पोर्तुगिजांनी मंदिरे उद्ध्वस्त केल्याचा इतिहास गोमंतकियांनी विसरू नये !

म्हापसा येथे गोवा प्रांतीय हिंदु-राष्ट्र जागृती अधिवेशनात स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांचे आवाहन

(डावीकडून) श्री. रमेश शिंदे, दीपप्रज्वलन करतांना श्री. रणजित सावरकर आणि श्री. नितीन फळदेसाई

म्हापसा, १४ नोव्हेंबर (वार्ता.) – आपण आपल्या चुकांमधून शिकले पाहिजे. पोर्तुगिजांनी गोव्यातील मंदिरे उद्ध्वस्त केल्याचा इतिहास विसरू नये. त्यासाठी प्रत्येक मंदिराच्या आवारात त्या मंदिराचे मूळ स्थान कोठे होते ? ते तेथून का स्थलांतरित करावे लागले ? तेथे कोणते अत्याचार झाले ? याचा इतिहास प्रदर्शित केला पाहिजे. हिंदूंनी ‘मला काय त्याचे’ ही वृत्ती सोडून इतिहासाची पुनरावृत्ती टाळली पाहिजे. जेव्हा हिंदु तेजस्वी बनेल, तेव्हाच त्याच्याकडे वाईट नजरेने कुणीही पहाणार नाही. याचा आरंभ गोव्यातून झाला पाहिजे, असे आवाहन ‘स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारका’चे कार्याध्यक्ष तथा स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू श्री. रणजित सावरकर यांनी केले.

श्री. रणजित सावरकर

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने १३ नोव्हेंबरला श्री सिद्धनाथ नारायण देवस्थान सभागृह, काणका, म्हापसा येथे प्रांतीय हिंदु-राष्ट्र जागृती अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. या अधिवेशनाच्या उद्घाटनप्रसंगी श्री. रणजित सावरकर बोलत होते. या वेळी व्यासपिठावर राष्ट्रीय बजरंग दलाचे श्री. नितीन फळदेसाई  आणि हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांची उपस्थिती होती. प्रारंभी श्री. रणजित सावरकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाल्यानंतर अधिवेशनाला प्रारंभ झाला.

फ्रान्सिस झेवियर हा ‘गोंयचो सायब’ कसा होऊ शकतो ? – नितीन फळदेसाई, राष्ट्रीय बजरंग दल

राष्ट्रीय बजरंग दलाचे श्री. नितीन फळदेसाई म्हणाले, ‘‘पोर्तुगिजांनी ‘इन्क्विझिशन’च्या माध्यमातून गोमंतकीय हिंदूंवर केलेले अत्याचार ‘गोवा फाईल्स’ या प्रदर्शनाच्या माध्यमातून जनतेसमोर आणण्यात आले आहेत. गोमंतकियांवर ‘इन्क्विझिशन’ लादून क्रूर अत्याचार करणारा फ्रान्सिस झेवियर हा ‘गोंयचो सायब’ कसा होऊ शकतो ?’’

सामाजिक माध्यमांद्वारे सण, संस्कृती आणि हिंदुत्वाचे रक्षण यांविषयी जागृती करणे आवश्यक ! – श्री. अभिदीप देसाई, संस्थापक, युगांतर

अधिवेशनात सामाजिक माध्यमातून राष्ट्र आणि धर्म रक्षणाचे कार्य करणारे ‘युगांतर’चे श्री. अभिदीप देसाई यांनी मार्गदर्शन केले. श्री. अभिजीत देसाई म्हणाले, ‘‘आजची पिढी ही सामाजिक माध्यमांवर आधारित असल्याने आपण सामाजिक माध्यमांद्वारे सण, संस्कृती आणि हिंदुत्वाचे रक्षण यांविषयी जागृती केली पाहिजे.’’

भारतीय संस्कृती, परंपरा, आपली कर्तव्ये पुनर्जीवित करण्याची आता वेळ ! – डॉ. सूरज काणेकर, अध्यक्ष, सुराज्य संघटना, गोवा

अधिवेशनात अखेरच्या सत्रात मार्गदर्शन करतानां ‘सुराज्य संघटना, गोवा’चे अध्यक्ष डॉ. सूरज काणेकर म्हणाले, ‘‘आता ‘मॉल’ व्यवस्था आल्याने दुकानदार-ग्राहक ही व्यवस्था धोक्यात आली आहे. पूर्वी गावात दुकानदार-ग्राहक अशी व्यवस्था असल्याने गावात एक बंधुभावाचे नाते निर्माण होत असे. कुटुंबव्यवस्था नष्ट झाल्याने पाश्चात्त्यांप्रमाणे येथे घटस्फोटाचे प्रमाण वाढत आहे. भारतीय संस्कृती, परंपरा, आपली कर्तव्ये पुनर्जीवित करण्याची आता वेळ आली आहे. गोवंशाच्या रक्षणासाठी प्रत्येक मंदिराचा कृतीशील सहभाग अपेक्षित आहे.’’

अधिवेशनाच्या दुसर्‍या सत्रात ‘परशुराम गोमंतक सेने’चे अध्यक्ष श्री. शैलेंद्र वेलिंगकर यांनी ‘गोव्यात धर्मांतर रोखण्यासाठी केलेले प्रयत्न आणि राज्यात धर्मांतर बंदी कायदा आणण्याची आवश्यकता’, या विषयावर मार्गदर्शन केले. अधिवेशनाच्या अखेर गटचर्चा घेण्यात आली.

अधिवेशनात घेण्यात आलेले ठराव

१. हलाल सर्टिफिकेट च्या माध्यमातून धन जमा करणार्‍या संघटनांचे आर्थिक व्यवहार, तसेच त्यांच्याद्वारे आतंकवादी कारवायांना केली जाणारी कायदेशीर साहायता यांची केंद्रीय अन्वेषण विभाग आणि अंमलबजावणी संचालनालय यांच्या माध्यमातून चौकशी व्हावी.
२. हात कातरो खांबाचे संवर्धन आणि सुशोभीकरण करावे.
३. गोव्यात धर्मांतरबंदी कायदा लागू करावा.
४. भारताला हिंदु राष्ट्र घोषित करावे.
५. गोमंतकीय हिंदूंवर पोर्तुगिजांनी केलेल्या अत्याचाराचा इतिहास पाठ्यपुस्तकांमध्ये समाविष्ट करावा.
६. गोव्यातील रस्ते आणि शहरे यांना असलेली पोर्तुगीज नावे पालटावी
७. पोर्तुगिजांनी उद्ध्वस्त केलेली मंदिरांची त्वरित उभारणी करावी.

वक्त्यांचे मार्गदर्शन

‘हिंदु राष्ट्रा’ची स्थापना ही काळाची आवश्यकता ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

हिंदु जनजागृती समितीचे श्री. रमेश शिंदे म्हणाले, ‘‘गोमंतक ही हिंदूंची भूमी आहे. गोमंतकाचा खरा इतिहास जनतेसमोर यावा आणि येथील परंपरा, संस्कृती आदींचे संरक्षण व्हावे, यासाठी ‘हिंदु राष्ट्रा’ची स्थापना ही काळाची आवश्यकता आहे.’’

हिंदूंना मंदिरांमधून धर्मशिक्षण देणे आवश्यक ! – जयेश थळी, गोमंतक मंदिर महासंघ

अधिवेशनाच्या तृतीय सत्रात ‘पोर्तुगिजांनी उद्ध्वस्त केलेल्या मंदिरांच्या पुनर्निर्मितीसंबंधी हिंदूंच्या मागण्या’ या विषयावर झालेल्या चर्चासत्रात ‘गोमंतक मंदिर महासंघा’चे श्री. जयेश थळी यांनी मार्गदर्शन केले. या वेळी श्री. जयेश थळी म्हणाले, ‘‘हिंदूंना मंदिरांमधून धर्मशिक्षण दिले गेले पाहिजे. मंदिरांमध्ये गटबाजी होणार नाही, याची हिंदूंनी काळजी घेतली पाहिजे. प्रत्येक मंदिराच्या बाहेर हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे महत्त्व असलेला फलक लावला गेला पाहिजे.’’

‘हात कातरो खांब संवर्धन कृती समिती’च्या कार्यात सर्वांनी सहभागी व्हावे ! – सत्यविजय नाईक, दक्षिण गोवा समन्वयक, हिंदु जनजागृती समिती

पोर्तुगिजांनी गोमंतकियांवर लादलेल्या ‘इन्क्विझिशन’चा एकमेव पुरावा असलेल्या जुने गोवे येथील हात कातरो खांबाचे संरक्षण आणि संवर्धन’, या विषयावर मार्गदर्शन करतांना हिंदु जनजागृती समितीचे दक्षिण गोवा समन्वयक श्री. सत्यविजय नाईक म्हणाले, ‘‘हातकातरो खांबा’चे एक ऐतिहासिक वारसा म्हणून जतन झाले पाहिजे. सरकारने खांबाच्या शेजारी ठसठशीतपणे दिसेल असा पितळी अथवा दगडी फलक लावावा आणि ‘हात कातरो खांबा’चे पावित्र्य जपावे. ‘हात कातरो खांबा’च्या संवर्धनासाठी स्थापन झालेल्या ‘हात कातरो खांब संवर्धन कृती समिती’च्या कार्यात सर्वांनी सहभागी व्हावे.’’

अधिवेशनाला उपस्थित धर्माभिमानी हिंदू

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांचे मंदिर विश्वस्तांना आवाहन

‘‘मंदिराच्या विश्वस्तांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा अभ्यास करावा !’’

तत्पूर्वी १२ नोव्हेंबर या दिवशी गोमंतक मंदिर महासंघ आणि गोव्यातील मंदिरांचे विश्वस्त यांना मार्गदर्शन करतांना हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे म्हणाले, ‘‘रस्त्याचे रूंदीकरण करतांना एखादे मंदिर अडचणीचे ठरले, तर ‘बुलडोझर’ लावून ते पाडले जाते; परंतु अन्य धर्मियांची प्रार्थनास्थळे अडचणीची ठरल्यास त्याचे स्थलांतर कायदेशीरदृष्ट्या करण्यात येते. मंदिरांच्या संदर्भात असा दुजाभाव का ? यासाठी मंदिराच्या विश्वस्तांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा अभ्यास केला पाहिजे.’’

_______________________________

चर्चासत्रात हिंदुत्वनिष्ठांचा उत्स्फूर्त सहभाग

अधिवेशनाच्या अखेर आयोजित चर्चासत्रामध्ये उपस्थित हिंदुत्वनिष्ठांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. त्यांनी पुढीलप्रमाणे मनोगत व्यक्त केले.

१. श्री. सुहास सिंह – हिंदू आज असुरक्षित आहेत याविषयी हिंदूंमध्ये जागृती करावी.
२. श्रीमती चंद्रिका पाडगावकर, शिक्षिका, पर्वरी – विज्ञापनांच्या माध्यमातून हिंदु देवतांचा होणारा अवमान रोखला पाहिजे. फटाक्यांवर हिंदु देवतांची चित्रे लावली जातात आणि हे रोखण्यासाठी प्रबोधनाची आवश्यकता आहे. हिंदूंना धर्मशिक्षण देण्याची व्यवस्था केली पाहिजे. मंदिरांमधून पाल्यांना धर्मशिक्षण दिले पाहिजे.
३. श्री. प्रदीप कोरगावकर – मंदिरांवर आक्रमण झाल्यास त्याविरोधात लढण्यासाठी आपली सिद्धता नसते. याविषयी जागृती झाली पाहिजे.
४. श्री. राजेश चोडणकर – केवळ मंदिरच नव्हे, तर हिंदुहिताचा प्रत्येक विषय सर्व हिंदूंपर्यंत पोचला पाहिजे.
५. श्री. नागेश फोंडेकर, जुने गोवे – ‘वक्फ’ बोर्डाच्या मनमानी कारभाराच्या विरोधात जागृती झाली पाहिजे. गोव्यातील गावांची पोर्तुगीज नावे पालटली पाहिजेत.
६. श्री. विठू राम काणेकर, वास्को – हिंदु देवतांची नावे मटणविक्री दुकानांना देणे बंद केले पाहिजे.’’
७. श्री. श्याम राव, वास्को – हलाल जिहाद’ या विषयावर युवावर्गाचे प्रामुख्याने प्रबोधन झाले पाहिजे.’’
८. श्री. नारायण ऐवाळे – हिंदूंमध्ये ‘मंदिरात दर्शन घेतल्याने होणारे लाभ’ याविषयी प्रबोधन केले पाहिजे.
९. श्री. तानाजी राजपूत – लव्ह जिहाद’ प्रकरणे होणारच नाहीत अशा स्वरूपात जागृती होणे आवश्यक आहे.
१०. श्री. राजीव झा, राष्ट्रीय सचिव, ‘केसरिया हिंदु वाहिनी’ संघटना – प्रांतीय हिंदु-राष्ट्र जागृती अधिवेशनात शिकवलेली सर्व सूत्रे आचरणात आणल्यासच अधिवेशनाचा खर्‍या अर्थाने लाभ होईल.


हिंदु जनजागृती समितीची ‘हिंदु राष्ट्र’ ही संकल्पना मला भावते ! – श्री. प्रवीण चंद्रा, अधिवेशनात सहभागी झालेले हिंदुत्वनिष्ठ

हिंदु जनजागृती समितीची ‘हिंदु राष्ट्र’ ही संकल्पना मला भावते. भारत हिंदु राष्ट्र झाल्यास येथील समस्या सुटतील. हिंदु जनजागृती समितीमुळे मला पुष्कळ शिकायला मिळते आणि हे शब्दांतून मांडता येणार नाही. समिती धर्मजागृतीच्या अनुषंगाने सार्वजनिक ठिकाणी प्रसिद्ध करत असलेल्या धर्मशिक्षण फलकांवरील मजकुरामुळे मी प्रभावित झालो आहे. प्रांतीय हिंदु-राष्ट्र जागृती अधिवेशनामुळे ‘हिंदु राष्ट्राची आवश्यकता’, ‘धर्मांतर’, ‘लव्ह जिहाद’ आदी विषयांवर माहिती मिळाली. समितीच्या प्रत्येक वक्त्याकडून पुष्कळ काही शिकायला मिळते. अधिवेशनात शिकलेली सूत्रे मी माझ्या दैनंदिन दिनचर्येत समाविष्ट करणार आहे. यापुढे मी हिंदु जनजागृती समितीच्या राष्ट्र आणि धर्म रक्षणाच्या अनुषंगाने प्रत्येक आंदोलनात परिवारासह सहभागी होणार आहे.

_____________________________