मंदिरे अतिक्रमण मुक्त करून तेथे पुन्हा देवतांची पुनर्स्थापना करणार ! – कानपूरच्या महापौर प्रमिला पांडेय

कानपूरमधील १२४ मंदिरांवर मुसलमानांकडून अतिक्रमण

कानपूर (उत्तरप्रदेश) – कानपूरमध्ये १२४ मंदिरांवर मुसलमानांनी अतिक्रमण केले आहे. तेथे आता बिर्याणीची दुकाने उघडण्यात आली आहेत. ही सर्व अतिक्रमणे हटवून मंदिरे पुन्हा उघडण्यात येतील आणि तेथे देवतांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठापणा केली जाईल, अशी माहिती कानपूरच्या महापौर प्रमिला पांडेय यांनी दिली आहे. त्यांनी २८ मे या दिवशी यातील ७ प्राचीन मंदिरांच्या ठिकाणी भेटही दिली. प्रशासनाने मंदिरावर अतिक्रमण करणार्‍यांना नोटीसही बजावली आहे.

१. महापौर प्रमिला पांडेय यांनी फेसबूकवर लिहिले आहे, ‘मी आज वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांसह बेकनजंग येथील ७ प्राचीन मंदिरांचा दौरा केला. या मंदिरांची स्थिती अत्यंत दयनीय आहे. येथे अतिक्रमण करून तेथे दुकाने उघडण्यात आली आहेत. ही मंदिरे अतिक्रमण मुक्त करून उघडण्यात येतील.’

२. या माहितीसह महापौर पांडेय यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यात त्या एका मुसलमान व्यक्तीशी बोलत आहेत. त्या म्हणतात, ‘तम्ही मंदिरे तोडली. आम्ही तुमच्या मशिदीबाहेर मंदिर बनवले, तर तुम्हाला चालेल का ?’

३. महापौर पांडेय यांनी आणखी एक व्हिडिओ प्रसारित केला आहे. त्यात म्हटले आहे की, येथे पूर्वी प्राचीन शिवमंदिर होते आणि आता तेथे अतिक्रमण करण्यात आले आहे. मंदिराला टाळे लावण्यात आले आहे जे मी तोडून टाकले. असे एकेक करत सर्व मंदिरे परत मिळवण्यात येतील.

संपादकीय भूमिका

इतकी वर्षे हिंदूंच्या मंदिरांवर अतिक्रमण होत असतांना प्रशासन आणि स्थानिक हिंदू झोपले होते का ? हिंदूंना हे लज्जास्पद !