देवद येथील सनातनच्या आश्रमातील साधक श्री. कृष्णकुमार जामदार यांना नामजपाच्या वेळी आलेल्या अनुभूती

‘मी डिसेंबर २०१९ मध्ये सकाळी ९.३० वाजता देवद आश्रमातील ध्यानमंदिरात नामजप करत होतो. तेव्हा मला ३ दिवस वेगवेगळ्या अनुभूती आल्या.

श्री. कृष्णकुमार जामदार

१. नामजपाच्या वेळी ध्यान लागल्याचे लक्षात येणे आणि निळसर प्रकाशाची वलये डोळ्यांपुढे तरळणे : एकदा मी सकाळी ९.३० वाजता ध्यानमंदिरात नामजप करत असतांना माझे ध्यान लागले. त्या वेळी माझ्या डोळ्यांपुढे निळसर प्रकाशाची वलये तरळतांना दिसली. ती वलये १ मिनिटाहून अधिक वेळ मला दिसत होती.

२. नामजपाला आरंभ केल्यावर परात्पर गुरु डॉ. आठवले, परात्पर गुरु पांडे महाराज आणि सद्गुरु राजेंद्र शिंदे यांचे प्रसन्न चेहरे डोळ्यांपुढे दिसणे अन् श्रीकृष्णाचे सुदर्शनचक्र जोरात फिरत असून त्याचा सोनेरी प्रकाश सगळीकडे पसरत असल्याचे जाणवणे : दुसर्‍या दिवशी ध्यानमंदिरात साधक नामजपाला बसले होते. त्यामुळे तेथे जागा नसल्याने मी दुसरीकडे जाऊन नामजपासाठी बसलो. नामजप आरंभ केल्यावर थोड्या वेळाने माझ्या डोळ्यांसमोर परात्पर गुरु डॉ. आठवले, परात्पर गुरु पांडे महाराज आणि सद्गुरु राजेंद्र शिंदे यांचे एका-पाठोपाठ-एक असे प्रसन्न चेहरे येऊ लागले. त्यानंतर ‘श्रीकृष्णाचे सुदर्शनचक्र जोरात फिरत आहे आणि त्याचा सोनेरी प्रकाश सगळीकडे पसरत आहे’, असे मला जाणवले.

३. नामजपाच्या वेळी ध्यान लागून सहस्रारचक्रातून गोलगोल वलये बाहेर पडत असल्याचे जाणवणे : एकदा मी नामजप करत असतांना माझे ध्यान लागले. तेव्हा मला ‘माझ्या सहस्रारचक्रातून गोलगोल वलये बाहेर पडत आहेत’, असे जाणवले. त्या वलयातून मला ओघळ येत असल्याचे जाणवले. त्या वेळी मी गालांना हात लावून पाहिले असता मला गालांना ओलसरपणा (अश्रू ओघळल्याचे) जाणवला नाही.’

– श्री. कृष्णकुमार जामदार (वय ६८ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२८.१२.२०१९)

या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक