु समाजमनामध्‍ये असलेली अस्‍वस्‍थता, राग आणि चीड मोर्च्‍याच्‍या रूपाने संघटित स्‍वरूपात दिसत आहे. तसेच ‘सर तन से जुदा’ (डोके शरिरापासून वेगळे करणे) किंवा ‘गझवा ए हिंद’ (इस्‍लामीस्‍तान) यांसारख्‍या घोषणांमुळे, पी.एफ्.आय.सारख्‍या (‘पॉप्‍युलर फ्रंट ऑफ इंडिया’ या जिहादी संघटनेसारख्‍या) मुसलमान संघटनांनी वर्ष २०४७ पर्यंत भारताचे ‘मुसलमान राष्‍ट्र’ करण्‍याच्‍या केलेल्‍या नियोजनामुळे हिंदु जनमानसामध्‍ये असुरक्षितता वाढत आहे आणि त्‍यामुळेच आपण ‘हिंदु’ म्‍हणून एक झाले पाहिजे, अशी तीव्र भावना हिंदूंमध्‍ये निर्माण होत आहे.      (क्रमशः उद्याच्‍या दैनिकात)

– श्री. नीलेश भिसे

(साभार : साप्‍ताहिक ‘विवेक’, मराठी, ४.२.२०२३)