हिंदूंचा आधारस्तंभ हिंदु जनजागृती समिती !

हिंदु जनजागृती समितीला घटस्थापनेच्या दिवशी २० वर्षे पूर्ण झाली. समितीची स्थापना चिपळूण येथे झाली असली, तरी तिचे कार्य महाराष्ट्र आणि भारताच्याही पलीकडे जाऊन संपूर्ण विश्वात पोचले आहे. मी गोवेकर आहे. त्यामुळे मी या लेखाचा प्रारंभ समितीच्या गोव्यातील कार्याचा आढावा घेऊन करीन.

श्री. नारायण राठवड

१. हिंदु धर्मावरील आघात नष्ट करण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने हिंदु जनजागृती समितीच्या माध्यमातून अवतार धारण करणे

‘हिंदूंची मंदिरे, संस्कृती आणि परंपरा यांवर आघात करणार्‍यांविरुद्ध आवाज उठवून प्रतिकार करण्यासाठी, तसेच गोव्यातील हिंदु बांधवांना एकत्र करण्यासाठी एका नि:स्वार्थी हिंदु संघटनेची नितांत आवश्यकता होती. गोव्यातील लहान मोठ्या मंदिरांमध्ये चोर्‍या होतात, तसेच समाजकंटकांकडून मूर्तीची तोडफोड आणि विटंबनाही केली जाते. अशी कृत्ये करणार्‍या टोळ्या गोव्यात कार्यरत होत्या आणि काही प्रमाणात आताही आहेत. त्यांच्या विरोधात पोलीस आणि प्रशासन यांच्याकडे जाऊन दाद मागण्यासाठी नि:स्वार्थपणे आणि प्रामाणिकपणे कार्य करणार्‍या कार्यकर्त्यांची आवश्यकता होती. याहूनही भयंकर गोष्ट, म्हणजे या भगवान परशुरामाच्या भूमीत बिलिव्हर्सकडून हिंदूंचे मोठ्या प्रमाणात धर्मांतर होत होते. दुसरीकडे धर्मांधांनी ‘लव्ह जिहाद’सारखे प्रकार चालू केले होते. हिंदूंसमोर अनेक संकटे उभे ठाकली होती. यातून आमची सुटका होईल, असे वाटत नव्हते.

देवाची करणी थोर असते. भगवान श्रीकृष्णाने ‘धर्माला ग्लानी येईल, तेव्हा परत जन्म घेऊन धर्माची पुनर्स्थापना करीन’, असे म्हटले होते आणि अगदी तसेच घडले. ऑक्टोबर २००२ मध्ये  हिंदु जनजागृती समितीच्या रूपाने भगवान श्रीकृष्णाने अवतार धारण केला. कुणी याला अतिशयोक्ती म्हटले तरी हरकत नाही; पण हेच त्रिवार सत्य आहे. समितीच्या कार्याचा जर कुणी आढावा घेतला, तर मला जे म्हणायचे आहे, ते चांगल्या प्रकारे नक्कीच लक्षात येईल.

२. हिंदु जनजागृती समितीने गोव्यात राष्ट्र आणि धर्म यांच्यासाठी प्रचंड कार्य करणे

२ अ. मंदिरांवरील आघात अल्प होणे : हिंदु जनजागृती समितीच्या स्थापनेपासून मी तिच्या संपर्कात आहे. समितीच्या कार्याविषयी एक मोठा ग्रंथ होऊ शकतो, एवढे समितीचे कार्य मोठे आहे. अगदी नि:स्वार्थी आणि प्रामाणिकपणे जर कोण कार्य करत असेल, तर ते म्हणजे हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते आहेत. गोव्यात मंदिरात होणार्‍या चोर्‍या आणि मूर्तींची तोडफोड यांच्या विरोधात समाजात जागृती करण्याचे कार्य याच समितीच्या माध्यमातून चालू झाले. पुढे समितीच्या पुढाकाराने ‘गोमंतक मंदिर महासंघा’ची स्थापना झाली. त्यामुळे मंदिरांवरील हे आघात बर्‍याच अंशी अल्प झाले. मीही या महासंघाचा एक प्रतिनिधी आहे.

२ आ. धर्मांधांच्या विविध जिहादविषयी समाजात जागृती करणे : धर्मांधांनी चालू केलेल्या ‘लव्ह जिहाद’विषयी समितीनेच सर्व प्रथम गोव्यात जागृती केली. तेव्हा ते अनेकांना पटले नव्हते; पण आज वस्तुस्थिती फारच पालटली आहे. आज या गोष्टीची सत्यता लोकांना पटली आहे. आज धर्मांध भारताला इस्लामिक देश बनवण्यासाठी अनेकविध प्रकारचे जिहाद करत आहेत, ही सत्यताही समितीने दाखवून दिली आहे. ‘हलाल जिहाद’च्या माध्यमातून भारताची अर्थव्यवस्था पूर्णतः धर्मांधांनी हातात घेतली आहे. ही गंभीर गोष्ट हिंदु जनजागृती समितीने जगासमोर आणली आहे. त्यामुळे हिंदु बांधवांनी त्वरित जागृत होऊन धर्मांधांचा हा डाव मोडून काढला पाहिजे.

२ इ. ख्रिस्ती धर्मांतर थांबवण्यासाठी समितीने हिंदूंना धर्मशिक्षण देणे : गोव्यामध्ये बिलिव्हर्स या पंथाचे लोक हिंदूंचे प्रलोभने दाखवून धर्मांतर करत आहेत. समितीने याविरोधात केवळ जागृतीच केली नाही, तर आपले हिंदू बांधव या आमिषाला बळी का पडतात ? याचा अभ्यास केला. हिंदूंना कुठेच धर्माचे शिक्षण मिळत नाही, हे जाणून घेतले आणि हिंदूंना धर्मशिक्षण देण्याची व्यवस्था समितीकडून करण्यात आली.

ई. छत्रपती शिवाजी महाराजांचा पाठ्यपुस्तकातील इतिहास वाढवण्यासाठी ‘एन्.सी.ई.आर्.टी’ला भाग पाडणे : ‘राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (एन्.सी.ई.आर्.टी.)’ प्रणित ५ वीच्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात मोगलांचा इतिहास पानेच्या पाने भरून शिकवला जायचा. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास केवळ ५ ओळीत दिला होता. त्या विरोधातही समितीने आंदोलन उभारले आणि गोवा शालांत मंडळावर मोर्चा नेला. परिणामी गोवा शालांत मंडळाने मोगलांचा इतिहास न्यून करून छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास ५ ओळीवरून दोन धडे वाढवून दिला.

अशा आघातांवर व्यापकरित्या जागृती होण्यासाठी आणि गोव्यात हिंदु  बांधवांना जागृत करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीने अनेक धर्मजागृती सभा, राष्ट्र-जागृती सभा आणि मेळावे घेतले.  त्या माध्यमातून गोव्यातील हिंदूंचे प्रभावी संघटन उभारले. मंदिरांमधून धर्माचे शिक्षण द्यायला प्रारंभ केला. त्यामुळे सण आणि उत्सव शास्त्रीय पद्धतीने कसे साजरे करायचे, हे कळले. अशा या समितीचे कार्य उत्तरोत्तर वाढत राहो, अशी ईश्वराच्या चरणी प्रार्थना !

– श्री. नारायण राठवड, म्हापसा, गोवा. (१४ ऑक्टोबर २०२२)

संपादकीय भूमिका

‘भगवान श्रीकृष्णाने हिंदु जनजागृती समितीच्या माध्यमातून अवतार धारण केला’, असे हिंदूंना वाटते !