हिंदूंनी स्वतःच्या हिताचा विचार न करता राष्ट्ररक्षणासाठी पुढाकार घेतला, तरच राष्ट्र वाचेल ! – महंत दीपक गोस्वामी, ज्ञानम् फाऊंडेशन, राजस्थान

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित ‘ऑनलाईन’ विशेष संवाद : ‘२०४७ पर्यंत भारताला इस्लामी देश बनवण्याचे ‘पी.एफ्.आय.’चे षड्यंत्र ?’

मुंबई – ‘वर्ष २०४७ मध्ये भारताला इस्लामिक राष्ट्र बनवण्यासाठी १० टक्के मुसलमानांनी साहाय्य केले, तर दुबळ्या बहुसंख्यांकांना (हिंदूंना) गुडघ्यावर टेकवून इस्लाम स्वीकारण्यास बाध्य करू’, असे आत्मविश्वासाने सांगणार्‍या ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’च्या (‘पी.एफ्.आय.’च्या) कागदपत्रांकडे हिंदूंनी डोळेझाक करू नये. याच वृत्तीमुळे भारताचाच एकेकाळी भाग असणारे अफगाणिस्तान, पाकिस्तान, श्रीलंका आपण गमावले आहेत. ‘आज आपली काहीतरी हानी होईल’, या भीतीने मागे राहिलो, तर उद्या राष्ट्रच रहाणार नाही. राष्ट्र राहिले नाही, तर स्वतःचेही काही शेष रहाणार नाही. ‘सेक्युलर’ (निधर्मी) सरकारही रहाणार नाही.

महंत दीपक गोस्वामी

आज झारखंड राज्यातील एका शाळेत मुसलमान विद्यार्थ्यांची संख्या ७० टक्क्यांपेक्षा अधिक झाल्यावर तेथे हिंदु विद्यार्थ्यांना हात जोडून प्रार्थना करण्यास थेट बंदी केली आहे. त्यामुळे आता हिंदूंनी स्वतःचे वैयक्तिक सुख-दु:ख आणि हानी यांचा विचार न करता राष्ट्ररक्षणासाठी पुढाकार घेतला, तरच हे राष्ट्र वाचेल, असे स्पष्ट प्रतिपादन राजस्थान येथील ‘ज्ञानम् फाऊंडेशन’चे संस्थापक महंत दीपक गोस्वामी यांनी केले. हिंदु जनजागृती समितीने आयोजित केलेल्या ‘२०४७ पर्यंत भारताला इस्लामी देश बनवण्याचे पी.एफ्.आय.’चे षड्यंत्र ?’, या विषयावरील ‘ऑनलाईन विशेष संवादा’त ते बोलत होते.

पी.एफ्.आय. आणि रा.स्व. संघ यांची तुलना चुकीची ! – अधिवक्ता राकेश दत्त मिश्रा, राष्ट्रीय महासचिव, भारतीय जनक्रांती दल, बिहार

अधिवक्ता राकेश दत्त मिश्रा

बिहारच्या घटनेवरून पी.एफ्.आय. आणि रा.स्व. संघ यांची तुलना चुकीची आहे. पी.एफ्.आय. शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण देऊन देशात हिंसक कृत्ये करत आहे, तर रा.स्व. संघ ही देशप्रेमी संघटना नागरिकांना स्वसंरक्षण प्रशिक्षण शिकवत आहे. संघाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणारे बिहारचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक मानवजीतसिंह ढिल्लो यांचे खलिस्तानी आतंकवाद्यांशी काही संबंध आहेत का ? याची चौकशी केली पाहिजे.

‘पी.एफ्.आय.’सारख्या देशविघातक संघटनांवर बंदी घाला ! – नरेंद्र सुर्वे, प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

श्री. नरेंद्र सुर्वे

तुर्कस्तानचा ‘आय.एच्.एच्.’ (IHH) हा गुप्तचर गट दानाच्या नावाखाली जगभरात आतंकवादी कृत्ये करत असतो. याच गटासह पी.एफ्.आय.च्या अनेक बैठका झाल्या आहेत. पी.एफ्.आय.ला चीनकडून कोट्यवधी रुपये मिळाले आहेत. तिचीच दुसरी संघटना ‘कॅम्पस फ्रंट ऑफ इंडिया’ (सी.एफ्.आय.) आणि अन्य संघटना यांना १०० कोटी रुपये मिळाल्याचे ‘ईडी’च्या (अंमलबजावणी संचालनालयाच्या) चौकशीत पुढे आले आहे. ‘नागरिकत्व सुधारणा कायद्या’ला विरोध करण्यासाठी पी.एफ्.आय.ला विविध देशांतून १२० कोटी रुपये मिळाले आहेत. या संघटनेने अनेक हिंदुत्वनिष्ठांच्या हत्या केल्या आहेत. केंद्रशासनाने बंदी घातलेल्या देशद्रोही ‘सिमी’ संघटनेचे कार्यकर्ते पी.एफ्.आय.च्या माध्यमांतून देशविघातक कृत्ये करत आहेत. याच संघटनेच्या केरळमधील फेरीत १० वर्षांच्या मुलाने हिंदूंचा नरसंहार करण्याचे आवाहन केले होते. तसेच त्यांच्या फेरीत देशविघातक वक्तव्ये केली जातात. त्यामुळे सरकारने ‘पी.एफ्.आय.’सह तिच्याशी संलग्न असलेल्या देशविघातक सर्व संघटनांवर बंदी घातली पाहिजे.