हिंदु जनजागृती समितीच्या द्विदशकपूर्तीनिमित्त हिंदु राष्ट्र संकल्प अभियान !

देशभरात २ सहस्र ठिकाणी घेतली जाणार ‘हिंदु राष्ट्राची प्रतिज्ञा’ ! 

हिंदु जनजागृती समिती हिंदु राष्ट्र स्थापनेच्या उद्देशाने गेली २० वर्षे अविरतपणे कार्यरत आहे. या वर्षी २६ सप्टेंबर २०२२ या दिवशी अर्थात् घटस्थापनेच्या दिनी हिंदु जनजागृती समितीच्या स्थापनेला २० वर्षे पूर्ण होत आहेत. या द्विदशक-पूर्तीनिमित्त संपूर्ण देशभरात समितीच्या वतीने ‘हिंदु राष्ट्र संकल्प अभियान’ राबवण्यात येणार आहे. ३१ ऑगस्ट ते ८ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत हे अभियान राबवले जाईल. या अभियानात देशभरात २ सहस्रांहून अधिक ठिकाणी ‘हिंदु राष्ट्राची प्रतिज्ञा’ घेण्यात येणार आहे, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी दिली.

हिंदु राष्ट्र संकल्प अभियानातील विविध उपक्रम !

‘हिंदु राष्ट्र संकल्प अभियाना’त ‘हिंदु राष्ट्राची आवश्यकता’, ‘हिंदु धर्माची महानता’, ‘शौर्य जागरणाची आवश्यकता’, ‘लव्ह जिहाद’, ‘हलाल जिहाद’ इत्यादी विषयांवरील ३ सहस्र ठिकाणी व्याख्याने, २ सहस्र ठिकाणी हिंदु राष्ट्र-जागृती करणारी फलकप्रसिद्धी करणे, १ सहस्र मंदिरांची आणि २५० ऐतिहासिक स्थळांची स्वच्छता, ३५० ठिकाणी महिला संघटनाचे उपक्रम, तर २०० ठिकाणी महिलांसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण उपक्रम राबवण्यात येणार आहेत, तसेच ३० हून अधिक ‘हिंदु राष्ट्र संघटन मेळावे’, ५० ठिकाणी ‘वर्धापनदिन सोहळे’, ५० ठिकाणी ’हिंदु राष्ट्र परिसंवाद’, ७० ठिकाणी पथनाट्ये, २०० हून अधिक संघटनांच्या बैठका, ६० हून अधिक अधिवक्ता बैठका आदी उपक्रम देशभरात राबवले जाणार आहेत. या उपक्रमांतून हिंदु समाजमनात हिंदु राष्ट्राचा संकल्प दृढ व्हावा आणि हिंदु समाजाने हिंदु राष्ट्रासाठी कृतीशील व्हावे, या दृष्टीने उपक्रमांची आखणी करण्यात आली आहे, असेही श्री. शिंदे म्हणाले.

या अभियानाचा शुभारंभ चिपळूण (जि. रत्नागिरी) येथील श्री परशुराम मंदिरात श्रीफळ आणि पुष्पहार अर्पण करून केला. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकापूर्वी भगवान

श्री परशुरामांची महापूजा केली. समर्थ रामदासस्वामी यांनी श्री परशुराम मंदिरासमोर दक्षिणाभिमुख हनुमंताचे मंदिर बांधले. अशा ठिकाणी समितीच्या द्विदशक-पूर्तीनिमित्त संपूर्ण देशभरात राबवल्या जाणार्‍या ‘हिंदु राष्ट्र संकल्प अभियाना’चा शुभारंभ होणे, हा शुभसंकेतच म्हणावा लागेल, असे श्री. शिंदे यांनी सांगितले.

वर्ष २००२ मध्ये रत्नागिरीत एका धर्मद्रोही संघटनेने देवतांची टिंगल करणारा कार्यक्रम आयोजित केला होता, त्याच्या विरोधात उत्स्फूर्तपणे झालेले हिंदूसंघटन आज २० वर्षांत वटवृक्षासारखे वाढत चालले आहे. गेली २० वर्षे सातत्याने केलेल्या जागृतीमुळे हिंदूंच्या श्रद्धास्थानांचे विडंबन रोखण्यासाठी राज्यातच नव्हे, तर भारतभरात हिंदू कृतीशील झालेला दिसत आहे. धर्मशिक्षण, धर्मजागृती, हिंदूसंघटन, राष्ट्ररक्षण आणि धर्मरक्षण या पंचसूत्रीच्या आधारे समितीकडून वर्षभर विविध उपक्रम देशभर राबवले जातात. हे सर्व कार्य ईश्वरी कृपा, संतांचे आशीर्वाद आणि हिंदुत्वनिष्ठांचा कृतीशील सहभाग यांमुळे होत आहे, अशा कृतज्ञतापर भावनाही श्री. शिंदे यांनी या वेळी व्यक्त केल्या.