मध्यप्रदेशमध्ये इंदूर, उज्जैन आणि ग्वाल्हेर येथे भावपूर्ण वातावरणात गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा

ग्वाल्हेर येथील गुरुपौर्णिमेत मार्गदर्शन करतांना श्री. आनंद जाखोटिया आणि उपस्थित जिज्ञासू

उज्जैन (मध्यप्रदेश) – सनातन संस्थेच्या वतीने गुरुपौर्णिमेच्या म्हणजेच १३ जुलै २०२२ या दिवशी इंदूर, उज्जैन आणि ग्वाल्हेर या शहरांमध्ये भावपूर्ण वातावणात ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ साजरा करण्यात आला. या कार्यक्रमांना समाजाचा चांगला प्रतिसाद मिळाला. उज्जैन येथील गुरुपौर्णिमेमध्ये सनातन संस्थेच्या सौ. स्मिता कुलकर्णी, इंदूर येथे हिंदु जनजागृती समितीचे श्री. श्रीराम काणे, तर ग्वाल्हेर येथे समितीचे मध्यप्रदेश आणि राजस्थान राज्याचे समन्वयक श्री. आनंद जाखोटिया यांनी ‘धर्मनिष्ठ समाजाची निर्मिती अन् धर्माधिष्ठित ‘हिंदु राष्ट्र’ स्थापनेची आवश्यकता !’, या विषयावर मार्गदर्शन केले.

इंदूर येथील गुरुपौर्णिमेला उपस्थित जिज्ञासू

१. इंदूर येथे पाक्षिक ‘सनातन प्रभात’चे वाचक श्री. संतोष शर्मा आणि सौ. शोभा शर्मा यांनी सनातन संस्थेचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन केले.

२. ग्वाल्हेर येथे ‘ग्वालियर-चंबल’ नियतकालिकाचे संपादक श्री. दिनकर शर्मा, योगशिक्षिका जयश्री कौशिक, डॉ. ईश्वरचंद करकरे, श्री. जयेंद्रसिंह राणा, तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

मान्यवरांनी केलेले मार्गदर्शन

शिक्षणात धर्माचरण शिकवणार्‍या अभ्यासक्रमाचा समावेश व्हावा ! – परमाचार्य डॉ. देवकरण शर्मा, संस्थापक, सप्तर्षी गुरुकुल

उज्जैन – सध्याच्या स्थितीत सनातन संस्था राष्ट्र आणि धर्म यांच्या जागृतीसाठी कौतुकास्पद प्रयत्न करत आहे. आज भारताच्या शिक्षणव्यवस्थेत सुधारणा होणे आवश्यक आहे. आज सर्वत्र मोठ्या उत्साहात पाश्चात्त्य संस्कृती शिकवली जात आहे. त्याऐवजी धर्माचरण शिकवणार्‍या अभ्यासक्रमाचा समावेश शिक्षणपद्धतीत केला पाहिजे, असे मार्गदर्शन सप्तर्षी गुरुकुलचे संस्थापक परमाचार्य डॉ. देवकरण शर्मा यांनी उज्जैन येथील गुरुपौर्णिमेत केले.

पालकांनी मुलांवर चांगले संस्कार करण्यासाठी वेळ दिला पाहिजे ! – संजय गोयल, व्यावसायिक

इंदूर – आमच्या आई-वडिलांनी आमच्यावर लहान असतांना चांगले संस्कार व्हावे, यासाठी पुष्कळ प्रयत्न केले. आजचे आई-वडील नोकरी, व्यवसाय, सामाजिक माध्यमे आणि ‘नेटफ्लिक्स’यावरील मालिका यांमध्ये व्यस्त आहेत. त्यांनी मुलांवर संस्कार करण्यासाठी जवळच्या मंदिरामध्ये त्यांना १५ दिवसांतून एकदा नेऊन ‘हनुमान चालिसा’ पठण करायला पाहिजे.