भाजपने वर्ष २०१४ मध्ये दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत ! – शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

शरद पवार

ठाणे – राज्यात अनेक प्रश्न आहेत. राज्याचे आणि देशाचे सूत्र हातात असलेले एकाच विचाराचे आहेत. वर्ष २०१४ मध्ये निवडणुकांना सामोरे जातांना सत्ताधारी पक्षाने ‘अच्छे दिन’ अशी घोषणा केली होती, त्यानंतर ‘अच्छे दिन’ नागरिकांना दिसले नाहीत. पुढील निवडणुकीच्या वेळी त्याचे सत्ताधार्‍यांना विस्मरण झाले. आता वर्ष २०२४ मध्ये ५ ‘ट्रिलियन इकॉनॉमी’ हे नवीन आश्वासन दिले जात आहे, अशी टीका राष्ट्र्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी २९ ऑगस्ट या दिवशी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पुढे म्हणाले की,

१. मी महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांचा दौरा करून आढावा घेणार आहे. पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी जिल्ह्यांत जाऊन स्थानिक परिस्थितीचा आढावा घ्यावा. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विदर्भाचा दौरा केला. मी काही निवडक जिल्ह्यांत जात आहे. मी त्याचा प्रारंभ ठाणे येथून केला आहे.

२. वर्ष २०२२ पर्यंत प्रत्येकाजवळ हक्काचे पक्के घर असेल, प्रत्येक घरात पाण्याचा नळ असेल, वर्ष २०१८ पर्यंत राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीत संकेतस्थळाची सुविधा असेल. ‘डिजिटल इंडिया’चा नारा देण्यात आला होता; पण तसे झाले नाही. वर्ष २०२२ पर्यंत देशातील प्रत्येक घराला शौचालय उपलब्ध असेल, हे आश्वासनही पूर्ण झाले नाही.

३. देशातील ४४ टक्के लोकांना अजूनही वीज मिळाली नाही, ही आकडेवारी केंद्र सरकारची आहे. विरोधी पक्ष जर सत्तेत असतील, तर त्यांना सत्तेतून बाजूला करण्याचा प्रयत्न होत आहे. माणसे फोडणे, साधनांचा वापर करणे आणि ‘ईडी’सारख्या यंत्रणांचा वापर करून सत्ता मिळवण्याचा प्रयत्न चालू असल्याचे गंभीर चित्र आहे. कर्नाटकमध्येही असे प्रकार झाले. महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील काही लोक फोडले आणि सरकार स्थापन केले. त्यामुळे देशातील बिगरभाजप पक्षांच्या नेत्यांशी सुसंवाद साधून लोकशाही मार्गाने आलेली सरकारे पाडण्याचे जे कृत्य चालू आहे, त्याच्या विरोधात जनमत सिद्ध करण्यासाठी लढा उभा करण्याचा आम्ही विचार करत आहोत.

४. भाजपच्या काळात महिलांवर होणार्‍या अत्याचाराच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. बिल्कीस बानो प्रकरणातील आरोपींना गुजरात सरकारने सोडले आणि त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राज्यात एका महिलेवर अत्याचार करणार्‍या आरोपींना सोडण्यात आले आहे. हे अत्यंत चिंताजनक चित्र आहे.