परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सत्संगातून साधिकेने उलगडलेले त्यांचे दैवी गुणमोती !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

 ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांची शिकवण्याची पद्धत शब्दांत व्यक्त करणे अशक्य आहे. परात्पर गुरुदेव माझे सर्वकाही आहेत. ते माझे अस्तित्व आहेत. ते माझ्या आयुष्यात नसते, तर माझ्या आयुष्याला काहीच अर्थ नसता; कारण ते आहेत; म्हणून सर्वकाही शक्य आहे. कलियुगात ‘ईश्वरप्राप्ती करून घेणे’, हे केवळ त्यांच्यामुळेच शक्य आहे. त्यांच्यामुळे निर्मळ प्रेम, शुद्धता आणि सात्त्विकता अस्तित्वात आहेत. माझ्यासारख्या तुच्छ जिवाला त्यांनी जसे घडवले आहे, त्या साक्षात् विष्णुस्वरूप गुरुमाऊलींची शिकवण शब्दांत वर्णन करणे अशक्य आहे. ‘विष्णुस्वरूप गुरुमाऊलींची शिकवण शब्दांत वर्णन करण्यासाठी मला मार्गदर्शन कर’, अशी मी भगवान शिवाच्या चरणी प्रार्थना करते.  (भाग १)

१. परात्पर गुरु डॉॅ. आठवले यांचे निरपेक्ष प्रेम (प्रीती)

सौ. श्वेता क्लार्क

१ अ. परात्पर गुरुदेवांनी साधकांना निरपेक्षपणे आणि संयमाने साधनेविषयी मार्गदर्शन करणे : परात्पर गुरु डॉक्टरांची प्रीती पाहून कृतज्ञतेने ‘त्यांची सेवा करावी’, असे वाटते. ‘गेली कित्येक वर्षे ते साधकांसाठी इतके करत आहे की, त्यांच्यासाठी आपण कितीही केले, तरी ते अल्पच आहे’, असे मला वाटते. परात्पर गुरुदेवांच्या साधकांवरील प्रीतीमुळे ते आम्हाला साधकांच्या माध्यमातून मार्गदर्शन करत असतात. परात्पर गुरुदेवांची प्रत्येक कृती, प्रत्येक शब्द आणि त्यांचे अस्तित्व यांतून त्यांची प्रीती व्यक्त होत असते. साधकांकडून ते कसलीही अपेक्षा करत नाहीत. साधकांनी साधनेचे प्रयत्न केले, तर चांगलेच आहे; मात्र त्यांनी काही प्रयत्न केले नाहीत, तरी परात्पर गुरु डॉक्टर त्यांना संयमाने मार्गदर्शन करतात. इतकी वर्षे ते हे सातत्याने हार न मानता प्रयत्न करत आहेत. साधकांची आध्यात्मिक प्रगती झाल्यावर त्यांनाच सर्वांत अधिक आनंद होतो.

१ आ. रामनाथी आश्रमात येतांना साधिकेला बर्‍याच अडथळ्यांना सामोरे जावे लागणे आणि तेव्हा परात्पर गुरुदेवांनी तिचे छायाचित्र मागवून त्या माध्यमातून चैतन्य पुरवणे : मी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात आले. तेव्हा मला बर्‍याच अडथळ्यांना सामोरे जावे लागले होते; मात्र परात्पर गुरुदेवांनी माझ्या उत्तरदायी साधकांच्या साहाय्याने माझे छायाचित्र मागवून ते आश्रमातील चैतन्यमय ठिकाणी ठेवले होते. माझी स्थिती हळूहळू सुधारत होती. नंतर माझ्या लक्षात आले, ‘परात्पर गुरुदेव छायाचित्राच्या माध्यमातून मला चैतन्य पुरवत होते.’

१ इ. साधिकेला साधनेत स्थिर करण्यासाठी परात्पर गुरुदेवांनी स्वतः तळमळीने प्रयत्न करणे : साधना करण्यासाठी माझ्या घरातील वातावरण प्रतिकूल होते. त्यामुळे आश्रमात आल्यावर आरंभी माझ्याकडे फारसे पैसे नव्हते. बरेच मास मला ते अधूनमधून प्रसाद पाठवत असत आणि ‘मी बरी आहे ना ?’, याची नेहमी विचारपूस करत असत. गुरुपौर्णिमेला त्यांनी मला एक ‘कार्ड’ पाठवले होते. त्यावर लिहिले होते, ‘गुरु शिष्याला अंधारातून प्रकाशाकडे नेतात.’ मला साधनेत स्थिर करण्यासाठी त्यांनी स्वतः या गोष्टी केल्या आहेत. हे सर्व क्षण मी कशी िवसरू शकेन ? हे सर्व क्षण सोनेरी अक्षरांत कोरले गेले आहेत आणि त्यामुळेच आजपर्यंत माझी साधना करण्याची तळमळ टिकून आहे.

१ ई.  परात्पर गुरुदेव म्हणजे एक प्रेमळ आईच ! : परात्पर गुरुदेवांनी आम्हाला ‘वेशभूषा कशी असावी ? कपाटात वस्तू व्यवस्थित कशा ठेवाव्यात ? आजारी साधकांची काळजी कशी घ्यावी ? काटकसरीने कसे वागावे ?’, इत्यादी गोष्टी शिकवल्या. ‘परात्पर गुरुदेवांना भेटण्यापूर्वी माझे वर्तन किती असंस्कृत होते !’, याची मला जाणीव झाली. ज्या क्षणी मी त्यांना भेटले, तेव्हापासून माझ्या आयुष्यात पालट होत गेले.

१ उ. साधकांची काळजी घेऊन त्यांना साधनेत पुढे नेण्यासाठी प्रेरणा देणारे परात्पर गुरुदेव ! : परात्पर गुरुदेवांच्या प्रीतीमुळे मला प्रथमच जाणवले, ‘मीही आनंदी होऊ शकते. कुणीतरी माझ्यावर खरोखर प्रेम करणारे आहे आणि काहीही झाले, तरी ते मला सोडणार नाहीत.’ ज्या सहस्रो साधकांवर त्यांनी प्रेम केले आहे, ज्यांची काळजी घेतली आहे, ज्यांना साधनेत पुढे पुढे जाण्यासाठी प्रेरणा दिली आहे, त्यांतील एक उदाहरण, म्हणजे मी आहे.

१ ऊ. ‘ईश्वर प्रत्येकावर सारखेच प्रेम करतो’, याची शिकवण देणे : परात्पर गुरुदेव प्रत्येक गोष्टीवर प्रेम करतात. सृष्टीतील प्रत्येक गोष्टीत; मग ती सुंदर असो वा कुरूप, ‘देव त्या सर्वच गोष्टींत आहे’, हे आपण ऐकले आहे. सामान्यतः मनुष्य नेहमी चांगल्या गोष्टीकडेच आकर्षित होतो. एकदा परात्पर गुरुदेवांच्या खोलीत एक कावळा आला होता आणि खोलीत त्याचे एक पीस पडले होते. परात्पर गुरुदेवांनी ते पीस जपून ठेवले. ते म्हणाले, ‘‘मोर सुंदर असल्याने तो सर्वांनाच आवडतो; परंतु कावळा हीसुद्धा ईश्वराचीच निर्मिती आहे.’’ यातून त्यांनी आम्हाला ‘ईश्वर प्रत्येकावर सारखेच प्रेम करतो’, याची शिकवण दिली.

१ ए. साधकांना चुकांतून शिकण्यास आणि वर्तमानात रहाण्यास शिकवणे : साधकांकडून सेवेत चुका झाल्यास परात्पर गुरुदेव पहातात, ‘साधकांमध्ये स्वतःला पालटण्याची तळमळ किती आहे ? त्या चुकांमधून साधक शिकत आहेत ना ?’ परात्पर गुरुदेव केवळ वर्तमानस्थितीत असतात. जेव्हा साधक सांगतात, ‘‘माझ्याकडून साधनेचे प्रयत्न अल्प झाले’’, तेव्हा ते म्हणतात, ‘‘तो भूतकाळ झाला. आता तुझी प्रगती होईल. मला तुझी काळजी वाटत नाही.’’

१ ऐ. साधक जेवढे स्वतःला जाणत नाहीत, त्यापेक्षा अधिक परात्पर गुरुदेवच त्या साधकांना जाणत असणे : ‘आमची क्षमता किती आहे ?’, हे आमच्यापेक्षा परात्पर गुरुदेवच अधिक जाणतात. मला पुष्कळ लोकांसमोर अध्यात्माविषयी बोलता येत नव्हते. परात्पर गुरुदेवांनी एकदा मला एका सत्संगात बोलतांना ऐकले आणि मला अध्यात्मप्रसाराची सेवा करण्याविषयी सुचवले. अध्यात्म प्रसाराची सेवा करण्याची माझी जराही क्षमता नव्हती. केवळ ‘परात्पर गुरुदेवांचा संकल्प आणि त्यांची प्रीती’, यांमुळे त्यांनी माझ्याकडून ही सेवा करून घेतली. यातून ‘ते जेव्हा एखादी सेवा सुचवतात, तेव्हा ती सेवा करण्यासाठी ते क्षमताही देतात’, याची मला जाणीव झाली. एखादा साधक जेव्हा त्यांना सांगतो, ‘‘माझ्यात अमुक एक स्वभावदोष आहे’’, तेव्हा ते म्हणतात, ‘‘हा मोठा अडथळा नाही. काळजी करू नका.’’ त्यांचे आश्वस्त करणारे हे शब्द ऐकून साधकाच्या मनातील सर्व अडथळे दूर होतात आणि त्याची साधनेत पुढे पुढे जाण्याची तळमळ वाढते.

१ ओ. स्वतःतील प्रीतीमुळे इतरांमध्ये पालट घडवून आणणे : जेव्हा परात्पर गुरुदेव साधकाला एखादी गोष्ट देतात, तेव्हा ते चैतन्य आणि प्रीती यांनी ओतप्रोत भरलेले असते. आपल्या प्रयत्नांनी आपले स्वभावदोष दूर होणे पुष्कळ कठीण आहे; मात्र परात्पर गुरुदेवांच्या चैतन्याने आणि त्यांच्या कृतीने आपण अंतर्बाह्य पालटून जातो. ‘त्यांच्यासाठी तरी आपल्यात पालट करावा’, असे आपल्याला वाटते. आमच्या घरचेच उदाहरण घेतले, तर आम्हा कुटुंबियांमध्ये पूर्वी एकमेकांविषयी आकस होता. माझे माझ्या सासूबाईंच्या समवेत काही प्रसंग झाल्याने ते प्रसंग विसरणे मला जमत नव्हते. काही मासांपूर्वी त्या आमच्या समवेत रहायला आल्या. तेव्हा परात्पर गुरुदेवांच्या कृपेने मला त्यांच्यातील गुण दिसू लागले. माझ्या सासूबाईंची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के झाल्याचे घोषित करण्यात आले. त्यांच्याविषयी परात्पर गुरुदेव म्हणाले होते, ‘‘तुझ्या सासूबाईंची आंतरिक साधना चालू असून केवळ स्वतःतील गुणांमुळे साधनेत प्रगती करणार्‍या त्या एकमेव आहेत.’’ माझ्या मनात सासूबाईंविषयी जो आकस होता, तो परात्पर गुरुदेवांच्या चैतन्यामुळे आपोआप न्यून होत गेला आणि मला त्यांच्याविषयी प्रेम वाटू लागले. सासूबाईंमधील गुण पहाण्यात मी न्यून पडत होते. प्रथमच मला ‘आमचे कुटुंब, म्हणजे एक आध्यात्मिक कुटुंब आहे’, असे वाटू लागले. एकमेकांविषयी कोणत्याही अपेक्षा न ठेवता आम्ही एकमेकांकडे साधक म्हणून पाहू लागलो. यातून मला शिकायला मिळाले, ‘परात्पर गुरुदेव किती प्रेमाने सांगून आम्हाला आंतरिक पालट घडवून आणण्यास प्रोत्साहित करतात !’ आम्हाला स्वतःमध्ये हा पालट स्वबळावर करणे कदापि शक्य नाही, केवळ परात्पर गुरुदेवांच्या दैवी नेतृत्वामुळेच ते शक्य आहे.’ (क्रमशः)

– सौ. श्वेता शॉन क्लार्क, फोंडा, गोवा. (४.१.२०१९)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक