भगवान अय्यप्पा स्वामी यांचा अवमान करणारे नास्तिकतावादी बैरी नरेश यांच्या विरोधात भाग्यनगरमध्ये हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे आंदोलन !

हिंदु जनजागृती समितीचाही सहभाग

आंदोलनात सहभागी धर्मप्रेमी

भाग्यनगर (तेलंगाणा) – भारत नास्तिक संघाचे तेलंगाणा राज्य अध्यक्ष बैरी नरेश यांनी १९ डिसेंबरला कोडंगल जिल्ह्यातील रावुल पल्ली गावामधील एका सभेमध्ये भगवान अय्यप्पा स्वामी यांच्या जन्माविषयी अवमानकारक विधान केले. याविरोधात तेलंगाणा आणि आंध्रप्रदेश राज्यांत हिंदु संघटनांकडून निदर्शने केली जात आहेत. या राज्यांमध्ये २०० हून अधिक पोलीस ठाण्यांमध्ये तक्रारी करण्यात आल्या आहेत. भाग्यनगरमध्ये सायबर शाखेने गुन्हाही नोंदवला आहे. ३० डिसेंबर या दिवशी भाग्यनगर पोलीस ठाण्याबाहेर हिंदू जनजागृती समिती, भाग्यनगर अय्यप्पा सेवा समिती, अखिल भारत अय्यप्पा सेवा समिती, तसेच अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी आंदोलन करून पोलिसांना निवेदन दिले. तसेच बैरी नरेश यांना २४ घंट्यांत अटक करण्याची मागणी केली. या मागणीची नोंद घेत बैरी नरेश यांना ३१ डिसेंबर या दिवशी अटक करण्यात आली.

१. आंदोलनाच्या वेळी हिंदु जनजागृती समितीचे तेलंगाणा राज्य समन्वयक श्री. चेतन गाडी यांनी सांगितले की, ‘भारत नास्तिक समाज’ ही संघटना विविध ठिकाणी नास्तिक सभेच्या माध्यमांतून हिंदु धर्माचा जाणीवपूर्वक अवमान करत आहे. ते स्वतःला आंबेडकरवादी सांगत हिंदूंच्या देवता, धर्मग्रंथ आदींवर टीका करत आहेत. ‘या ‘भारत नास्तिक समाजा’च्या स्थापनेमागे कोणता उद्देश आहे ?’, ‘या संघटनेच्या मागे कोणत्या शक्ती काम करत आहेत ?’, ‘कोणत्या धोरणानुसार ते काम करत आहेत ?’, याची केंद्र सरकारने चौकशी करून तिच्यावर बंदी घातली पाहिजे. रेंजर्ला राजेश, बैरी नरेश, आर्.एस्. प्रवीण कुमार यांसारखे लोक जाहीर सभांमध्ये हिंदु धर्माचा अवमान करून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावत आहेत.

२. भाग्यलक्ष्मी मंदिरामध्ये या संदर्भात सामूहिक आरतीही करण्यात आली. त्या वेळी हिंदु संघटनांनी पुन्हा एकदा नरेश यांना अटक करण्याची मागणी केली होती. यानंतर १ घंट्यानंतर नरेश यांना अटक करण्यात आली.

संपादकीय भूमिका 

हिंदूंनो, देवतांचा वारंवार अवमान होऊ नये, यासाठी हिंदु राष्ट्राची आग्रही मागणी करा !


हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून सिरोंचा तालुका १०० टक्के बंद

  • हिंदु धर्म आणि देवता यांच्याविषयी अपशब्द वापरल्याचे प्रकरण

  • तक्रारी प्रविष्ट करूनही संबंधितांवर कारवाई नाही

गडचिरोली – येथील सिरोंचा तालुक्यात आयोजित एका सार्वजनिक कार्यक्रमात २४ डिसेंबर या दिवशी मुख्य वक्ते नरेश बैरी यांनी हिंदु धर्म आणि देवता यांच्याविषयी अपशब्द वापरले. हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी याची माहिती पोलिसांना दिली; मात्र आयोजकांवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. २५ डिसेंबर या दिवशी त्यांनी पुन्हा अपशब्द वापरले. या प्रकरणीही पोलिसांत तक्रार देण्यात आली; मात्र तरीही कारवाई न झाल्याने धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी ३० डिसेंबरला तालुका १०० टक्के बंद ठेवले. या वेळी संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी तहसीलदाराच्या माध्यमातून जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देऊन कारवाईची मागणी केली.

संपादकीय भूमिका 

कारवाई न करणारे कर्तव्यचुकार पोलीस काय कामाचे ?