गुढीपाडव्याच्या निमित्ताने व्याख्यानाच्या प्रसाराची सेवा करतांना रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील कार्यकर्त्यांना जाणवलेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती

१. कार्यकर्त्यांना जाणवलेली सूत्रे

१ अ. कु. नीना कोळसुलकर, जिल्हा सिंधुदुर्ग : ‘गुढीपाडव्याच्या व्याख्यानाची सेवा करतांना आणि व्याख्यान चालू असतांनासुद्धा प्रभु श्रीरामचंद्रांच्या त्रेतायुगातील काळ अनुभवता आला.’

१ आ. कु. पूजा धुरी, जिल्हा सिंधुदुर्ग : ‘गुढीपाडव्याच्या व्याख्यानाचा प्रसार करतांना हिंदु राष्ट्र-जागृती सभेचा प्रसार करत आहोत आणि प्रत्यक्ष व्याख्यान चालू असतांनाही ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभाच चालू आहे’, असे मी अनुभवले.’

१ इ. श्री. वसंत दळवी, जिल्हा रत्नागिरी : ‘गुढीपाडव्याच्या व्याख्यानाची सेवा करतांना माझे सतत श्रीकृष्णाशी अनुसंधान होते. ‘श्रीकृष्ण सर्व करून घेणार आहे’, हा दृढ विश्वास मनामध्ये होता. आज दिवसभरामध्ये भावस्थिती अनुभवता आली.’

१ ई. कु. नारायणी शहाणे, जिल्हा रत्नागिरी : ‘कृष्णाच्या भेटीसाठी ही सेवा मिळाली असून या सेवेतून भगवंत भेटणार आहे’, या भावाने साधक सेवा करत होते.

२. वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

२ अ. श्रीकृष्णाला शरण जाऊन प्रार्थना केल्यावर डोके दुखायचे थांबून सेवा करता येणे : ‘ऑनलाईन’ सत्संगाच्या ‘होस्टिंग’ची (संगणकीय प्रणालीच्या जोडणीची) सेवा करतांना दुपारपासून मला थोडी अस्वस्थता जाणवत होती. डोके दुखत होते आणि तापाची लक्षणेही जाणवत होती; म्हणून माझ्या मनामध्ये ‘ही सेवा अन्य कुणाला तरी देऊया’, असा विचार येत होता. त्यानंतर मी श्रीकृष्णाला शरण जाऊन प्रार्थना केली आणि सेवेला आरंभ केला. ‘देव करून घेणारच आहे’, या भावाने मी श्रीकृष्णाला शरण गेले. प्रत्यक्ष व्याख्यान चालू असतांना माझे डोके दुखत होते; पण नंतर ते दुखायचे थांबले. त्यामुळे मला आजचे हे व्याख्यान आध्यात्मिक स्तरावर अनुभवता आले. श्रीकृष्णाच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– कु. सुवर्णा सकपाळ, जिल्हा रत्नागिरी

या मजकूरात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक