‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ने शेतकर्‍यांच्या डोळ्यातले पाणी पुसण्याचे कार्य केले ! – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे – जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ने अनेक गावांमध्ये जाऊन तिथला दुष्काळ दूर केला, शेतकर्‍यांपर्यंत पाणी पोचवले. शेतकर्‍याच्या डोळ्यातले पाणी पुसून त्याच्या शेतीला पाणी मिळवून देण्याचे हे अतुलनीय कार्य केले, असे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. कोथरूड येथे आयोजित भक्ती उत्सव-महासत्संग कार्यक्रमात ते बोलत होते. ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’च्या माध्यमातून अनेक लोकांचे जीवन सुधारत असून शेतकर्‍यांच्या जीवनात परिवर्तन घडून येत आहे. महाराष्ट्रातील १७ नद्यांच्या पुनरुज्जीवनाचे कार्य आर्ट ऑफ लिव्हिंगच्या स्वयंसेवकांनी केले आहे. या वेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे प्रणेते श्री श्री रविशंकर, आमदार भीमराव तापकीर, शहाजी बापू पाटील, उद्योजक अनिरुद्ध देशपांडे, सूर्यकांत काकडे, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, विशाल गोखले आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की, श्री श्री रविशंकर यांनी संपूर्ण भारत आणि जगातील अनेक देश येथे भारतीय संस्कृती अन् भारतीय अध्यात्म यांविषयी लोकांमध्ये जागृती केली. ‘जागतिक शांती परिषदे’च्या माध्यमातून जगातल्या सर्व धर्मांना एकत्र करण्याचे कार्य श्री श्री रविशंकर यांनी केले. विज्ञानासह अध्यात्म हा श्री श्री रविशंकर यांच्या विचारांचा गाभा आहे. या विचारांमुळेच जगाच्या पाठीवर अस्तित्वात असलेली अत्यंत प्राचीन सभ्यता म्हणून भारताकडे पाहिले जाते. पुणे हे बुद्धी आणि विद्या यांचे माहेरघर असल्याने येथेच अथर्वशीर्षाचे पठण होणे स्वाभाविक आहे अन् अथर्वशीर्ष पठणाचा विक्रम पुण्यातच होऊ शकतो.

श्री श्री रविशंकर म्हणाले की, तीक्ष्ण बुद्धी आणि कोमल भाव ही भारतीय संस्कृतीची देणगी आहे. मानसिक स्वास्थ्यासाठी ध्यान आवश्यक असल्याचे जगातील सर्व देशांनी मान्य केले आहे. आयुर्वेद, योग, ध्यान, आध्यात्मिक ज्ञान ही भारताची श्रेष्ठ संपत्ती आहे. कार्यक्रमाच्या प्रारंभी सामूहिक अथर्वशीर्ष पठणाचा जागतिक विक्रम करण्यात आला. या विक्रमाचे प्रमाणपत्र ‘एशिया बुक ऑफ रेकॉर्ड’ आणि ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस्’च्या डॉ. चित्रा आणि ‘वर्डर्ल्ड बुक ऑफ लंडन’चे डॉ. दीपक हरके यांच्या हस्ते श्री श्री रविशंकर यांना प्रदान करण्यात आले.