भुसावळ (जिल्हा जळगाव) येथे तहसीलदारांच्या खोट्या आदेशाद्वारे भूखंड विक्री !

विशेष वसुली अधिकार्‍यासह नायब तहसीलदार आणि लिपिक यांना अटक !

जळगाव – भुसावळ शहरातील जनकल्याण अर्बन पतसंस्थेचे भूखंड विशेष वसुली अधिकारी रवींद्र धांडे यांनी तहसीलदारांच्या खोट्या आदेशाने १० जणांना विकले. तहसीलदारांची बनावट स्वाक्षरी आणि शिक्का यांच्या साहाय्याने हे आदेश सिद्ध करण्यात आले. या प्रकरणी १७ जुलै या दिवशी रवींद्र धांडे यांच्यासह भूखंड खरेदी करणार्‍या ११ जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. धांडे यांना पोलिसांनी यापूर्वीच कह्यात घेतलेले असून ३१ जुलै या दिवशी नायब तहसीलदार शशिकांत इंगळे आणि लिपिक श्याम तिवारी यांना अटक करण्यात आली. तहसीलदारांच्या रजेच्या काळात नायब तहसीलदार इंगळे यांच्याकडे पदभार असतांना तिवारी याने हे बनावट आदेश सिद्ध केले होते. (पदाचा अपवापर करत अधिकार्‍यांची बनावट स्वाक्षरी आणि शिक्के सिद्ध करून सर्वसामान्य जनतेची फसवणूक केल्याप्रकरणी दोषींना कठोरात कठोर शिक्षा करायला हवी ! – संपादक)