सनातन धर्म हाच भारताचा राष्ट्रीय धर्म ! – मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

जालौर (राजस्थान) – आपला सनातन धर्म हाच भारताचा राष्ट्रीय धर्म आहे. आपण सर्व जण स्वतःच्या स्वार्थाच्या पलीकडे जाऊन या राष्ट्रीय धर्माशी जोडले गेलो, तर आपला देश सुरक्षित होईल. आपल्या मानबिंदुंची पुर्नस्थापना होईल आणि गो-ब्राह्मणांचे रक्षण होईल, असे प्रतिपादन उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी येथील भीनमालमधील ऐतिहासिक नीलकंठ महादेव मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या कार्यक्रमाच्या वेळी केले. ते पुढे म्हणाले की, अशा प्रकारच्या धार्मिक कार्यक्रमांच्या आयोजनामध्ये जात, पंथ आणि धर्म सोडून आपल्याला एकता पहायला मिळते. अशी एकता प्रतिदिनच्या जीवनात ठेवली पाहिजे.

(म्हणे) ‘या विधानामुळे अन्य धर्म समाप्त झाले !’ – काँग्रेसचे नेते उदित राज

काँग्रेसचे नेते उदित राज

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विधानावर काँग्रेसचे नेते उदित राज यांनी टीका केली आहे. ते म्हणाले की, मला काही ओळखीच्या बौद्ध धर्मीय सहकार्‍यांचा दूरभाष आला, ते म्हणाले की, जर सनातन धर्म राष्ट्रीय धर्म आहे, तर आपले काय होणार ? सनातन धर्माच्या अस्तित्वाला कोण नाकारत आहे ? मी विचार केला की, योगीजींना विचारले पाहिजे, ‘अन्य धर्म आहेत कि नाही ?’ बौद्धिक विचार झाला पाहिजे. त्यांच्या विधानाचा अर्थ असा आहे की, शीख, जैन, बौद्ध, ख्रिस्ती, इस्लामसमवेत अन्य धर्म समाप्त झाले आहेत. त्यांनी आधी ‘सनातन धर्मामध्ये महिला, दलित आणि मागासवर्गीय यांचे स्थान कुठे आहे ?’, हे सांगावे आणि नंतर पुढील गोष्टी कराव्यात.

संपादकीय भूमिका

इस्लामी देशांमध्ये इस्लाममुळे जसे अन्य धर्म नष्ट करण्यात आले आणि येत आहेत, तसे भारतात बहुसंख्य हिंदूंकडून यापूर्वीही कधी झाले नाही आणि पुढेही होण्याची शक्यता नाही, हे काँग्रेसवाल्यांनाही ठाऊक आहे; मात्र अन्य धर्मियांच्या लांगूलचालनासाठी अशा प्रकारची विधाने करण्याची त्यांना सवय लागली आहे, हे हिंदूंना ठाऊक आहे !