‘निर्भय वॉक’ नव्हे, तर ‘पारदर्शक वॉक’ करत अंनिसने डॉ. दाभोलकर यांना (अंध)श्रद्धांजली वहावी !

डॉ. दाभोलकर यांच्या स्मृतीदिनाच्या निमित्ताने आयोजित विविध कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर सनातन संस्थेचे आवाहन

मुंबई – ‘विवेकाचा जागर’, ‘निर्भय वॉक’, ‘वैज्ञानिक दिन’ आदींच्या गोंडस नावाखाली अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस) राज्यभरात डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या स्मृतीदिनाचा कार्यक्रम करणार आहे. या कार्यक्रमांत विविध सामाजिक क्षेत्रांतील नेते, वक्ते, मान्यवर आदींना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावण्यात आले आहे. ज्या अंनिसच्या ट्रस्टचे हात आर्थिक घोटाळ्यांमध्ये बरबटले आहेत, ज्यांनी ट्रस्टच्या निधीत पारदर्शकता ठेवलेली नाही, त्यांनी ‘पुरोगामीत्वा’चा आव आणून ‘विवेका’चा जागर करायचा, ही महाराष्ट्राच्या जनतेची फसवणूक आहे. त्यामुळे अंनिसने दाभोलकरांच्या स्मृतीदिनाच्या निमित्ताने ‘निर्भय वॉक’ करण्यापेक्षा ट्रस्टमधील आर्थिक घोटाळ्यांविषयी ‘पारदर्शक वॉक’ करायला हवा आणि दाभोलकरांना (अंध)श्रद्धांजली वहावी, असे आवाहन सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी प्रसिद्धीपत्रक काढून केले आहे.

श्री. चेतन राजहंस

प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे,

१. सनातन संस्था गेली अनेक वर्षे अंनिसमधील आर्थिक घोटाळे उघड करून अंनिसचा खरा चेहरा समाजासमोर आणत होती, तेव्हा ‘सनातन खोटे आरोप आहे’, असा अपसमज पसरवला गेला.

२. आता हेच आरोप अंनिसचे ज्येष्ठ कार्यकर्ते माधव बावगे यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये केले आहेत. यातून तरी आता धर्माची चिकित्सा करायला निघालेल्या नास्तिक अंनिसने स्वतःच्या संघटनेतील आर्थिक घोटाळ्यांची चिकित्सा/चौकशी करायला हवी आणि महाराष्ट्राच्या जनतेला ‘भोंदू’ बनवून ‘भोंदूगिरी’च्या माध्यमातून गोळा केलेला पैसा कुठे वापरला जात आहे ?’, याविषयी महाराष्ट्राला सांगावे.

३. डॉ. हमीद दाभोलकर आणि अविनाश पाटील या २ गटांमधील वाद वैचारिक नसून ट्रस्टमधील निधी आणि ट्रस्टवरील नियंत्रण यांच्यामुळे असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे त्यांनी समोर येऊन ट्रस्टमधील कोट्यवधी रुपयांचा हिशोब आणि त्या संदर्भातील प्रश्नांची उत्तरे महाराष्ट्राला पारदर्शकपणे द्यावीत.

४. अंनिसच्या ट्रस्टमधील भ्रष्टाचार उघड होईपर्यंत ‘अंधश्रद्धा निर्मूलन समिती’चा एक ‘ट्रस्ट’ आहे, तसेच त्यामध्ये कोण ट्रस्टी आहेत, हे माधव बावगे यांच्यासारख्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांना कित्येक वर्षे का ठाऊक नव्हते ?

५. लोकांकडून गोळा केलेले २८ लाख रूपये अविनाश पाटील यांनी ‘विवेक जागर ट्रस्ट’मध्ये वळवले, हा काय प्रकार आहे ?

६. अंनिसच्या त्रिदशकपूर्ती कार्यक्रमासाठी ५२ लाख रुपये जमा झाले. या कार्यक्रमासाठी ४० लाख रुपये जमा करण्याचे लक्ष्य होते. कार्यक्रमाला ३६ लाख रुपये खर्च झाला. नंतर कार्यकर्त्यांना, ‘पैसे शिल्लक नाहीत’, असे सांगण्यात आले. असे आहे, तर यांतील १६ लाख कुणाच्या खिशात गेले ?

७. सनातनने केलेल्या आरोपांमुळे डॉ. दाभोलकर यांनी बैठकीत ‘विदेशी योगदान (नियमन) कायद्या’नुसार त्यांना अडचणी येत आहेत, म्हणून वेगळा ट्रस्ट काढावा लागत आहे’, असे सांगितले होते. अंनिसचा कारभार पारदर्शक होता, तर वेगळा ट्रस्ट काढायची आवश्यकता का पडली ? अंनिसच्या पत्रकावर ‘विदेशी-सरकारी अर्थसाहाय्याशिवाय कार्य चालवतो’, असे खोटे का लिहिले जात होते ?

या आणि अशा असंख्य प्रश्नांची उत्तरे विवेकाचा बुरखा घातलेल्या अंनिसने महाराष्ट्राला द्यावीत.