सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्या मार्गदर्शनातील सूत्रे

१. एखादा साधक आपल्याला आपली चूक सांगत असतांना कृतज्ञता व्यक्त होणे आवश्यक !

सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

अ. जेव्हा एखादा साधक आपल्याला आपली चूक सांगतो, तेव्हा आपण ‘गुरुदेवच ती सांगत आहेत’, असा भाव ठेवायला हवा. ‘आपल्या साधनेत साधक साहाय्य करत आहेत’, याविषयी आपल्याला कृतज्ञता वाटायला हवी.

आ. ‘ईश्वर माझे देवाण-घेवाण हिशोब संपवत आहे’, असे वाटून ‘भगवंता, मला तुझ्या चरणी आश्रय दे’, अशी प्रार्थना करायला हवी.

इ. ज्या साधकाने माझी चूक दाखवून दिली, त्याच्याविषयी ‘तो माझे पुष्कळ मोठे पाप नष्ट करून मला साहाय्य करत आहे. माझ्यामध्ये स्वीकारण्याचा गुण वाढवत आहे’, अशी कृतज्ञता व्यक्त व्हायला हवी.

२. देवाचा छायाचित्रक (कॅमेरा) 

देवाचा छायाचित्रक (कॅमेरा) सतत चालू असतो. ईश्वर आपल्याला नक्षत्रांच्या माध्यमातून पहात असतो. या छायाचित्रकातून निसटणे कठीण आहे. त्यातून सुटायचे असेल, तर ‘माझे-तुझे असा भाव न ठेवता ‘माझे काहीच नाही. सर्वकाही भगवंताचे आहे’, असा भाव ठेवायला हवा. तेव्हाच कर्मफळातून मुक्ती मिळते. चांगला साधक याच भावात रहातो.

– कु. पूनम चौधरी, देहली सेवाकेंद्र, देहली. (२८.५.२०२१)