बांगलादेशातून घुसखोरी करण्यासाठी आतंकवाद्यांकडून वैद्यकीय आणि पर्यटन व्हिसाचा वापर !

गौहत्ती (आसाम) – बांगलादेशातील जिहादी आतंकवादी भारतात घुसण्यासाठी वैद्यकीय आणि पर्यटन व्हिसाचा वापर करत आहेत. आसाम पोलिसांनी नुकत्याच अटक केलेल्या काही जिहादी आतंकवाद्यांच्या चौकशीतून हे उघड झाले आहे. हरकत-उल्-मुजाहिदीनच्या आधी पकडल्या गेलेल्या अनेक सदस्यांनी पाकिस्तानहून बांगलादेश आणि नंतर आसाममार्गे भारतात घुसखोरी केल्याचे समोर आले आहे.

बांगलादेश सीमेवरून भारतात घुसखोरी वाढली !

सीमा सुरक्षा दलाच्या ताज्या माहितीनुसार, मागील ५ वर्षांच्या तुलनेत वर्ष २०२१ मध्ये बांगलादेश आणि पाकिस्तान येथून भारतात सर्वाधिक घुसखोरी झाली. वर्ष २०१७ पासून २०२१ पर्यंतच्या कालावधीत एकूण ६ सहस्र ७१२ घुसखोर पकडले गेले. यांतील २६८ घुसखोर भारत-बांगलादेश सीमेतून घुसखोरी करतांना पकडले गेले. वर्ष २०२१ मध्ये पाकिस्तान सीमेवरून ४५, तर बांगलादेश सीमेवरून १ सहस्र ५८३ घुसखोर पकडले गेले आहेत.

संपादकीय भूमिका

अशांना भारतात येण्याची संमत्ती देण्यापूर्वी आपल्या सरकारी यंत्रणांकडून त्यांची पार्श्‍वभूमी तपासली जात नाही का ? जर जात असेल, तर अशा आतंकवाद्यांना देशात प्रवेश मिळतोच कसा ? सुरक्षेतील या गंभीर त्रुटीसाठी संबंधित उत्तरदायी अधिकार्‍यांवर कारवाई झाली पाहिजे !