नामांतरानंतराच्या निर्णयानंतरही मंत्रालयातच होत आहे ‘औरंगाबाद’ आणि ‘उस्मानाबाद’ असा उल्लेख !

मुंबई, २५ जुलै (वार्ता.) – राज्य सरकारने ‘औरंगाबाद’चे नामांतर ‘संभाजीनगर’, तर ‘उस्मानाबाद’चे नामांतर ‘धाराशिव’, असे केले असले, तरी ज्या ठिकाणी हा निर्णय घेण्यात आला, त्या मंत्रालयातील महत्त्वाच्या नियंत्रण कक्षातच या निर्णयाची कार्यवाही करण्यात आलेली नाही. मंत्रालय नियंत्रण कक्षाच्या नियमितच्या अहवालामध्ये ‘औरंगाबाद’ आणि ‘उस्मानाबाद’ असाच उल्लेख केला जात आहे.

मंत्रालयातील नियंत्रण कक्षाकडून राज्यात पावसाळ्यात उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्तींचा आढावा नियमितपणे घेऊन तो प्रसिद्ध केला जातो. या नियमितच्या अहवालातील सर्व ठिकाणी अद्यापही ‘उस्मानाबाद’ आणि ‘औरंगाबाद’ असा उल्लेख केला जात आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतांना २९ जूनच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा नामांतरचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयाला नवीन सरकारने १५ जुलै या दिवशी स्थगिती दिली होती. त्यानंतर १६ जुलै या दिवशी झालेल्या नव्या सरकारच्या मंत्रीमंडळाच्या ‘संभाजीनगर’ आणि ‘धाराशिव’ या नावांना पुन्हा मान्यता देण्यात आली.

संपादकीय भूमिका

मंत्रीमंडळाच्या निर्णयाची कार्यवाही न करणार्‍या प्रशासनातील संबंधितांवर सरकार काय कारवाई करणार आहे ?