पाकिस्तानी सैन्याकडून तरुणींच्या माध्यमांतून भारतीय सैनिकांना लक्ष्य करण्यासाठी विशेष तुकडी !

नवी देहली – पाकची गुप्तचर संघटना आय.एस्.आय. गेल्या काही वर्षांपासून भारतीय सैनिकांना महिलांच्या माध्यमांतून जाळ्यात ओढण्याचे प्रयत्न करत आहे. यात तिला यशही मिळाल्याने अनेक घटनांतून उघडकीस आले आहे. आय.एस्.आय.ने यासाठी महिलांच्या १० तुकड्या स्थापन केल्याचे सांगितले जात आहे. यांत प्रत्येकी ५० हून अधिक तरुणींचा समावेश आहे. या तरुणींना भारतीय सैनिकांना जाळ्यात ओढण्यासाठी प्रशिक्षण दिले जात आहे. भारतीय गुप्तचर संस्थांकडून याविषयी सैनिकांना सतर्क रहाण्याची चेतावणी देण्यात आली आहे. सामजिक माध्यमांतून अज्ञात व्यक्तीची आलेली मैत्रीची विनंती (फ्रेंड रिक्वेस्ट) स्वीकारू नका, अशी सूचना देण्यात आली आहे.
भारतीय सैन्यदलातील एका वरिष्ठ गुप्तचर अधिकार्‍याकडून सांगण्यात आले आहे की, या तरुणींना पाकच्या हैदराबाद येथून पाक सैन्याच्या इंटेलिजन्स युनिट ४१२ द्वारे प्रशिक्षण केले जात आहे. त्यांना हिंदी आणि इंग्रजी बोलण्याचे शिक्षण दिले जाते. त्यांचे लक्ष्य राजस्थान आणि गुजरात सीमेवरील सैन्यतळांवर तैनात असलेल्या भारतीय सैन्याचे सैनिक आहेत. पाकिस्तानच्या या महिला पाकिस्तानी सैन्यात ब्रिगेडियर आणि कॅप्टन या पदांवर काम करत आहेत.

भारतीय सैनिकांना जाळ्यात कसे ओढतात ?

या तरुणींना प्रशिक्षण दिल्यानंतर त्यांना एका उपाहारगृहातील खोल्यांमध्ये ठेवले जाते. या तरुणींना रिया, खुशी, कल्पना, नीतू, गीतू, अवनी, मुस्कान, हरलीन अशी हिंदु नावेही देण्यात येत आहेत. तेथून त्या भारतीय सैनिकांशी संपर्क साधत असतात.

या तरुणीने प्रथम खोटे ओळख दाखवून सामाजिक माध्यमांतून खाते उघडतात आणि त्यातून भारतीय सैनिकांना मैत्रीची विनंती पाठवतात. बनावट खात्यांवर हिंदूंच्या देवतांची चित्रे ठेवलेली असतात. प्रतिदिन ५० सैनिकांना संपर्क करण्याचे ध्येय दिले जाते. सैनिकांनी विनंती स्वीकारल्यानंतर त्या सैनिकाशी प्रेमाने, तसेच अश्‍लील संभाषण करतात, तसेच काही वेळेस ही तरुणी विवाहाचे वचन देतात. दोघांमधील संवाद संरक्षित करू ठेवले जातात. त्या आधारे मग या सैनिकाला ब्लॅकमेल करून त्याच्याकडून भारतीय सैन्याची गोपनीय माहिती मागून घेतली जाते. जर माहिती दिली नाही, तर त्यांच्यातील संवाद उघड करून अडचणीत आणण्याची धमकी दिली जाते.

संपादकीय भूमिका

डावपेचांत भारतापेक्षा हुशार असलेला पाक !