मुंबईवरील ‘२६/११’च्या आतंकवादी आक्रमणाचे मुख्य कारस्थानी अद्यापही सुरक्षित !

मुंबईतील संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांचे सडेतोड प्रतिपादन !

मुंबई – जेव्हा काही आतंकवाद्यांवर प्रतिबंध लावण्याचे सूत्र येते, तेव्हा काही घटनांमध्ये संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद राजकीय कारणांमुळे कारवाई करण्यास असमर्थ ठरत आहे. हे अत्यंत खेदजनक आहे. २६ नोव्हेंबर २००८ या दिवशी मुंबईमध्ये झालेल्या आतंकवादी आक्रमणाची योजना सिद्ध करणारे मुख्य कारस्थानी अद्यापही सुरक्षित आहेत. त्यांना अद्याप शिक्षा झालेली नाही, असे सडेतोड प्रतिपादन परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या बैठकीत केले.

१. आतंकवादाच्या विरोधात लढा देण्याविषयी धोरण निश्‍चित करण्यासाठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची महत्त्वपूर्ण बैठक मुंबईतील हॉटेल ‘ताज’मध्ये झाली. या २ दिवसीय बैठकीचा पहिला दिवस २८ ऑक्टोबरला मुंबईत झाला. २९ ऑक्टोबरला उर्वरित बैठक देहलीत होणार आहे. बैठकीचे यजमानपद भारताकडे आहे.

२. या बैठकीपूर्वी उपस्थित राहिलेल्या आंतरराष्ट्रीय सदस्यांनी २६/११ च्या आतंकवादी आक्रमणात मृत्यू झालेल्या नागरीकांना श्रद्धांजली अर्पण केली. २६ नोव्हेंबर २००८ या दिवशी पाकिस्तानमधील लष्कर-ए-तोयबा या आतंकवादी संघटनेच्या १० आतंकवाद्यांनी मुंबईमध्ये आक्रमण केले. या आक्रमणामध्ये १६६ नागरीकांचा मृत्यू झाला होता.

३. या बैठकीत बोलतांना डॉ. एस्. जयशंकर म्हणाले, ‘‘आपण सर्व जाणतो की, पैसा हा आतंकवादाची जीवनदायिनी आहे. आतंकवादी संघटनांना आतंकवादी कारवाया करण्यासाठी धन आणि शस्त्र यांची आवश्यकता असते. यांमुळे आतंकवादाचे अस्तित्व टिकून आहे आणि त्याचा विस्तार होत आहे. वाढणार्‍या आतंकवादाला पैशाचा पुरवठा होत आहे.’’

संपादकीय भूमिका

संयुक्त राष्ट्रांमध्ये सातत्याने आवाज उठवूनही पाकिस्तानच्या आतंकवादी कारवाया थांबलेल्या नाहीत. त्यामुळे कुणावर अवलंबून रहाण्याऐवजी भारतानेच आतंकवादी कारवायांचा बीमोड करण्यासाठी स्वतः सक्षम व्हावे !