जळगाव येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेला अनुमती देऊ नका !

जळगावमधील पुरो(अधो)गामी संघटनांची पोलीस अधीक्षकांकडे हिंदुद्वेषी मागणी

जळगाव – येथे २५ डिसेंबर २०२२ या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेला अनुमती देऊ नये, अशी हिंदुद्वेषी मागणी काही पुरो(अधो)गामी संघटनांनी जळगावच्या पोलीस अधीक्षकांकडे एका निवेदनाद्वारे केली. या निवेदनात त्यांनी सभेला अनुमती न देण्यामागे ‘धार्मिक तेढ निर्माण होईल, तसेच शांतता आणि सुव्यवस्था बिघडू शकते’ असे हास्यास्पद कारण दिले आहे.

आतापर्यंत प्रतिवर्षी जळगाव येथे झालेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभांना हिंदूंचा आणि हिंदुत्वनिष्ठ, तसेच आध्यात्मिक संघटना अन् संप्रदाय यांचा भरघोस प्रतिसाद मिळला आहे. या सभांना सहस्रोंच्या संख्येने हिंदू उपस्थित रहातात. या माध्यमातून मोठ्या प्रमाणात हिंदूसंघटन झालेले दिसून येते. या सभांतून सहस्रो हिंदू हे राष्ट्र आणि धर्म यांविषयी ठोस दिशा आणि मार्गदर्शन घेऊन कार्यप्रवण होतात. नेमकी हीच गोष्ट काही पुरोगामी संघटनांना खुपत असल्यामुळे त्यांनी ही मागणी केल्याचे बोलले जात आहे.

सनदशीर मार्गाने होणार्‍या आणि हिंदूंना जागृत करणार्‍या सभांना विरोध करणे, हा खोडसाळपणा ! – श्री. प्रशांत जुवेकर, हिंदु जनजागृती समिती, जळगाव

श्री. प्रशांत जुवेकर

हिंदु जनजागृती समिती गेल्या २० वर्षांपासून कार्यरत आहे. समितीचे सर्व कार्य हे सनदशीर मार्गाने चालते. जळगाव शहरात वर्ष २००८ पासून प्रतिवर्षी ही सभा घेण्यात येते. हिंदूंंना जागृत करण्यासाठी सनदशीर मार्गाने या सभांचे आयोजन केले जाते. आजवर या सभांमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाल्याचे एकही उदाहरण नाही. त्यामुळे अशा प्रकारे सभेच्या विरोधात निवेदन देणे, हा खोडसाळपणा आहे. त्यामुळे अशा प्रवृत्तींचा निषेध करतो.

संपादकीय भूमिका 

  • हिंदु जनजागृती समितीच्या वतीने गेल्या १० वर्षांत देशभरात दोन सहस्रांहून अधिक सभांचे यशस्वी आयोजन करण्यात आले असून त्यांपैकी एकाही सभेच्या वेळी शांतता आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झालेला नाही. याची नोंद पोलीस प्रशासनाकडे आहेच. असे असतांना पुरोगामी संघटना कशाच्या आधारावर ही मागणी करत आहेत ? हे पोलीस अधीक्षकांनी तपासायला हवे.
  • अन्य पंथीय वारंवार दंगलसदृश स्थिती निर्माण करून शांतता आणि सुव्यवस्था बिघडवतात, तेव्हा ‘ब्र’ ही न काढणार्‍या पुरोगाम्यांना शांततेच्या वातावरणात हिंदूंमध्ये राष्ट्र आणि धर्म यांविषयी जागृती करून हिंदूंमध्ये उत्साह निर्माण करणार्‍या सभांविषयी पोटशूळ उठतो, हे लक्षात घ्या !